Thursday, April 16, 2026

श्रीसाईसच्चरित-अध्याय ३०

 IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय ३०         

नवसादिकथाकथनं           

(ओवीसंख्या १२३)

चिंतन: या अध्यायाचे नावनवसादिकथाकथनंअसले तरी यामध्ये नवसाची एकच कथा आहे आणि तीसुद्धा उपकथा म्हणून आली आहे. ती कथा म्हणजे बाबांचा भक्त शामाच्या आईने सप्तशृंगी देवीला बोललेल्या नवसाची. इतर कथा २९व्या अध्यायाप्रमाणे बाबांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतांच्या आहेत.

*      अध्यायारंभ.  

*      वणी गावच्या काकाजी वैद्यांना सप्तशृंगी देवीच्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे बाबांच्या दर्शनाने मन:शांती लाभते. शामा देवीस चांदीचे स्तन अर्पण करून आपल्या आईचा नवस पूर्ण करतो. (२९-९१)

*      राहात्याच्या खुशालचंदांस आणि मुंबईच्या रामलालला बाबा स्वप्नात दर्शन देऊन शिरडीला बोलावून घेतात. अध्यायाचा समारोप (९२-१२३)

काकाजी वैद्यांस बाबांच्या दर्शनाने मन: शांतीचा लाभ:- नाशिकमधील वणी गावच्या काकाजी वैद्यांना सप्तशृंगी देवी स्वप्नात येऊन मन:शांतीसाठी शिरडीच्या साईबाबांकडे जाण्यास सांगते. वणीला बाबांचे भक्त शामा ऊर्फ माधवराव देशपांडे देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पुरोहित शोधत काकाजी वैद्यांकडे येतात. शामा आपला नवस पूर्ण करून काकाजी वैद्यांस बाबांच्या भेटीस घेऊन जातो. बाबांच्या भेटीनंतर काकाजी वैद्यांस मन: शांती लाभते.

 

शामाचा नवस:- शामाच्या आईच्या स्तनांस क्षते पडलेली असतात. त्या वेळी ती दुखण्यातून बरे झाल्यास सप्तशृंगी देवीला चांदीचे स्तन वाहण्याचा नवस बोलतेशामाच्या आईचे दुखणे दूर होते. आई  पुढे निधन पावते आणि हा नवस फेडायचा राहून जातो. पुढे एका ज्योतिष्याने शामाच्या भावास आठवण करून दिल्यावरून शामा चांदीचे स्तन  बनवून बाबांना  अर्पण करतो. परंतु बाबा हा नवस देवीकडेच पूर्ण करण्यास सांगतात. त्यामुळे शामा नवस पूर्ण करण्यास वणीला येतो. 

 

चिंतन: साईसच्चरितात बरेच प्रसंग असे आहेत की ज्यांमध्ये बाबांनी बाबांना न मानता स्वत:च्या आराध्यदैवतालाच मानणार्या लोकांना त्यांच्या आराध्यदैवताच्या स्वरूपात दर्शन देऊन आपले आणि त्या आराध्यदैवताचे अभिन्नत्व दाखवून दिले. उदाहरणार्थ:-

 

*      बाबांच्या ठिकाणी मुळेशास्त्रींना त्यांच्या समाधिस्थ गुरु घोलपनाथांचे दर्शन (अध्याय १२)

*      श्रीरामाचे भक्त असणाऱ्या एका डॉक्टरांना बाबांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन (अध्याय १२)

 

परंतु या अध्यायात मात्र सप्तशृंगी देवीस बोललेला नवस शामा जेव्हा बाबांस स्वीकारण्याची विनंती करतो, तेव्हा बाबा त्यास नकार देऊन ज्या दैवताचा नवस त्या दैवताकडेच फेडण्यास सांगतात. असा विरोधाभास का बरे?

 

मला असे वाटते की नवस हा  दैवताबरोबर केलेला करार आहे. तेव्हा कराराचे  पालन त्याच्या अटीप्रमाणेच व्हावे लागते. त्यामुळे बाबांनी शामाला सप्तशृंगी देवीचा नवस तिच्याकडेच फेडण्यास सांगितले असावे.

खुशालचंदांची आणि बाबांची गोष्ट (९२-१२३)

एकदा बाबा दीक्षितांना राहात्याच्या खुशालचंदांना आणण्यासाठी टांगा घेऊन पाठवतात. दीक्षित खुशालचंदांकडे दीक्षित येताच खुशालचंदांना आश्चर्य वाटते. कारण बाबांनी स्वप्नात येऊन त्यांना शिरडीस येण्यास सांगितलेले असते. टांगा पाहण्यास ते मुलाला वेशीवर पाठवतात, त्याच वेळी दीक्षितांचा टांगा हजर होतो. म्हणजे टांग्याची सोयही बाबांनीच केली.

 

 

 


No comments:

Post a Comment

Ni Hao Beijing , Ni Hao Shanghai

Ni Hao Beijing, Ni Hao Shanghai ----------------------------------------- Travelogue of a Journey through Beijing and Shanghai (22 May 2026 ...