Tuesday, July 22, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ५ संन्यासयोग

अर्जुन म्हणाला

सांगून कर्मांपासून संन्यास | पुन्हा योगाची प्रशंसा करतोस || दोन्हींत   एक कुठले कारक हितास | ते निश्चित सांग कृष्णा || अ.५, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

कर्मयोग आणि संन्यास | दोन्ही कारक हितास || तरी कर्मयोगास | विशेष महत्त्व आहे || अ.५, ओ.२||

जो न द्वेष करतो, न इच्छा धरतो | जाणावा नित्य संन्यासी तो || सहज बंधनातून मुक्त होतो | द्वंद्वमुक्त तो महाबाहो || अ.५, ओ.३||

सांख्य आणि योग वेगळे दोन्ही | म्हणती अज्ञानी, न ज्ञानी || एकाचे पालन करूनी | फळे मिळती दोन्हींची || अ.५, ओ.४||

जे स्थान सांख्यांस मिळते | योगांनीही तेथे जाता येते || ज्यास दोन्ही एकच दिसते | त्यालाच खरे दिसते   ||अ.५, ओ.५||

योगावाचून संन्यास | महाबाहो, कठीण मिळवावयास || योगयुक्त मुनीस | ब्रह्म मिळते लवकर || अ.५, ओ.६||

जो योगयुक्त, ज्याने शुद्ध केले आत्म्याला | जिंकले इंद्रियांना आणि आत्म्याला || सर्व भूतांच्या आत्म्यांत पाही स्वतःच्या आत्म्याला | तो कर्मे करूनही लिप्त न होतो || अ.५, ओ.७||

तत्त्व जाणणाऱ्याने मानणे युक्त | की,' मी काही नाही करीत’ || असताना पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत | खात, जात, झोपत, श्वास घेत- || अ. ५, ओ. ८||

-बोलत, त्याग करीत, घेत | पापण्यांची उघडझाप करीत, || इंद्रिये विषयांच्या ठायी वर्ततात | असे जो मानतो, ||अ.५, ओ.९||

आसक्ती सोडून | करतो कर्मे ब्रह्मात अर्पण || तो अलिप्त राहतो पापापासून | जसे कमलपत्र पाण्यात ||अ.५, ओ.१०||

आसक्तीचा त्याग करुनी | काया, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी || आत्मशुद्धीचे ध्येय ठेवुनी | योगी कर्म करतात || अ.५, ओ.११||

योगी कर्मफळ त्यागतो | आणि दृढ शांती पावतो || योगविहीन कर्मफळात आसक्त होतो | आणि बद्ध होतो ||अ.५, ओ.१२||

वश करतो जो इंद्रियांस | तो मनाने सोडून सर्व कर्मांस || नऊ द्वारांच्या देहरूपी नगरात, सुखात करतो वास | कर्मे न करता न करविता ||अ.५, ओ.१३||

लोकांच्या कर्तृत्वाची किंवा कर्माची | तसेच कर्मफळसंयोगाची || स्वभावातून उत्पत्ती होते त्यांची | प्रभू न त्यांस निर्मितो ||अ.५, ओ.१४||

कुणाच्या पाप-पुण्यास | न घ्यावयाचे प्रभूस || अज्ञानाने झाकल्याने ज्ञानास | मोह पावतात जीव || अ.५, ओ.१५||

ज्यांचे ते अज्ञान | आत्मज्ञानाने गेले नाश पावून || 

त्यांचे ते ज्ञान सूर्यासमान | प्रकाशित करते परास ||अ.५, ओ.१६||

त्या ज्ञानात ज्यांची बुद्धी आणि आत्मे स्थिर झाले I जे त्या ज्ञानाशी निष्ठ आणि परायण झाले II त्या ज्ञानाने त्यांचे दोष जाती धुतले I पुनर्जन्मास न जाती ते II अ.१५,ओ.१७II

विद्याविनयसंपन्न ब्राह्मणास | गायीस आणि हत्तीस || कुत्र्यास आणि चांडाळास | समदृष्टीने पाहती पंडित || अ.५, ओ.१८||

ज्यांच्या मनात समभाव स्थिर झाला असे | त्यांनी येथेच जन्म-मृत्यू जिंकला असे || ब्रह्म निर्दोष आणि सम असे | त्यामुळे ब्रह्मात स्थिर ते झाले || अ.५, ओ.१९||

प्रिय वस्तू मिळता होई न आनंदित | अप्रिय घडता होई न दु:खित || ब्रह्मज्ञानी स्थिर ब्रह्मात | विवेकी आणि स्थिर बुद्धीचा || अ.१५, ओ.२०||

तो बाह्यस्पर्शांत न आसक्त | स्वत:मध्ये होते त्याला सुख प्राप्त || तो ब्रह्मयोगाने युक्त | अक्षय सुख मिळवतो || अ.५, ओ.२१||

स्पर्शातून भोग उत्पन्न होती | तेच दु:खास कारण होती || कौंतेया, ते आरंभती तसेच अंतास जाती | जाणता न रमतो त्यांत ||अ.५, ओ.२२||

वेग कामक्रोधातून उत्पन्न | येथेच जो करू शकतो सहन || करण्याआधी शरीरविमोचन | तो योग्य, तो सुखी नर || अ.५, ओ.२३||

जो असे अंतरी सुखात I आनंदात आणि प्रकाशात II तो योगी ब्रह्मभूत | ब्रह्मनिर्वाण मिळवतो || अ.५, ओ.२४||

पाप ज्यांचे क्षीण झाले | द्वंद्वमुक्त होऊन स्वतःस ज्यांनी नियंत्रित केले ||  सर्व भूतांच्या हितात जे रमले | असे हे ऋषी ब्रह्मनिर्वाण पावती ||अ.५, ओ.२५||

काम-क्रोध ज्यांचे सुटले | चित्त ज्यांनी नियंत्रित केले | स्वत:स ज्यांनी जाणले | ब्रह्मनिर्वाण अशा  यतींच्या सन्निध  असते || अ.५, ओ.२६||

बाह्यविषयांस ठेवून बाहेर | भुवयांच्या मध्यभागी दृष्टी करून स्थिर || नाकाच्या अंतर्भागात करणाऱ्या  संचार | प्राण-अपानांची सारखी ठेवून गती || अ.५, ओ.२७||

-मन, बुद्धी आणि इंद्रिये नियंत्रित करून | इच्छा, भय आणि क्रोध सोडून || राहतो जो मुनी मोक्षपरायण | तो मुक्तच सदैव || अ.५, ओ.२८||

भोक्ता सर्व यज्ञांचा आणि तपांचा | महान ईश्वर सर्व जगाचा || सुहृद सर्व भूतांचा | अशा मला जाणून, शांती पावतो ||अ.५, ओ.२९||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘संन्यासयोग’ नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved