Thursday, October 9, 2025

II श्री गजानन विजय परिचय II अध्याय ६ मधमाश्यांच्या चावण्याचा महाराजांवर परिणाम नाही

 

--------------------------------------------------------+-

या अध्यायात काय आहे:-

-मधमाश्यांच्या चावण्याचा महाराजांवर परिणाम नाही

-महाराजांची आणि अकोटचे श्रीनरसिंगजी महाराज यांची भेट

-शिवर गावचे व्रजभूषण पंडित आणि महाराजांची भेट

-महाराज बंकटलालचे घर सोडून शेगावातील मारुतीच्या मंदिरात वास्तव्यास जातात

------------------------------------------------------+---

🌺 मधमाश्यांच्या 🐝 🐝 🐝 चावण्याचा महाराजांवर परिणाम नाही 

शेगावातील  महाराजांचे वास्तव्य बंकटलालच्या घरीच होते. गावाच्या दक्षिणेस बंकटलालचा मळा होता. या मळ्यात एक दिवस सर्वजण महाराजांना घेऊन कणसे खाण्यास गेले. मळ्यात मोठमोठी झाडे होती. एका विहिरीजवळ सर्वांनी कणसे भाजण्याची तयारी केली आणि दहा बारा आगट्या पेटवल्या. या आगट्यांमुळे धुराचा डोंब उठला आणि चिंचेच्या झाडावर असणाऱ्या मोहळातून मधमाश्या घोंघावू लागल्या आणि त्या साऱ्या मळ्यात पसरल्या. त्याबरोबर सारी मंडळी घाबरून कणसे तेथेच टाकून पळाली.

महाराज मात्र आपल्या जागी बसून होते. साऱ्या माश्या महाराजांच्या अंगावर बसल्या आणि महाराज जणू माश्यांची पासोडी पांघरले आहेत असे ते दृश्य दिसत होते. महाराज चिंतन करीत होते की माशीही मीच झालो आणि मोहळही मीच झालो. कणसे खाण्यास मीच आलो आणि कणसेही माझेच रूप आहे. माश्या मात्र महाराजांना चावतच होत्या आणि त्यांचे असंख्य काटे महाराजांच्या अंगात रुतले होते. महाराज मात्र चिंतन करीत आनंदात डोलत होते.

असा एक प्रहर लोटला. भक्त चिंतातुर झाले. बंकटलालला वाटू लागले की आपण उगीचच महाराजांना मळ्यात येण्यास भरीस पाडले. आपल्यामुळेच महाराजांवर हे संकट ओढवले. त्यामुळे तो मळ्यात जाण्यास निघाला.

बंकटलाल आपल्याला भेटण्यास येतो आहे हे महाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि माश्यांपासून त्याला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी माश्यांना मोहळात परत जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे माश्या मोहळामध्ये परत गेल्या.

बंकटलाल जेव्हा इतर खेडूतांसह मळ्यात पोहचला, तेव्हा महाराज हसून त्याला म्हणाले, 

' वा ! माश्यांची छान मेजवानी दिली की मला ! ते विषारी जीव माझ्या अंगावर बसले, तेव्हा लड्डूभक्त पळून गेले. यावरून तरी धडा घे की संकट आल्यावर एका ईश्वरावाचून कोणी सहाय्य करणार नाही.'

बंकटलाल यावर गोड शब्दांत म्हणाला,' महाराज, मी महापापी आहे. माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. तुमच्या अंगातील काटे काढण्यासाठी सोनाराला बोलावू का?'

महाराज यावर म्हणाले,' बाबा रे, मला काही झाले नाही. डसणे हा माश्यांचा स्वभावधर्म आहे. माश्यासुद्धा सच्चिदानंदस्वरूप आहेत. ते स्वरूप मी जाणले. म्हणून त्या मला इजा करू शकल्या नाहीत.'

तरीसुद्धा बंकटलालने सोनारांना बोलावले. सोनार त्याप्रमाणे चिमटे घेऊन आले आणि महाराजांच्या शरीरात काटे शोधू लागले.

महाराजांनी आपल्या शरीरातील वायू रोखून धरताच सारे काटे आपोआप वर आले. हे पाहून लोक चकित झाले आणि महाराजांची योग्यता त्यांना कळली.

🌺 महाराजांची आणि अकोटचे श्रीनरसिंगजी महाराज यांची भेट

शेगावच्या ईशान्य दिशेह सुमारे अठरा कोसांवर (५७ किमी) अकोट नावाचे गाव आहे.

शेगाव आणि अकोट यांचे स्थान दाखविणारा नकाशा (Source: © OpenStreetMap contributors)

या अकोटमध्ये श्रीनरसिंगजी महाराज नावाचे संत होते. श्री नरसिंगजी महाराज जातीने मराठा असून कोतश्या अल्लीचे शिष्य होते. श्रीनरसिंगजी महाराज विठ्ठलभक्त होते. (या श्रीनरसिंगजी महाराज यांच्याविषयी श्री दासगणूंनी त्यांच्या भक्तलीलामृतात लिहिले आहे असा या अध्यायात उल्लेख आहे). या श्रीनरसिंगजी महाराजांचा आणि श्रीगजानन महाराजांचा स्नेह होता.

एकांत मिळावा म्हणून  श्रीनरसिंगजीमहाराज अकोटजवळील घनदाट अरण्यात राहत. श्रीनरसिंगजीमहाराजांना एकदा श्रीगजानन महाराज भेटण्यास गेले. यावेळी दोन्ही संतश्रेष्ठांच्या आध्यात्मिक विषयावर बऱ्याच चर्चा झाल्या. श्रीगजानन महाराज श्रीनरसिंगजी महाराजांच्या सहवासात रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी श्रीगजानन महाराजांनी श्री नरसिंगजी महाराजांचा निरोप घेतला. त्या वेळी श्रीनरसिंगजी महाराजांनी श्री गजानन महाराजांना असेच भेटत राहण्यास सांगितले.

गजानन महाराज श्री नरसिंग महाराजांना भेटण्यासाठी आल्याची बातमी गुराख्यांतर्फे गावात पोहचताच गावकरी त्यांना भेटण्यास लोटले. परंतु त्याआधी गजानन महाराज तेथून निघून गेले होते.

🌺 शिवर गावचे व्रजभूषण पंडित आणि महाराजांची भेट
गजानन महाराज शिष्यांबरोबर फिरत दर्यापूरजवळील शिवर नावाच्या गावी आले. हे गाव चंद्रभागेच्या तीरावर आहे.  ही चंद्रभागा आपल्या परिचयाची पंढरपूरजवळ  असणारी नाही . पयोष्णीला मिळणारी ही एक छोटी नदी आहे.

या शिवर गावात व्रजभूषण नावाचा पंडित राहत होता. हा व्रजभूषण फार विद्वान असून त्याला चार भाषा येत होत्या. व्रजभूषण सूर्याचा भक्त होता. तो रोज सकाळी चंद्रभागेच्या तीरी येऊन सूर्याला अर्घ्य देत असे.

त्याच्या नित्यक्रमाप्रमाणे तो चंद्रभागेच्या तीरावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आला असता त्याला महाराजांचे दर्शन झाले. महाराज वाळवंटामध्ये ध्यानस्थ बसले होते. सभोवती त्यांचे शिष्य बसले होते.

महाराजांना पाहताच व्रजभूषणाला त्यांच्या दिव्यत्वाची ओळख पटली. सूर्याऐवजी महाराजांनाच अर्घ्य देऊन त्याने महाराजांचे पूजन केले आणि महाराजांच्या स्तवनपर श्लोक म्हटला-

हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । 

ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी 

झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । 

नासे गजाननगुरोमज पाव आतां ॥१॥

आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराजांनी व्रजभूषणाला प्रेमाने आलिंगन देऊन आशिर्वाद दिला. 

व्रजभूषणाला कर्ममार्गाचा उपदेश करून महाराज शिष्यांसह शेगावला परत आले.

🌺 महाराज बंकटलालचे घर सोडून शेगावातील मारुतीच्या मंदिरात वास्तव्यास जातात

महाराज अशा प्रकारे अकोट, अकोले, मलकापूर अशा निरनिराळ्या गावांत सतत फिरत असत. श्रावण महिन्यात या मंदिरात मारुतीचा मोठा उत्सव होत असे. या उत्सवामध्ये अभिषेक, भजन, कीर्तन असे निरनिराळे कार्यक्रम चालत. अन्नदान होत असे. खंडू हा गावचा पाटील या उत्सवाचा पुढारी होता.

हा उत्सव सुरू होण्याच्या सुमारास महाराज या मारुतीच्या मंदिरात आले आणि बंकटलालला म्हणाले,' मी इथून पुढे या मारुतीच्या मंदिरात वास्तव्य करतो. गोसावी, संन्यासी, फकीर यांना कायमचे घर असू नये. त्यामुळे तुझ्यासारख्या प्रापंचिकाच्या घरी राहणे मला योग्य नाही.'

बंकटलालला ही गोष्ट पसंत नव्हती. परंतु महाराजांच्या निर्धारापुढे त्याचा निरुपाय झाला आणि अखेर तो तयार झाला आणि इथून पुढे महाराज मारुतीच्या मंदिरात वास्तव्य करू लागले. महाराजांचा भक्त भास्कर महाराजांच्या सेवेसाठी महाराजांबरोबर राहिला.

महाराज मारुतीच्या मंदिरात राहायला येताच सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला. परंतु मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या पाटील मंडळींनी महाराजांशी संघर्ष सुरू केला. पण या संघर्षामुळेच पाटील मंडळींना महाराजांचे मोठेपण कळले. पाटील मंडळीचा अहंकार दूर करून त्यांना उचित मार्ग दाखवावा ही महाराजांचीच योजना असावी.

       || श्रीहरिहरार्पणमस्तु | शुभं भवतु ||

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved