Friday, July 18, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ३ - कर्मयोग

अर्जुन म्हणाला

बुद्धी श्रेष्ठ कर्माहून | जनार्दना, असे सांगून || या घोर कर्मात माझे नियोजन | कशास करिसी केशवा || अ.३, ओ.१||

सांगून वाक्ये मिश्रित | करसी बुद्धीस मोहित || एकच सांग निश्चित | ज्यात हित माझे || अ. ३, ओ. २||

श्रीभगवान म्हणाले

हे अनघा, मोडती या जगात | निष्ठा दोन प्रकारांत || सांख्यांची ज्ञानयोगात | कर्मयोगात योग्यांची || अ. ३, ओ.३||

न केल्याने कर्माच्या आरंभास | पुरुष न पावे नैष्कर्म्यास || किंवा सोडून कर्मास | लाभ न होई सिद्धीचा ||अ. ३, ओ.४||

क्षणभरही कोणीही न | राहू शके कर्मावाचून | सर्व कर्मे घेती करवून | गुण प्रकृतीचे ||अ. ३, ओ.५||

जो संयमित करून कर्मेंद्रियांस | मनाने करी इंद्रियांच्या स्मरणास || अशा विमूढ आत्म्यास | ढोंगी म्हणतात || अ. ३, ओ.६||

जो मनाने इंद्रियांचे नियमन करतो | आणि कर्मेंद्रियांनी कर्मयोग आरंभतो || असक्त असा तो | विशेष असे अर्जुना || अ.३, श्लो.७||

कर्म कर नेमून दिलेले | कर्म न करण्याहून ते चांगले || शरीरव्यापारही आपले | कर्मावाचून न होती ||अ.३, ओ.८||

कर्म करिता यज्ञाव्यतिरिक्त | टाकते कर्मबंधनात | आणि तरी कर्म यज्ञात | अनासक्तपणे कर, कौंतेया ||अ.३, ओ.९||

यज्ञासह करून प्रजेची निर्मिती | म्हणाले प्रजापती, || ‘यज्ञाने करून घ्या इच्छापूर्ती | यज्ञ तुमची कामधेनू || अ.३, ओ.१०||

यज्ञाने प्रसन्न करा देवांस | देव प्रसन्न करोत तुम्हास || प्रसन्न करून एकमेकांस | घ्या साधून कल्याण || अ. ३, ओ.११||

देव यज्ञाने संतुष्ट होतील | तुम्हास इच्छित वस्तू देतील || परंतु त्या देवांस न अर्पिता भोगेल | तो चोर केवळ || अ.३, ओ.१२||

अन्न उरलेले यज्ञातून | सेवन करणारे मुक्त होती पापांतून | स्वत:साठी जे शिजवती अन्न | ते भोगतात पाप ||अ.३, ओ.१३||

भूतांस  🐈 पोसते अन्न 🍚| अन्नाची  उत्पत्ती पर्जन्यातून 🌧️ || पर्जन्य उद्भवतो यज्ञातून | यज्ञ कर्माचा परिपाक || अ.३, ओ.१४||

कर्म ब्रह्मापासून उत्पन्न होते | ब्रह्म अक्षरापासून उद्भवते || म्हणजे ब्रह्म जे सर्व व्यापते | नित्य अधिष्ठित यज्ञात || अ.३, ओ.१५||

असे चक्र 🛞 प्रवर्तित | नाही पुढे चालवीत || तो पापी, इंद्रियासक्त | व्यर्थ त्याचे जीवन || अ.३, ओ.१६||

परंतु जो मनुष्य आत्म्यात रमतो | आत्म्यात तृप्त राहतो || आत्म्यातच संतोष मानतो | त्यास उरते न कार्य काही ||अ.३, ओ.१७||

काही करण्यात वा न करण्यात | लाभ न त्याच्या दृष्टीत || नसे त्याचा सर्व भूतांत | हितसंबंध काही || अ.३, ओ. १८||

म्हणून होऊन अनासक्त | कर्म करीत राहा सतत || अनासक्त कर्म करीत | पुरुष परास पावतो ||अ.३, ओ.१९||

मिळवली जनकादिकांनी | संसिद्धी कर्म करूनी ||लोकसंग्रहही पाहुनी | कर्म करणे उचित || अ.३, ओ.२०||

श्रेष्ठ जसे आचरण करीती | इतर जन तसे वागती || श्रेष्ठ जे प्रमाण ठरवती | अनुकरण करती लोक त्याचे ||अ.३, ओ.२१||

पार्था, लोकात तिन्ही | मला कर्तव्य नाही || मिळवावयाचे, न मिळवावयाचे, नसे काही | तरी कर्म करतो मी || अ.३, ओ. २२||

कारण ठेवून अवधान | जर मी कार्य न करीन ||अनुसरतील मला जन | सर्व परीने || अ.३, ओ.२३||

