Wednesday, August 20, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८-मोक्षसंन्यासयोग

अर्जुन म्हणाला

महाबाहो, मला वेगवेगळे जाणावयाचे | तत्त्व संन्यासाचे || आणि तत्त्व त्यागाचे | हे हृषीकेशा, हे केशिनिषूदना || अ.१८, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

काम्य कर्मे सोडण्यास | कवी म्हणती संन्यास ||सर्व कर्मांची फळे सोडण्यास | विवेकी म्हणती त्याग || अ.१८, ओ.२||

कर्मे असती दोषयुक्त | म्हणून ती सोडावी, असे काही ज्ञानी म्हणतात || यज्ञ, तप, दान ही कर्मे सोडणे नसे उचित | असे दुसऱ्यांचे म्हणणे || अ.१७, ओ.३||

भरतसत्तमा, त्यागाविषयी माझे मत | ऐक सांगतो निश्चित || पुरुषव्याघ्रा, सांगितला आहे शास्त्रात | तीन प्रकारचा त्याग || अ.१८, ओ.४||

यज्ञ, तप, दान या कर्मांस | सोडणे योग्य नसे, ती हवीतच करावयास || पावन करती मनुष्यांस |यज्ञ, दान आणि तप || अ.१८, ओ.५||

परंतु करावे या कर्मांस | सोडून आसक्ती आणि फळांस || असा माझा विश्वास | पक्का आहे पार्था || अ.१८, ओ.६||

नेमून दिलेल्या कर्मास | सोडणे उचित नसे खास || शास्त्रात म्हटला आहे तामस | मोहापोटी केलेला त्याग || अ.१८, ओ.७||

शरीराला कष्ट पडतील | म्हणून कर्माचा त्याग कुणी करील || तर तो त्याग राजस होईल | आणि त्यागाचे फळ मिळणार नाही || अ.१८, ओ.८||

नेमून दिलेले कर्म केल्यास | आसक्ती आणि फळाच्या करून त्यागास || म्हणतात सात्त्विक त्या त्यागास | हे माझे मत अर्जुना || अ.१८, ओ.९||

कष्टदायक कर्माच्या करी न द्वेषास | सुखदायक कर्माची आसक्ती न ज्यास || त्या सत्त्वशील, बुद्धिमान, संशय नष्ट झालेल्या मनुष्यास | म्हणावे खरा त्यागी || अ.१८, ओ.१०||

देहधारी मनुष्यास | शक्य नसे सोडणे कर्मास ||त्यामुळे जो सोडतो कर्मफळास | तोच खरा त्यागी || अ.१८, ओ.११||

जो कर्मफळांस न सोडतो | तो मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट आणि मिश्र फळे भोगतो || परंतु तो मुक्त राहतो | ज्याने सोडले कर्मफळांना || अ.१८, ओ.१२||

सर्व कर्मांच्या सिद्धीला | सांख्यतत्त्वात सांगितले ज्या पाच कारणांला || महाबाहो, ती सांगतो तुला | ऐकून घे || अ.१८, ओ.१३||

पहिला, कर्ता, दुसरे, अधिष्ठान | तिसरे, साधने भिन्न || चौथे विविध प्रयत्न | आणि पाचवे दैव || अ.१८, ओ.१४||

शरीर, वाचा आणि चित्त | यांद्वारे जेव्हा मनुष्य करतो कर्मास सुरुवात || भले ते कर्म असो न्याय्य वा विपरीत | ही पाच कारणे असती त्यापाठी || अ.१८, ओ.१५||

वस्तुस्थिती अशी असता | जो स्वत:स मानतो कर्ता || सत्य न येई हाता | त्या मूर्खाच्या || अ.१८, ओ.१६||

अहंकारमुक्त ज्याचे मन | ज्याच्या बुद्धीस नाही आसक्तीचे बंधन || तो या लोकांना मारून | न मारतो, न बद्ध होतो || अ.१८, ओ.१७||

परिज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान | ही कर्माची प्रेरके तीन || कर्म, कर्ता आणि साधन | ही तीन अंगे कर्माची || अ.१८, ओ.१८||

प्रकृतीच्या गुणांस अनुसरून | कर्म, कर्ता आणि ज्ञान || यांचेही प्रकार तीन | तेसुद्धा ऐक आता || अ.१८, ओ.१९||

ज्या ज्ञानाने सर्व भूतांत | दिसे एकच भाव अव्यय आणि अविभक्त ||  घे लक्षात | ते ज्ञान सात्त्विक || अ.१८, ओ.२०||

ज्या ज्ञानाने येई दिसून | सर्व भूतांत भाव भिन्न ||ते ज्ञान | जाण राजस || अ.१८, ओ.२१||

ज्या ज्ञानाने मनुष्य एकाच कार्यात | विनाकारण, तत्त्व न जाणता, सर्वस्व मानून होतो आसक्त | घे ध्यानात | ते अत्यल्प ज्ञान तामस || अ.१८, ओ.२२||

नेमून दिलेले, आसक्तिरहित | प्रीती आणि द्वेषापासून मुक्त || फळाची इच्छा न ज्यात | ते कर्म सात्त्विक || अ.१८, ओ.२३||

फळाची इच्छा असे ज्यात | जे आहे अहंकारयुक्त || ज्यासाठी खटाटोपच जास्त | ते कर्म राजस || अ.१८, ओ.२४||

परिणाम, हानी, हिंसा आणि क्षमता | या साऱ्याचा विचार न करता || केवळ मोहाने कर्म आरंभता | ते म्हटले जाते तामस || अ.१८, ओ.२५||

अनासक्त, अहंकारापासून मुक्त | धैर्य आणि उत्साहाने युक्त || यश आणि अपयशाविषयी विकाररहित | तो कर्ता सात्त्विक || अ.१८, ओ.२६||

लोभी, हिंसावृत्तीचा, विषयासक्त | अपवित्र, कर्मफळाने प्रेरित || हर्ष आणि शोकाने होई विचलित | तो कर्ता राजस || अ.१८, ओ.२७||

अडाणी, हट्टी, अस्थिर | कपटी, आळशी, कामचोर || सदा दु:खी, करी पिरपिर | तो कर्ता तामस || अ.१८, ओ.२८||

बुद्धी आणि धृतीचे प्रकार | तीन गुणांनुसार ||सांगतो सविस्तर | ऐक धनंजया || अ.१८, ओ.२९||

प्रवृत्ती आणि निवृत्तीचे जिला ज्ञान | कार्य-अकार्य, भय-निर्भयता यांचे भान || कळे कशात मोक्ष वा बंधन | ती बुद्धी सात्त्विक पार्था || अ.१८, ओ.३०||

धर्म काय, अधर्म काय | कुठले कार्य, कुठले अकार्य || यांचा जिला होई न निर्णय | ती राजसी बुद्धी पार्था || अ.१८, ओ.३१||

अज्ञानाने झाकून | अधर्मास धर्म मानून || सर्व बाबतींत करी विपरीत वर्तन | ती बुद्धी तामसी || अ.१८, ओ.३२||

प्राण, इंद्रिये आणि मन | यांच्या क्रिया, स्थिरता आणि योगातून || करते धारण | ती धृती सात्त्विक || अ.१८, ओ.३३||

जिच्यामुळे माणूस | धारण करतो धर्म, काम आणि अर्थास || आणि आसक्त राहतो फळास | पार्था, ती धृती राजस || अ.१८, ओ.३४||

स्वप्न, भय, शोकास | विषाद आणि मदास || जी दुर्बुद्धी तयार नसे सोडण्यास | पार्था, ती धृती तामस || अ.१८, ओ.३५||

सुखाचे प्रकार तीन | भरतर्षभा, घे ऐकून || जे अभ्यासात राहते मग्न | आणि दु:खास संपवते -|| अ.१८, ओ.३६||

-जे विषासारखे भासे सुरुवातीस | परंतु ज्याचा परिणाम अमृतापरीस || जे आत्मबुद्धीच्या प्रसन्नतेतून येते जन्मास | ते सुख सात्त्विक || अ.१८, ओ.३७||

विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून | होते जे उत्पन्न || आरंभी अमृतासारखे, परिणामी विषासमान | ते सुख राजस || अ.१८, ओ.३८||

जे आरंभापासून अखेरपर्यंत | आत्म्याला पाडते मोहात || उगम ज्याचा निद्रा, आळस आणि प्रमादात | ते सुख तामस || अ.१८, ओ.३९||

न पृथ्वीवर, न आकाशात | किंवा अगदी देवलोकात || प्राणी न कुणी अस्तित्वात | या तीन गुणांपासून मुक्त || अ.१८, ओ.४०||

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांस | वाटून दिले कर्मांस || त्यांच्या स्वभावजन्य गुणांस | अनुसरून परंतपा || अ.१८, ओ.४१||

शम, दम, शुद्धता | सरळपणा, क्षमाशीलता || ज्ञान, विज्ञान, आस्तिकता | हे ब्राह्मणांचे स्वभाव कर्म || अ.१८, ओ.४२||

शौर्य, तेज, धैर्य, दक्षतेत | युद्धात पलायन न करण्यात || दान आणि अधिकारभावात | क्षत्रियांचे स्वभावकर्म || अ.१८, ओ.४३||

शेती, गोरक्षा, व्यापारात | वैश्यांचे कर्म स्वभावजात || सेवाशुश्रुषेत | शूद्रांचे स्वभावजात कर्म || अ.१८, ओ.४४||

आता सांगतो थोडक्यात | स्वकर्म करीत || उत्तम सिद्धी प्राप्त | कशी होते || अ.१८, ओ.४५||

करता स्वकर्मास | पूजिले जाते त्यास || ज्याने व्यापले साऱ्यास | त्यातून मिळते सिद्धी || अ.१८, ओ.४६||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म  गुणविहीन ||नेमून दिलेले स्वाभाविक कर्म करून | दोष न येई माथा || अ.१८, ओ.४७||

कौंतेया, स्वाभाविक कर्म जरी दोषयुक्त | ते सोडणे न उचित || सर्व कर्मांस दोष झाकतात |धुराप्रमाणे अग्नीस ||अ.१८, ओ.४८||

ज्याने सोडले आसक्तीस | जिंकले स्वत:स, सोडले इच्छांस || तो परम नैष्कर्म्यसिद्धीस | संन्यासातून मिळवतो || अ.१८, ओ.४९||

कौंतेया, सांगतो थोडक्यात | सिद्धी केल्यावर प्राप्त || ब्रह्मावस्थेप्रत | कसा मनुष्य पोहचतो || अ.१८, ओ.५०||

बुद्धीद्वारे विशुद्ध झालेला | धृतीने स्वतःस नियंत्रित केलेला || शब्दादि विषयांचा त्याग केलेला | मुक्त आसक्ती आणि द्वेषातून - || अ.१८, ओ.५१||

-एकांतात राहणारा, मिताहार करणारा | काया, वाचा, मनास नियंत्रित करणारा || ध्यानयोगात मग्न राहणारा | वैराग्यसंपन्न- || अ.१८, ओ.५२||

अहंकार, बल, दर्पास | काम, क्रोध आणि भौतिक सुखांस || सोडून, निर्मम आणि शांत राहणारास | ब्रह्मस्थिती प्राप्त होते || अ.१८, ओ.५३||

तो प्रसन्न आत्मा ब्रह्मरूप होतो | तो न शोक करतो, न इच्छा धरतो || सर्व भूतांशी समबुद्धीने राहतो | मिळवतो माझ्या परम भक्तीस || अ.१८, ओ.५४||

मी आहे किती महान | याचे त्याला होते ज्ञान ||मला तत्त्वत: जाणून | तो प्रवेश माझ्यात करतो || अ.१८, ओ.५५||

नेहमी करतो सर्व कर्मांस | राहून माझ्या आश्रयास || मिळवतो माझ्या कृपाप्रसादास | आणि पदास अव्यय शाश्वत || अ.१८, ओ.५६||

सर्व कर्मे मनाने मला अर्पून | माझ्याशी परायण होऊन || बुद्धियोगाने माझा आश्रय घेऊन | चित्त सतत माझ्यात ठेव || अ.१८, ओ.५७||

जर चित्त माझ्यात स्थिर करशील | तर माझ्या कृपेने सर्व संकटे तरून जाशील || अहंकाराने माझे न ऐकशील | तर पावशील नाश || अ.१८, ओ.५८||

जाऊन अहंकाराच्या आश्रयास | 'युद्ध करणार नाही' असे जे म्हणतोस || तो व्यर्थ आहे तुझा प्रयास | प्रकृती तुझ्याकडून युद्ध करवील || अ.१८, ओ.५९||

स्वत:च्या स्वभावजन्य कर्मास | कौंतेया तू बांधला आहेस || मोहाने जे न करू इच्छितोस | स्वभाववश होऊन करशील || अ.१८, ओ.६०||

अर्जुना, सर्व भूते आहेत | जणू यंत्रात || आणि त्यांना योगमायेने आहे फिरवीत | सर्वांच्या हृदयात राहणारा ईश्वर || अ.१८, ओ.६१||

भारता, सर्वभावास अनुसरून | त्याला जा शरण || मिळेल परम शांती आणि शाश्वत स्थान | त्याच्या कृपेने || अ.१८, ओ.६२||

याप्रमाणे केले तुला कथन | गूढातील गूढ ज्ञान ||त्यावर पूर्ण विचार करून | तुझ्या इच्छेप्रमाणे कर || अ.१८, ओ.६३||

हे माझे श्रेष्ठ वचन, गूढ सर्वांत | पुन्हा घे ध्यानात || तू मला प्रिय अत्यंत | म्हणून तुझ्या हिताचे सांगतो || अ.१८, ओ.६४||

माझा भक्त हो, मन माझ्यात कर स्थिर | माझा उपासक हो, मला नमस्कार कर || म्हणजे तू माझ्याकडेच येणार | तू मला प्रिय म्हणून, प्रतिज्ञेवर सत्य सांगतो तुला || अ.१८, ओ.६५||

सर्व धर्मांस सोडून | मलाच ये शरण || तुला मुक्त करीन सर्व पापांतून | नको करूस शोक || अ.१८, ओ.६६||

हे ज्ञान कधीही सांगू नये तपोहीनास | किंवा अभक्तास || अथवा ऐकण्याची इच्छा नसे ज्यास | किंवा जो माझा मत्सर करतो || अ.१८, ओ.६७||

हे श्रेष्ठ गूढ ज्ञान | जो माझ्या भक्तांना करील कथन | तो माझ्यावर परम भक्ती जडून | नि:संशय माझ्याकडेच येईल || अ.१८, ओ.६८||

सर्व मनुष्यांत त्याच्याहुनी | नसे प्रिय मला दुसरा कुणी || न तसा होईल भुवनी | भविष्यात || अ.१८, ओ.६९||

आपल्या या धर्मदायी संवादाचे अध्ययन | करील जो कोण || तो ज्ञानयज्ञाने करील मला प्रसन्न | हे माझे मत || अ. १८, ओ.७०||

जो मनुष्य श्रद्धावान आणि असूयाहीन | केवळ करील हा संवाद श्रवण || तोही जाईल मुक्त होऊन | पुण्य करणाऱ्यांच्या शुभ लोकात || अ.१८, ओ.७१||

हे पार्था, लक्ष देऊन | केलेस ना हे शास्त्र श्रवण ?नष्ट झाले का संमोह आणि अज्ञान | तुझे धनंजया? || अ.१८, ओ.७२||

अर्जुन म्हणाला 

हे अच्युता, मोह दूर झाला | तुझ्या कृपेने कर्तव्याचे स्मरण झाले मला || सिद्ध मी, संदेह दूर झालेला | तुझ्या सांगण्याप्रमाणे युद्ध करीन || अ.१८, ओ.७३||

संजय म्हणाला 

याप्रमाणे मी ऐकले | वासुदेव आणि पार्थ हे महात्मे जे अद्भुत बोलले || ते ऐकून रोमांच उभे राहिले | अंगावर माझ्या || अ.१८, ओ.७४||

व्यासांनी कृपा केली म्हणून | हा योग परम गहन || केला मी श्रवण | प्रत्यक्ष योगेश्वर कृष्णांच्या मुखातून || अ.१८, ओ.७५||

हे राजा, केशव आणि अर्जुन यांनी | केलेला हा पवित्र आणि अद्भुत संवाद आठवुनी || मी हर्षित होतो मनी | पुन्हा पुन्हा || अ.१८, ओ.७६||

महाराज, हरीचे अतिशय अद्भुत रूप ते | मला एक सारखे आठवते || मन विस्मित आणि हर्षित होते | पुन्हा पुन्हा || अ.१८, ओ.७७||

जेथे कृष्ण योगेश्वर | जेथे पार्थ धनुर्धर || तेथेच श्री, विजय, शक्ती आणि नीतीचा वास निरंतर | हे माझे मत || अ.१८, ओ.७८||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘मोक्षसंन्यासयोग’ नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला.

                 || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved