श्रीसाईसच्चरित (अध्याय ४२ मधून)
बाबांनी आपल्या निर्वाणाची तयारी केली. शके १८४० (इ.स.१९१८) मध्ये विजयादशमीचा दिवस बाबांनी निर्वाणकाळ म्हणून साधला. परंतु शके १८३८ (इ.स.१९१६) मध्ये दसऱ्याच्या दिवशीच बाबांनी आपल्या निर्वाणाचा संकेत दिला होता.
बाबा आपले कपडे जाळून टाकतात
तो १९१६ मधील विजयादशमीचा दिवस होता. संध्याकाळी शिलंगणाचा मुहूर्त. बाबांनी अचानक जमदग्नीचा अवतार धारण केला. त्यांनी आपले डोक्याला बांधायचे फडके सोडले. अंगातील कफनी काढली. अगदी कौपीन आणि लंगोटही सोडला. बाबा पूर्णपणे दिगंबर झाले. हे सारे कपडे बाबांनी धुनीत टाकली. धुनी पेटलेली होती आणि या कपड्यांचे इंधन मिळाल्यामुळे धुनीतील ज्वाळा चांगल्याच भडकल्या आणि हां हां म्हणता म्हणता कपडे जळून गेले.
एकीकडे बाबांचा तोंडाचा पट्टा चालू होता, ' घ्या एकदाचे बघून, मी हिंदू आहे की मुसलमान. शंका फेडून घ्या.'
विजयादशमीचा दिवस असल्याने बाबांना पालखीतून नेण्यासाठी चावडीपाशी लोक जमले होते. बाबांचा रुद्रावतार पाहून त्यांच्या जवळ जाण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. शेवटी बाबांचा प्रिय भक्त भागोजी शिंदा धीर करून बाबांजवळ गेला आणि त्याने बाबांना लंगोट नेसवला. बाबा हळूहळू शांत झाले आणि लोक बाबांना वाजत गाजत पालखीत बसवून घेऊन गेले.
तात्याचे मरण स्वतःवर घेतले
बाबांच्या निर्वाणाआधी रामचंद्र दादा पाटील आजारी पडले. हे आजारपण इतके विकोपाला गेले की रामचंद्र दादा पाटील जिवाला कंटाळले. अशा परिस्थितीत एकदा मध्यरात्री त्यांच्या उशाशी बाबांची मूर्ती प्रगटली. बाबांनी पाटलांना सांगितले की पाटलांवरील गंडांतर टळले आहे, परंतु तात्याची धडगत नाही. बाबांनी पाटलांस असेही सांगितले की शके अठराशे चाळीसच्या विजयादशमीस तात्याला अक्षयपदाची प्राप्ती होईल. परंतु तात्याला हे न सांगण्याविषयी बाबांनी पाटलांना बजावले. तरीसुद्धा रामचंद्र पाटलांना राहवले नाही आणि ही गोष्ट त्यांनी बाळा शिंप्याच्या कानावर घातली.
बाबांनी सांगितल्याप्रमाणे रामचंद्र पाटील बरे झाले परंतु शके अठराशे चाळीसच्या भाद्रपद महिन्यात तात्याने अंथरुण धरले. त्याला अतिशय यातना होऊ लागल्या आणि त्याला बाबांच्या दर्शनासही येता येईना. परंतु तात्याचा बाबांवर भरवसा होता.
याच सुमारास बाबांनाही शिरशिरी भरली. दुखण्यामुळे बाबांचेही कण्हणे , कुंथणे सुरू झाले.
इकडे बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ येऊ लागला तसे बाळा शिंपी आणि रामचंद्र पाटील घाबरून गेले.
तात्याची तब्येत अधिकाधिक बिघडत होती. त्याची नाडीही मंद होऊ लागली. पण प्रत्यक्षात निराळेच घडले. तात्यावरीलही गंडांतर टळले. बाबांचेच निर्वाण झाले. जणू बाबांनी आपली निर्वाणवेळ कळू नये म्हणून तात्याचे नाव पुढे केले. लोक असेही म्हणतात की तात्याचे मरण बाबांनी स्वतःवर घेतले.
निर्वाणसमयी श्री दासगणूंना दृष्टांत
बाबांनी ज्या दिवशी देह ठेवला, त्या दिवशी सकाळी पंढरपूरमध्ये दासगणूंना दृष्टांत झाला तो असा-
'मशीद पडली ढांसळोनी | अवघे शिरडीचे तेली वाणी | त्रासवूनि सोडिले मजलागूनी | जातो तेथूनि मी आता || अ.४२, ओ.७०||
म्हणोनि आलो येथवरी | फुलांही मज 'बख्खळ' डंवरी | इच्छा एवढी पुरी करी | चल झडकरी शिरडीत' || अ.४२, ओ.७०||
त्याच वेळी शिरडीहून पत्र आले. त्यामध्ये बाबा समाधिस्थ झाल्याची बातमी होती. त्यामुळे दासगणू क्षणाचाही उशीर न करता शिरडीला जाण्यास निघाले. बरोबर शिष्यपरिवार घेऊन त्यांनी समाधीसमोर अष्टौप्रहर भजन-कीर्तनाचा गजर मांडला. त्या भजन-कीर्तनाच्या गजरामुळे शिरडी म्हणजे भूवरील वैकुंठच वाटू लागले.
निर्वाणाआधी बाबांनी लक्ष्मीला नऊ नाणी दिली
बाबांवर परम भक्ती असणारी लक्ष्मीबाई शिंदे बाबांच्या निर्वाणसमयी बाबांजवळ होती. निर्वाणास काही क्षण बाकी असताना बाबांनी कफनीच्या खिशात हात घालून लक्ष्मीला एकदा पाच आणि नंतर चार अशी एकूण नऊ नाणी दिली. बाबांनी नवविधा भक्तीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीला ही नऊ नाणी दिली असे मानतात.
बाबांचे निर्वाण
बाबांना आपल्या निर्वाणाची वेळ जवळ आल्याचे कळले तेव्हा लोकांच्या जेवणाची वेळ झाली होती. बाबांनी एक दोघा ग्रामस्थांना जवळ बसवून इतरांना जेवायला जाण्यास सांगितले. अशा वेळी लोक जाण्यास तयार नव्हते, परंतु त्यांना बाबांचे मनही सोडवत नव्हते. त्यामुळे लोक जेवायला गेले, पण त्यांचे जेवणात लक्ष नव्हते. त्याच वेळी बाबांच्या निर्वाणाची बातमी आली आणि लोक जेवण अर्धवट टाकून धावत आले. बाबांनी बसल्या जागेवरच बयाजीच्या खांद्यावर डोके टेकवून निर्वाणवेळा साधली होती. बाबा लोककार्यासाठी अवतरले होते. हे कार्य पूर्ण होताच त्यांनी निर्वाणवेळा साधली. परब्रह्म हेच बाबांचे वैभव असल्याने ते जन्म-मरणाच्या अधीन नव्हते. त्यांचे निर्वाण हे सर्वसामान्यांसारखे निधन नव्हते. शिरडीच्या लोकांस मात्र दिवसा अंधार झाल्यासारखे वाटले.
🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺
उपकथा:
बाबांचा आणि लक्ष्मीचा भावबंध
बाबांचा आणि लक्ष्मीचा घनिष्ठ भावबंध होता. बाबांना दिवसभर भेटायला येणारे लोक संध्याकाळी परत जात. दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक भेटायला येत. परंतु काही ठराविक लोकांना कधीही बाबांकडे येण्याची परवानगी होती. यांमध्ये लक्ष्मीचा समावेश होता.
लक्ष्मीने दिलेली भाजी भाकर बाबा कुत्र्यास खाऊ घालतात
लक्ष्मी बाबांसाठी दररोज जेवणासाठी भाजी भाकर पाठवीत असे. एकदा संध्याकाळी बाबा तात्या पाटील यांच्याशी बोलत बसले होते. त्याच वेळी लक्ष्मी तेथे आली. त्या वेळी बाबांनी तिला खूप भूक लागल्याचे सांगितले. लक्ष्मी तत्परतेने बाबांसाठी भाजी भाकर घेऊन आली. परंतु बाबांनी ते पान सरळ उचलून कुत्र्यासमोर ठेवले. लक्ष्मी त्यामुळे खूप हळहळली आणि बाबांना म्हणाली की ,' मी तुमच्यासाठी भाजी भाकर बनवून आणली आणि ती तुम्ही कुत्र्याचे धन का केले?'
या वेळी बाबांनी तिला समजावून सांगितले की, 'या कुत्र्याची भूक आणि माझी भूक एकच आहे आणि त्याचे उदरभरण हे माझेच उदरभरण आहे. भुकेने व्याकुळ झालेल्या कुणाच्याही तोंडी घास घालणे म्हणजे मलाच अन्नदान करण्यासारखे आहे.'
लक्ष्मीने पाठवलेल्या भाकरीशिवाय बाबांचे जेवण होत नसे
येथून पुढे लक्ष्मी बाबांसाठी दररोज भाकर पाठवू लागली. ती बाबांसाठी भाकर दुधात कुस्करून ठेवी. बाबा सुद्धा प्रेमाने ही भाकर खात. नंतर तर बाबा या भाकरीची वाट पाहू लागले आणि भाकर पाठवण्यास उशीर झालेला त्यांना खपत नसे. बऱ्याचदा असे होई की इतर पात्रांतील जेवण निवडून जात असे, परंतु लक्ष्मीकडून भाकर आल्याशिवाय बाबांचे जेवण होत नसे.
लक्ष्मी बाबांसाठी शेवया पाठवू लागली
नंतर बाबा लक्ष्मीकडून तिसऱ्या प्रहरी शेवया मागवू लागले. यातील थोड्या शेवया बाबा राधाकृष्णाबाईंसाठी पाठवत.
© Dr. Hemant Junnarkar | Content protected under copyright. Reproduction without permission is prohibited.