होईल लोकांचा ऱ्हास | जर मी न केले कर्मास ||कारण होईन संकरास | आणि घातास प्रजेच्या || अ.३, ओ. २४||

होऊन आसक्त | अज्ञानी लोक कर्म करतात ||विद्वानांनी कर्म करावे होऊन अनासक्त |लोकसंग्रहाच्या इच्छेने || अ.३, ओ.२५||

जनांचा अज्ञानी | करू नये बुद्धिभेद विद्वानांनी ||कर्मे स्वतः करूनी | इतरांकडून करवावी || अ.३, ओ.२६||

प्रकृतीचे गुण तीन | कर्मे घेती करवून || कर्मे करण्याचा अभिमान | बाळगतो अहंकारी विमूढात्मा || अ.३, ओ.२७||

हे महाबाहो, जाणून गुण आणि कर्मांची भिन्नता |  गुण गुणांच्या ठायी वर्तता || खरा तत्त्ववेत्ता | आसक्त त्यांत होत नाही || अ.३, ओ.२८||

जे आहेत प्रकृतीच्या गुणांनी मोहित | गुण आणि कर्मांत आसक्त || अशा अज्ञानी, मंदबुद्धींस करू नये विचलित | सर्वज्ञाने || अ.३, श्लो. २९||

सर्व कर्मे मला अर्पून | आध्यात्मात बुद्धी ठेवून ||युद्ध 🏹 कर निरपेक्ष, निर्मम होऊन | वैर न बाळगता || अ.३, ओ.३०||

हे माझे मत | प्रमाण मानून जे  वागतात || ते मानव श्रद्धावान, असूयारहित | होतात मुक्त कर्मातून   || अ.३, ओ. ३१||

परंतु माझे हे मत | जे अविवेकी, मूर्ख नाही अनुसरत || त्यांचा नाश निश्चित | असे जाण || अ.३, ओ.३२||

स्वतःच्या प्रकृतीस अनुसरून | वागतो ज्ञानवान ||सर्व भूतांचेही तसेच वर्तन | तेथे निग्रह काय करील || अ.३, ओ. ३३||

इंद्रिये आणि विषयांत | प्रीति-द्वेषसंबंध निश्चित ||त्यांना वश होणे न उचित | ते मार्गातील विघ्ने जणू  || अ.३, ओ.३४||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||बरे स्वधर्मात निधन |   परधर्म भयावह || अ.३, ओः३५ ||

अर्जुन म्हणाला

मग प्रयोजनाने कुठल्या | पाप होई हातून पुरुषाच्या || मनाविरुद्ध त्याच्या | इच्छा नसताना वार्ष्णेया || अ.३, ओ. ३६ ||

श्रीभगवान म्हणाले

काम किंवा क्रोध जाण | जो होतो रजोगुणातून निर्माण || तो महाखादाड, पापाची खाण | येथील वैरी आहे जणू || अ.३, ओ.३७ ||

जसा धूर  झाकतो अग्नीस 🔥 | जशी धूळ माखते आरशास 🪞|| वार वेढते गर्भास | तसा काम झाकतो ज्ञानास || अ.३, ओ.३८||

झाकतो ज्ञानी मनुष्याचे ज्ञान | काम हा नित्य वैऱ्यासमान || अग्नीप्रमाणे त्याला न समाधान | जाण कौंतेया || अ.३, ओ. ३९ ||

इंद्रिये, बुद्धी आणि मन | यांत करून अधिष्ठान ||ज्ञानास झाकून | काम आत्म्यास मोहवितो || अ.३, ओ.४०||

भरतषर्षभा, म्हणून सुरुवातीस | करून इंद्रियनियमनास || सोड पापप्रतीक कामास | ज्ञानविज्ञाननाशकास || अ.३, ओ.४१||

इंद्रिये श्रेष्ठ जाण | मन श्रेष्ठ इंद्रियांहून || बुद्धी श्रेष्ठ मनाहून | बुद्धीहून श्रेष्ठ परमात्मा || अ.३, ओ. ४२||

अशा त्या परमात्म्यास जाणून | स्वत:स स्वत: स्थिर करून || महाबाहो, घे जिंकून | दुष्कर कामरूपी शत्रूला || अ.३, ओ.४३ ||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मयोग’ नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

साप

जीभ लवलवती 
चट्टे पट्टे अंगावरी 
साप सारे 
नाही विषारी 
पाय नाही बापड्याला 
म्हणून सरपटतो 
अध्यात मध्यात नाही कुणाच्या 
सर्वांना टाळतो 
येत नाही बोलायला 
म्हणून फुत्कार टाकतो 
घाबरतो तुम्हाला 
म्हणून फणा काढतो 
उंदीर घुशी खातो 
धान्य वाचवतो 
नका उगारू लाठ्या-काठ्या | 
मित्र माना त्याला |
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved