Sharing knowledge, experiences etc. on all subjects such as travel, literature, spiritualism
Friday, July 18, 2025
साप
Thursday, July 17, 2025
श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ - सांख्ययोग
संजय म्हणाला
करुणापूर्ण तशा अर्जुनाला | व्याकूळ, अश्रुपूर्ण दिसणाऱ्याला || विषाद करणाऱ्याला | मधुसूदन हे वाक्य बोलले || अ.२, ओ.१|
श्रीभगवान म्हणाले
कोठून हे तर्कट अर्जुना | अशा अवेळी आले तुझ्या मना || जे नेते दूर स्वर्गापासून, न शोभते आर्यांना | आहे अपकीर्तीचे कारण ||अ.२, श्लो.२||
नकोस पडू कमकुवतपणास बळी | तुला न हा शोभतो मुळी || मन:स्थिती क्षुद्र दुबळी | सोडून ऊठ परंतपा || अ.२, श्लो.३||
अर्जुन म्हणाला
कसा मी या युद्धात पण | पूज्य आम्हाला जे भीष्म-द्रोण || त्यांच्यावर उलट सोडू बाण | सांग मधुसूदना ||अ.१, ओ.४||
महान गुरूंस मारणे | यापेक्षा बरे, भीक मागून जगणे || जरी हे गुरू पैशासाठी ओशाळवाणे | हत्येचे भोग असतात रक्तरंजित ||अ. २, ओ. ५ ||
नकळे मला दोन्हींत बरे काय | मिळवावा की न मिळवावा जय || ज्यांना मारून जगण्यात न स्वारस्य | ते धार्तराष्ट्र युद्धास सिद्ध ||अ. २, ओ.६||
गोंधळली वृत्ती, झाले कुंठित मन | धर्माविषयी मला न ज्ञान || भले काय ते सांग समजावून | शिष्य मी तुझा, सांग मला शरणागताला || अ.१, ओ.७||
कसे दूर करू, मला न कळते | दु:ख जे इंद्रियांचे शोषण करते || जरी निष्कंटक राज्य पृथ्वीचे मिळते | आणि देवांचे आधिपत्य ||अ. २, ओ.८||
संजय म्हणाला
बोलून असे हृषीकेशास | गुडाकेश, जो ताप देई शत्रूंस || 'नाही करणार युद्धास'| असे बोलून शांत झाला ||अ.२, ओ.९||
हृषीकेश बोलला त्यास | भारता, करून जणू हास्यास || विषाद करणाऱ्या अर्जुनास | दोन्ही सैन्यांच्यामध्ये || अ.२, ओ.१०||
श्रीभगवान म्हणाले
ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस | पोकळ पांडित्य सांगतोस |I नसे दु:ख खऱ्या ज्ञानी लोकांस | आल्यागेल्यांचे ||अ.२, ओ.११||
तुला, मला, या राजांस | वा आपणां सर्वांस ||नव्हता जन्म पूर्वी, न यावयाचे जन्मास | असे काही नाही || अ. २, ओ. १२||
आत्म्यास या देहात जशा लाभती | बालपण, तारुण्य, म्हातारपण या स्थिती |I तशीच होते त्याला नव्या देहाची प्राप्ती | त्यामुळे ज्ञानी मोह न पावतो || अ. १, ओ. १३ ||
कौंतेया, स्पर्शसंवेदना उत्पन्न होती | शीत वा उष्ण, सुख वा दु:ख देती || त्या येती तशा जाती | कर सहन त्यांना || अ.१, ओ.१४||
या संवेदना व्यथा न देती ज्या ज्ञानी पुरुषाला | पुरुषश्रेष्ठा, सांगतो तुला || सुख आणि दु:ख सारखे ज्याला | तो अमृतत्वाला पात्र होतो ||अ.२, ओ. १५||
असत् होई न भाव | सत् होई न अभाव || असा या दोन्हींचा पाहिला ठाव | तत्त्वदर्शी लोकांनी ||अ.२, ओ.१६||
जाण अविनाशी अव्ययास | ज्याने व्यापिले या सर्वास || त्याच्या विनाशास | कोणीही समर्थ नाही || अ. २, ओ.१७||
नित्य, अविनाशी, अप्रमेय आत्म्याने या | धारण केलेल्या काया | अंती जाती विलया | त्याकरिता युद्ध कर || अ. २, ओ.१८||
जो मानतो मारणारा आत्म्यास | किंवा जो मानतो मेलेला त्यास || कळत नाही त्या दोघांस | हा न मारतो न मारला जातो || अ. २, श्लो. १९||
आत्मा नाही जन्मत, नाही मरत | नाही तो झाला, नाही होत || तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित | शरीर नष्ट करिता, नाही मारला जात || अ.२, श्लो. २० ||
ज्या पुरुषास ज्ञात | की आत्मा नित्य, अव्यय, जन्मरहित || तो पुरुष कसा करवील कुणाचा घात | किंवा मारील कुणास? || अ.२, श्लो. २१||
जसा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून | नवी वस्त्रे करतो परिधान || तसा आत्मा जुनी शरीरे सोडून | नव्या शरीरात जातो || अ.२, श्लो. २२||
तुटे न हा शस्त्राने | जळे न हा अग्नीने || भिजे न हा पाण्याने | न सुकवी वारा यास || अ.२, ओ.२३||
न हा तोडला वा जाळला जातो | न भिजवला वा सुकवला जातो || नित्य, स्थिर, सर्वत्र राहतो | अचल हा सनातन || अ. २, ओ. २४||
हा अचिंत्य, अव्यक्त | अविकार्य यास बोलतात || हे झाल्यावर ज्ञात | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.२५||
हा जन्मतो आणि मरतो नियमित | असे जरी असेल तुझे मत |I तरी शोक करणे न उचित | महाबाहो तुला ||अ. २, ओ. २६ ||
मृत्यू हा जन्माचा संपात | तसा जन्म हा मृत्यूचा संपात || याचे भान ठेवीत | योग्य नाही शोक करणे ||अ.२, श्लो. २७||
आरंभी ही भूते अव्यक्त असती | मध्ये व्यक्त दिसती || अखेर अव्यक्तातच विलीन होती | तिथे शोक कशासाठी || अ. २, श्लो. २८||
कुणी आत्म्यास आश्चर्यकारक म्हणून पाहती | कुणी आश्चर्यकारक बोलती || कुणी आश्चर्यकारक म्हणून ऐकती | आणि ऐकूनसुद्धा त्यास, जाणे न कुणीही || अ. २, ओ. २९ ||
भारता, आत्मा राहतो देहात | आत्मा आहे अवध्य, शाश्वत || तेव्हा सर्व भूतांप्रत | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.३०||
आणि पाहताही स्वधर्मास | वाव नसे विचलित होण्यास |I कारण यु्द्धाहून क्षत्रियास | हितकारक काही नसे || अ. २,ओ. ३१||
काही सायासांवाचून | स्वर्गाचे दार ठेविले उघडून |I क्षत्रियांस भाग्यवान | युद्ध असे लाभते || अ.२, ओ.३२||
जाणूनही धर्मास | न करशील या युद्धास || पात्र होशील पापास | स्वधर्म आणि कीर्ती गमावून || अ. २, ओ. ३३ ||
अपकीर्ती तुझी करतील | जन हे सकल ||संभावितास अपकीर्तीचा सल | मरणाहून असह्य || अ. २, ओ.३४||
महारथी म्हणतील, 'अर्जुन | पळाला रणातून घाबरून ' |I करतील तुझे अवमूल्यन | जे तुला मानतात || अ.२, ओ.३५||
बोलू नये ते बोलतील | पुष्कळ तुझ्याबद्दल || तुझे सामर्थ्य कमी लेखतील | त्याहून काय दु:खदायक || अ.२, ओ.३६||
मारला गेल्यास मिळवशील स्वर्गास | जिंकल्यास भोगशील पृथ्वीस || म्हणून कौंतेया, ऊठ युद्धास | दृढनिश्चय करूनी || अ.२ ओ. ३७||
समान मानून सुख-दु:खास | लाभ-हानी, जय-पराजयास || करशील जर युद्धास | लागणार नाही पाप तुला || अ.२, ओ.३८||
हे ज्ञान सांगितले सांख्यातील | ऐक ज्ञान आता योगातील || जे जाणून मुक्त होशील | कर्मबंधातून || अ.२, ओ.३९||
योगात आरंभिले कार्य नाश न पावते | न आरंभिल्या कार्यात विघ्न येते || मोठ्या भयापासून रक्षण करते | या धर्माचे अल्प आचरण || अ.२, ओ.४०||
जी व्यस्त असे योगात | एकत्व राहे त्या बुद्धीत || जी नसे योगात व्यस्त | त्या बुद्धीला अनंत शाखा फुटती || अ.२, ओ.४१||
अज्ञानी लोक भाषा फुलवती | आणि बोलती ||वेदांच्या वादात रंगून म्हणती, | ‘नसे दुसरे काही’ || अ.२, ओ.४२||
‘विविध विशेष क्रियांचे फळ म्हणून | भोग आणि ऐश्वर्य देणारा जन्म येतो चालून’, || म्हणती हे जन | इच्छा आणि स्वर्गाच्या पाठी जे असती ||अ.२, ओ.४३||
भोग आणि ऐश्वर्य ध्येय एक | मानून गमावती विवेक || त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक | होते न स्थिर || अ.२, ओ. ४४||
वेद आहेत त्रिगुणांनी युक्त | अर्जुना, तू हो त्रिगुणरहित || नेहमी सत्त्वगुणी, द्वंद्वापासून मुक्त | योगक्षेमापासून दूर, आत्मनिष्ठ || अ. २, ओ.४५||
जळाने 🌊 व्यापता सर्व बाजूंस | कोण विचारी विहीरीस || तेवढीच किंमत वेदांस | देई ज्ञानी ब्राह्मण || अ.२, ओ. ४६ ||
अधिकार तुझा केवळ कर्मावर | नाही कधीही कर्मफलावर || कर्मफलहेतूस ठेव दूर | कर्म मात्र टाळू नको || अ.२, ओ.४७||
कर कर्मे योगात राहुनी | धनंजया, आसक्ती सोडुनी || सिद्धी-असिद्धी समान मानुनी | या समानतेस योग म्हणती || अ.२, श्लो. ४८||
कर्म फार न्यून | धनंजया, बुद्धियोगाहून || फळाचा 🍑 हेतू असणारे जन असती कृपण I म्हणून तू बुद्धीचा आधार घे || अ.२, ओ.४९||
बुद्धियुक्त त्यागतो उभय | पाप आणि पुण्य || तेव्हा योगाचा घे आश्रय | कर्मातील कौशल्य म्हणजेच योग || अ. २, ओ. ५०||
कर्मातून झालेले उत्पन्न | फळ, बुद्धियुक्त जन टाकून || मुक्त होती जन्मबंधनातून | जाती निरामय पदाला || अ. २, ओ. ५१||
जेव्हा मोहाचे जंगल 🌴 🌴🌴| बुद्धी पार करील || तुला निरुपयोगी वाटेल | ऐकलेले आणि ऐकावे असे || अ. २, ओ.५२||
श्रुतींमुळे झालेली चंचल | होईल जेव्हा निश्चल ||बुद्धी समाधीत अचल | तेव्हा साधशील योग || अ.२, ओ.५३||
अर्जुन म्हणाला
‘स्थितप्रज्ञ, जो समाधीत स्थिर झाला | केशवा सांग मला | बोलेल काय शब्दांला | असेल कसा, वागेल कसा’ || अ.२, ओ.५४||
श्रीभगवान म्हणाले
‘हे पार्था, स्थितप्रज्ञ म्हणती त्यास | जो सोडून सर्व इच्छांस || मानतो संतोषास | स्वत:च्याच ठायी || अ.२, ओ.५५||
जो न उद्विग्न दु:खात | ज्याची इच्छा न सुखात || जो प्रेम, राग, भीतीपासून मुक्त | स्थितप्रज्ञ म्हणती त्यास ||अ.२, ओ.५६||
सर्वत्र जो अनासक्त | शुभ आणि अशुभापासून अलिप्त || हर्ष आणि द्वेषापासून मुक्त | स्थिर त्याची बुद्धी || अ.२, श्लो.५७||
जो घेतो आवरूनी | इंद्रिये इंद्रियविषयांपासुनी | कासव 🐢 जसे अवयव सर्व बाजूंनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ.२, ओ.५८||
जीवात्म्याची निराहारातुनी | निवृत्ती होई विषयांतुनी, न त्यांच्या आसक्तीतुनी || निवृत्ती आसक्तीतुनी | होई पराच्या दर्शनाने ||अ.२, ओ.५९||
पुरुषाने ज्ञानी | प्रयत्नही करूनी || मन दुसरीकडे नेती ओढुनी | त्रासदायक इंद्रिये || अ. २, ओ.६०||
तेव्हा इंद्रियांस करून संयमित | युक्त हो माझ्यात || इंद्रिये ज्याची ताब्यात | स्थिर त्याची बुद्धी || अ. २, ओ. ६१||
विषयांचे जो करी चिंतन I विषयासक्त होई त्याचे मन II काम जन्मतो विषयांतून I कामातून जन्म क्रोधाचा || अ. २, ओ. ६२||
जन्म क्रोधातून संमोहाचा I संमोहातून स्मृतिनाशाचा II स्मृतिनाशातून बुद्धिनाशाचा I बुद्धिनाशातून होई सर्वनाश || अ. २, ओ. ६३||
जो मुक्त आसक्ती आणि द्वेषापासून | इंद्रियांना ठेवून स्वाधीन || वावरतो विषयांतून || तो विधेयात्मा प्रसन्नता पावतो || अ.२, ओ.६४||
पावता प्रसन्नतेस | दु:खे जाती लयास || स्थिरता येई बुद्धीस | लगेच || अ.२, ओ.६५||
बुद्धीचा लाभ न अयुक्तास | न जाणी तो भावनेस || भावनेअभावी न शांती त्यास | नसता शांती नसे सुख त्यास || अ।२, ओ.६६||
भटकता इंद्रियांनी | त्यांच्या पाठी जाऊनी || मन बुद्धीस नेते ओढुनी | जसा वारा 🌬️ ओढतो पाण्यातील 🌊 नावेस 🚢||अ.२, श्लो. ६७||
महाबाहो म्हणूनी | इंद्रियांस विषयांपासूनी || घेतो जो आवरूनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ. २, श्लो.६८||
सर्व भूतांसाठी रात्र 🌃 होता | संयमी राखतो जागृतता || सर्व भूते जागी राहता | मुनी पाही रात्र ती || अ.२, ओ६९||
सर्व बाजूंनी भरताही जल | समुद्र 🌊 जसा राहतो आपल्या मर्यादेत अचल || तसा जो राहतो स्थिर, इच्छांत सकल | तो पावतो शांती, न भोगेच्छू || अ.२, ओ.७०||
जो सर्व इच्छांचा त्याग करतो | आणि नि:स्पृहपणे राहतो || निर्मम निरहंकारी पुरुष तो | पावतो शांती || अ.२, ओ.७१||
पार्था, हीच ती ब्राह्मी स्थिती | प्राप्त होता न मोह पावती || अंतकाळीही स्थिर राहती | पावती ब्रह्मनिर्वाणास || अ.२, ओ.७२||
अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'सांख्ययोग' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 © Dr Hemant Junnarkar
All rights reserved
Wednesday, July 16, 2025
श्रीमद्भगवदगीता-अध्याय १- अर्जुनविषादयोग
धृतराष्ट्र म्हणाला
कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र I तेथे युद्धासाठी जमलेले एकत्र II पांडव आणि माझे पुत्र I करतात काय, सांग संजया II अ.१ ओ.१ II
संजय म्हणाला
पांडवांचे विशाल सैन्य पाहून I राजा दुर्योधन II आचार्यांजवळ जाऊन I असे म्हणाला, II अ.१ ओ.२ II
‘पांडुपुत्रांचे हे मोठे सैन्य I बघून घ्या आचार्य II द्रुपदपुत्र, तुमचा बुद्धिमान शिष्य, I त्याने रचलेले II अ.१ ओ.३ II
युद्धात येथे महाधनुर्धर I भीम आणि अर्जुन शूर II तसेच महारथी थोर I युयुधान, विराट, द्रुपद II अ.१ ओ. ४II
धृष्टकेतु आणि चेकितान I काशिराज वीर्यवान II पुरुजित्, कुंतिभोज वीर महान I तसाच शैब्य नरश्रेष्ठ II अ.१ ओ. ५II
युधामन्यू आणि विक्रांत | उत्तमौजा वीर्यवंत ||सौभद्र आणि द्रौपदीचे सुत | सारेच महारथी ||अ.१ ओ.६ ||
आता जे विशेष आमचे | नायक माझ्या सैन्याचे || ज्ञान करून देतो त्यांचे | तुम्हास हे द्विजोत्तम || अ. १ ओ.७ ||
भीष्म आणि स्वत: आपण | नेहमी जिंकणारे कृप आणि कर्ण || अश्वत्थामा, विकर्ण | तसाच सौमदत्ती || अ. १, ओ. ८ ||
आणखी आहेत पुष्कळ शूर | माझ्यासाठी जिवावर उदार || जाणती विविध शस्त्रांचा वापर | सारे निपुण युद्धात || अ. १, ओ. ९ ||
असे अमर्याद सैन्य आमचे | भीष्म करती रक्षण ज्याचे || मर्यादित परी हे सैन्य त्यांचे | रक्षिलेले भीमाने || अ.१, ओ.१०||
सर्व व्यूहद्वारस्थानी | नेमून दिलेल्या ठिकाणी राहूनी || करावे आपण सर्वांनी | भीष्मांचेच रक्षण’ || अ.१, ओ. ११||
मग कुरुवृद्ध प्रतापवान पितामहांनी | सिंहगर्जना करूनी || शंख फुंकूनी | आनंदित केले दुर्योधना || अ.१, ओ.१२ ||
तेव्हा शंख आणि भेरी | पणव, आनक, गोमुख अशी वाद्ये सारी || नाद करती भारी | एकदम वाजू लागता || अ.१ ओ.१३ ||
तेव्हा युक्त शुभ्र घोड्यांनी | रथात मोठ्या बैसुनी || करीती दिव्य शंखांचा ध्वनी | माधव आणि पांडव || अ.१, ओ.१४||
पांचजन्य हृषीकेशाने | देवदत्त धनंजयाने || पौंड्र भीमकर्मा वृकोदराने | शंख असे वाजविले || अ. १, ओ. १५II
अनंतविजय, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने | सुघोष नकुलाने || मणिपुष्पक सहदेवाने | शंख असे वाजविले || अ. १, ओ.१६II
काशिराज धनुर्धर-शिरोमणी | शिखंडी महारथी अग्रणी || ध्रुष्टद्युम्न आणि विराट नृमणी | अपराजित सात्यकी || अ.१, ओ. १७||
द्रुपदराजा आणि पुत्र द्रौपदीचे | सौभद्र, बाहू मोठे ज्याचे || सर्वांनी विविध शंखांचे | नाद केले महाराज || अ.१, ओ. १८||
तो घोष पडता कानी | धार्तराष्ट्रांची हृदये गेली विदीर्ण होऊनी || त्या नादाने गेले दुमदुमुनी| पृथ्वी आणि आकाश ||अ. १, ओ. १९||
धार्तराष्ट्रांस सिद्ध पाहून | रथावरी ज्याच्या शोभे हनुमान || तो पांडव धनुष्य उचलून | शस्त्रप्रहार करण्याआधी || अ. १, ओ.२०||
वाक्य असे हृषीकेशाला | हे राजा बोलला ||
अर्जुन म्हणाला
'हे अच्युता, आण रथ आपला || दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी || अ.१, ओ.२१II
मला आहे निरीक्षण करायचे | युद्धासाठी इच्छुकांचे || कुणाविरुद्ध मला लढायचे | या रणसंग्रामात || अ.१ ओ. २२||
मला आहे अवलोकन करायचे | युद्धास एकत्र आलेल्यांचे || धार्तराष्ट्राच्या दुर्बुद्धीचे I प्रिय इच्छिणाऱ्यांचे || अ. १, ओ. २३ ||
असे सांगता त्या क्षणास | गुडाकेशाने हृषीकेशास || हृषीकेशाने आणून त्या उत्तम रथास || हे भारता, दोन्ही सैन्यांमध्ये- || अ. १ ओ २४ ||
-सर्व राजांच्या, | समोर भीष्मद्रोणांच्या ||
श्रीभगवान म्हणाले
'समोर जमलेल्या या | कुरूंना पहा पार्था’ || अ. १, ओ. २५ ||
तेथे पार्थाने पाहिले | काका आणि आजोबा आपले || आचार्य, मामा, भाऊ उभे ठाकले | मुलां-नातवंडां-मित्रांसह || अ. १ ओ. २६ ||
सुहृद आणि श्वशुर | दोन्ही सैन्यांत समोर || बंधू सारे युद्धास तयार | पाहून तो कौंतेय || अ. १, ओ. २७II
होऊन फार करुणा-ग्रस्त | बोलला होऊन दु:खित ||
अर्जुन म्हणाला,
‘पाहून हे उपस्थित | युद्धासाठी स्वजन || अ.१, ओ. २८||
अवयव जातात गळून | तोंडास कोरड पडून || कापरे भरून | काटा येतो अंगावर || अ. १, ओ. २९||
गांडीव धनुष्य हातातून गळते | त्वचा सारी जळते || उभे न मला राहवते | भटकते माझे मन ||अ. १, ओ. ३० ||
लक्षणे सारी निश्चित | केशवा, विपरीत दिसतात || न दिसे काही हित | स्वजनांस युद्धात मारूनीया || अ.१, श्लो. ३१||
नको मला विजय | नकोत सुखे, नको राज्य || गोविंदा, कामाचे ते काय | राज्य किंवा जीवन || अ.१, ओ.३२||
ज्यांच्यासाठी इच्छा करायची | राज्य, भोग आणि सुखांची || त्यांची तयारी युद्धाची | प्राण आणि धन सोडून || अ.१, ओ.३३||
आचार्य, पुत्र, पितर | पितामह बरोबर || मामा, नातवंडे, श्वशुर | मेहुणे आणि इतर नातलग || अ. १, ओ. ३४ ||
मी न इच्छितो यांस मारण्याला | मधुसूदना, जरी गेलो मारला || किंवा दिले जरी त्रैलोक्याचे राज्य मला | काय कथा पृथ्वीची || अ.१, ओ. ३५ ||
मारून धार्तराष्ट्रांस | जनार्दना, सुख काय आम्हास || पापच येईल आश्रयास | या आततायांस मारिता || अ.१, ओ.३६ ||
न योग्य मारणे आम्ही त्यांना | स्वबांधवांना - धार्तराष्ट्रांना || कसे मारून स्वजनांना | व्हावे सुखी माधवा || अ. १, ओ. ३७ ||
लोभामुळे झाला यांचा | नाश बुद्धीचा || दिसे न दोष कुळक्षयाचा | आणि पाप मित्रद्रोहाचे || अ.१, ओ.३८||
मला न येई उमगून | कसे निवृत्त व्हावे या पापातून || स्पष्ट दिसत असून | कुलक्षयाचा दोष जनार्दना || अ.१, ओ. ३९||
नाश होता कुळाचा | -हास होतो सनातन कुळधर्माचा || बसे पगडा अधर्माचा | कुळावरी साऱ्या || अ.१, ओ. ४०||
कृष्णा, अधर्म माजता | कुलस्त्रिया जाती अध:पाता || वार्ष्णेया, स्त्रिया दूषित होता | वर्णसंकर होतसे ||अ.१, ओ.४१||
कुलनाशकांच्या कुळात संकर घडतो | तो नरकास कारण होतो ||पितरांचेही पतन घडवतो I पिंडोदकक्रियांचा लोप होता ||अ.१, ओ.४२||
वर्णसंकरकारक या | दोषांनी कुलनाशकांच्या || जाती लया | शाश्वत जातिधर्म, कुलधर्म || अ.१, ओ. ४३||
कुलधर्म लयास गेलेल्या | जनार्दना, अशा मनुष्यां || नरकात लागे राहावया | असे आम्ही ऐकतो || अ.१, ओ. ४४ ||
अरेरे, केवढ्या पापास | तयार झालो करावयास || मिळवण्या राज्यसुखास | उठलो स्वजन मारण्या || अ.१, ओ.४५||
मी न करताही प्रतीकार | हाती न धरताही हत्यार || धार्तराष्ट्र करतील माझा संहार | परवडेल ते मला’ ||अ.१, ओ. ४६||
अर्जुन असे रणात बोलून | गेला रथात बसून || धनुष्यबाण टाकून | शोकाकुल मनाने ||अ.१, ओ.४७||
अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'अर्जुनविषादयोग' नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved
शिवगीता - अध्याय ३- विरजादीक्षानिरूपण
अगस्त्य ऋषी म्हणाले-
कामक्रोधादिकांनी जो पीडित | तो हिताचे नाही ऐकत | मरण इच्छिणाऱ्याला नाही रुचत | जसे औषध 💊 ॥अ. ३, ओ. १ ॥
हे नरश्रेष्ठा, मायावी दैत्य रावण सीतेला | समुद्रांतरी 🌊 घेऊन गेला | तिला परत आणायला | शक्य आहे का तुला? ॥अ. ३, ओ. २॥
देवता दारी 🚪 ज्याच्या | बांधल्या माकडांच्या 🐒 कळपासारख्या | चवऱ्या 🪭 ढाळण्यास देवस्त्रिया | ज्याच्यापाशी आहेत || अ. ३, ओ.३||
शंभूच्या वराने गर्व चढल्याने | त्रैलोक्य भोगतो निष्कंटकपणे. | त्याच्यावर जय मिळवणे | तुला शक्य कसे होईल? || अ.३, ओ.४ ||
शिवाच्या वराने उन्मत्त | झाला आहे ज्याचा पुत्र इंद्रजित | त्याच्यासमोर कितीदा युद्धांत | देवांनी पळ काढला || अ.३, ओ.५ ||
कुंभकर्ण नावाचा भ्राता ज्याचा | नाश करण्यास समर्थ देवांचा | दिव्यास्त्रांनी 🏹 सुसज्ज आणि चिरंजीव ज्याचा | दुसरा भ्राता बिभीषण || अ.३, ओ.६||
लंका नावाच्या ज्याच्या दुर्गास 🏯 | जिंकणे कठीण देवदानवांस | ज्याच्या चतुरंग सैन्यास | कोटींच्या संख्येत मोजावे लागते || अ.३, ओ.७||
नृपनंदना, अशा त्या रावणास | इच्छितोस एकट्याने जिंकण्यास | जसा बालक🧒 चंद्र 🌙 धरण्यास | प्रयत्न करतो || अ.३, ओ.८||
श्रीराम म्हणाला-
मुनिश्रेष्ठ, मी आहे क्षत्रिय धर्माने | माझी भार्या हरण केली राक्षसाने | निष्फळ नाही का माझे जगणे | जर मी लवकर मारले नाही त्या राक्षसाला ? || अ. ३, ओ.९ ||
तुमच्या या तत्त्वज्ञानाचे म्हणून | काही नाही मला प्रयोजन | कामक्रोधादिक करती दहन 🔥 | माझ्या या तनूला || अ.३, ओ.१०||
अहंकारही जीवनास माझ्या | सज्ज आहे नाश करण्या. | शत्रूने हरण केली असता भार्या | किंवा केला असता अपमान-|| अ.३, ओ.११ ||
-जो तत्त्वज्ञानाचा भुकेला असेल | तो नराधम समजावा या जगातील 🌎. | तेव्हा समुद्र 🌊 ओलांडून रणात रावणाचा वध करता येईल | असा उपाय सांगावा || अ. ३, ओ.१२||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
असे जर म्हणतोस | तर शरण जा त्या अविनाशी पार्वतीपतीस | तो पावता प्रसन्नतेस | इच्छिलेले देईल || अ.३, ओ.१३||
रावण जो जिंकता येईना | ब्रह्मा, विष्णू आणि देवादिकांना | तो शंकराच्या अनुग्रहाविना | तुला कसा मारता येईल? || अ.३, ओ.१४||
मी शिवाच्या विरजामार्गाचा आश्रय घेतला | त्याच मार्गाची 🛣️ दीक्षा मी देतो तुला | त्या मार्गाने त्यागून मर्त्यत्वाला 💀| तेजोमय 🚨 हो || अ. ३, ओ.१५ ||
याच्या योगाने रणात मारून सर्व शत्रूंस | पूर्ण करून सर्व इच्छांस | भोगून भूमंडलास 🌎| साधशील शिवाशी सायुज्यता || अ.३, ओ.१६ ||
सूत म्हणाला-
मग त्या मुनिश्रेष्ठांस | राम करून दंडवत् प्रणिपातास | पावून दु:खमुक्तीस | हर्षयुक्त अंत:करणाने म्हणाला-|| अ.३, ओ.१७||
श्रीराम म्हणाला-
हे मुने, मी झालो कृतार्थ फार | पूर्ण केलेत माझे मनोरथ पुरेपूर | पिऊन गेलात तुम्ही सागर 🌊| तुम्ही जर प्रसन्न माझ्यावर | काय दुर्लभ मला मुनिवर | विरजादीक्षेविषयी मला सांगा || अ. ३, ओ.१८ ||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
करावा आरंभ या व्रतास | शुक्ल पक्षातील अष्टमी, एकादशी वा चतुर्दशीस | असताना सोमवार दिवस | साधून आर्द्रा नक्षत्र || अ.३, ओ.१९ ||
वायू, रुद्र, अग्नी 🔥 आणि परमेश्वर | या सर्वांहून जो थोर | श्रेष्ठांहून श्रेष्ठ खरोखर | अशा शिवाचे, || अ. ३, ओ.२०||
जो आहे उत्पत्तिस्थान ब्रह्मा, विष्णू, अग्नी 🔥 आणि वायू यांचे | ध्यान करून त्या सदाशिवाचे | (ज्ञानरूप) अग्नीने 🔥 आवसथ्य 🏠 (=घरातील) अग्नीचे | शुद्धीकरण करून (=गृहाग्नीमागील मूळ हेतू जाणून) - || अ.३, ओ.२१||
पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवून | त्यांच्या पाच, चार, तीन | इत्यादी मात्रांच्या (=गुणांच्या) विधिक्रमाने त्यांचे ध्यान करून | त्यापुढे- || अ.३, ओ.२२ ||
अमात्र अशा (=मोजता येणार नाही अशा) एकमात्रास (=ओंकाराच्या एकमेव ध्वनीस) | स्थिर करून द्वादशस्थानास (=भ्रुकुटीच्या थोडे वर) | प्राप्त करून अमरत्वास | पाशुपत व्रत आचरावे || अ. ३, ओ.२३||
हे पाशुपत व्रत मी करीन | असा प्रातःकालींच 🌄 संक्षेपाने संकल्प करून | आपल्या शाखेच्या विधीस अनुसरून | अग्निस्थापन 🔥 करावे || अ. ३, श्लो. २४ ||
स्नान करून शुचिर्भूत होऊन | शुभ्र वस्त्र, शुभ्र यज्ञोपवीत, शुभ्र फुलांच्या माळा माळून | श्वेतचंदनाची उटी लेऊन | धरून उपवास- || अ.३, ओ. २५||
होऊन एकाग्रचित्त | 'प्राणापानादि' विरजामंत्र जपत | अनुवाक (=पठण) संपेपर्यंत | समिधा, आज्य (=तूप), चरु (=शिजवलेला भात) इत्यादिकांचे हवन करावे || अ.३, ओ.२६ ||
'याते अग्ने' (=' हे अग्ने, तू ये') इत्यादी मंत्र उच्चारून | आत्म्याच्या ठिकाणी अग्नीची कल्पना करून | 'अग्निरिति' ('अग्निरिति भस्म' म्हणजे 'हे भस्म म्हणजे अग्नी आहे') इत्यादी मंत्र म्हणून | भस्म अंगाला लावावे || अ. ३, ओ. २७ ||
विद्वान होता भस्माच्छादित | महापातकांपासून होतो मुक्त | खरोखर होतो मुक्त | ह्यांत संशय नाहीं || अ. ३, ओ.२८ ||
भस्म हे अग्नीचे वीर्य जाण | त्यामुळे जो करतो भस्मधारण, भस्मस्नान | तो होतो वीर्यवान. | भस्मशयन करणारा होतो जितेंद्रिय, || अ.३, ओ.२९||
सर्व पापांतून होतो मुक्त | शिवाशी सायुज्यता करतो प्राप्त | तेव्हा तू आण आचरणात | तुला हे जे सांगितले || अ. ३, ओ.३० ||
आता मी शिवसहस्रनाम देतो तुला | ज्याने तुझी सर्व कार्ये जातील सिद्धीला. |
सूत म्हणाला-
असे बोलून अगस्त्य ऋषींनी रामाला | शिवसहस्रनाम दिले || अ.३, ओ.३१||
आणि रामाला केले कथन | 'हे सहस्त्रनाम वेदांचे सार जाण | प्रत्यक्ष शिवाचे रूप हे करते प्रदान | रात्रंदिवस जप कर याचा || अ.३, ओ.३२||
त्यामुळे भगवान (शिव) प्रसन्न होतील | आणि पाशुपतास्त्र तुला देतील | ज्यायोगे तू तुझ्या प्रियेला पुन्हा मिळवशील | शत्रूचा नाश करून || अ. ३, ओ. ३३ ||
सामर्थ्य एवढे त्या अस्त्राचे | की त्यायोगे तू शोषण करशील समुद्राचे 🌊 | ते अस्त्र आहे पार्वतीपतीचे | करण्याचे जगाचा 🌎 संहार || अ.३, ओ. ३४ ||
हे अस्त्र तुझ्याकडे नसेल तर | दानवांवर जय मिळवणे कठीण फार | म्हणून ते तू प्राप्त कर | शरण जाऊन शंकराला' | अ.३, ओ. ३५ ||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'विरजादीक्षानिरूपण' नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला.
शब्दार्थ व टीपा:
१. सूदन (वि, ना.पुं)=नाश करणारा, मारणारा.
"किमु" = काय तर म्हणायचंच, काय शिल्लक राहतं?, मग काय उरतं?
श्लोक २१
ध्यात्वाग्निनाऽवसथ्याग्निं विशोध्य च पृथक्पृथक्' यामधील कल्पनेचे स्पष्टीकरण:
तात्त्विक आणि योगमार्गाशी संबंधित अर्थ:
1. ज्ञानाग्नी आणि कर्मकांड:
येथे "अग्नि" हा प्रतिकात्मक शब्द आहे.
ज्ञानाग्नि = आत्मज्ञानाचा अग्नी (म्हणजे विवेक, अंतरदृष्टी).
आवसथ्य अग्नि = बाह्य यज्ञात वापरला जाणारा अग्नी, म्हणजे कर्मकांड व विधीनिष्ठ धार्मिक क्रिया.
आवसथ्य अग्नी= आवास=घर, आवसथ्य= घरातील, वैदिक काळात घरात अग्नी प्रज्वलित ठेवीत. आवसथ्य अग्नी म्हणजे हा घरातील अग्नी.
2. वास्तविक साधना:
केवळ बाह्य यज्ञ (कर्मकांड) करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही.
त्यासाठी आवश्यक आहे की, ज्ञानाच्या अग्नीने बाह्य कर्मांची विशुद्धी करावी म्हणजे त्यांचा खरा हेतू ओळखावा.
पृथक पृथक = आत्मज्ञान आणि कर्म यामधील भेद ओळखावा, म्हणजे काय योग्य आहे आणि काय केवळ बाह्य प्रदर्शन आहे ते समजावं.
3. अंतर्गत परावर्तन:
इथे सांगितलं जातं की साधकाने आपली साधना बाह्य यज्ञापुरती मर्यादित न ठेवता, अंतर्मुख होऊन ज्ञानाचा अग्नी चेतवावा.
सारांश:
हे वाक्य सांगतं की केवळ कर्मकांडावर (बाह्य अग्नी) आधारित साधनेपेक्षा, ज्ञानरूपी अग्नीने त्या कर्मांचे परिशुद्धीकरण (विशोधन) केलं पाहिजे. तसेच, योग्य ते निवडण्यासाठी विवेक विकसित केला पाहिजे. हेच आत्मसाक्षात्काराच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.
ज्ञानाच्या अग्नीने बाह्य यज्ञाचा अग्नी शुद्ध करावा आणि वेगळेपणा ओळखून त्यापासून स्वतःला अलग ठेवावं. केवळ बाह्य यज्ञ (कर्मकांड) करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. त्यासाठी आवश्यक आहे की, ज्ञानाच्या अग्नीने बाह्य कर्मांची विशुद्धी करावी म्हणजे त्यांचा खरा हेतू ओळखावा.
श्लोक २२
'ध्यात्वा गुणविधिक्रमात्'
पंचमहाभूतांचे गुण: रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. पृथ्वीमध्ये हे सारे पाच (५) गुण आहेत. जलामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस (४) हे चार गुण, तेजामध्ये शब्द, स्पर्श, रूप हे तीन (३) गुण, वायूमध्ये शब्द, स्पर्श हे दोन (२) गुण, तर आकाशामध्ये शब्द हा एकच (१) गुण.
पंचमहाभूतांचे हे गुण जाणून त्याप्रमाणे त्यांचे ध्यान करावे
श्लोक २३
द्वादशान्तं व्यवस्थितम् – 'द्वादशान्त' म्हणजे बारा (१२) अंगुळे अंतर, म्हणजे भृकुटीच्या थोडं वर जिथे ध्यान एकाग्र केलं जातं.
स्थित्याम् स्थाप्य – त्या ठिकाणी (द्वादशान्तस्थानी) स्थिर करावे
एकमात्रम् अमात्रं – एकमात्र (ओंकाराचा एकमात्र ध्वनी) आणि अमात्र (ज्याला मोजता येणार नाही असा)
अमृतः भूत्वा – अमर, अविनाशी बनून
व्रतं पाशुपतं चरेत् – पाशुपत व्रताचे आचरण करावे
मराठी अर्थ (भावार्थासह):
एकमात्र आणि अमात्र अशा ओंकाराचा ध्यान करून, तो ध्वनी द्वादशान्त (म्हणजे भृकुटीच्या थोड्यावर असलेल्या स्थळी) स्थिर करावा. अशा प्रकारे अमर (मृत्यूरहित) बनून, पाशुपत व्रताचे पालन करावे.
समासत:=संक्षिप्तपणे.
श्लोक २४
'स्वशाखया'
"शाखा" हा शब्द वेदाच्या विविध भागांशी संबंधित आहे. उदा., ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे अनेक शाखा (उपविभाग) आहेत. प्रत्येक शाखेची विधी, मंत्र, उपासना पद्धती वेगळी असते. म्हणूनच, "स्वशाखया" याचा अर्थ — ज्या शाखेचा अभ्यास (शिक्षण) साधकाने केला आहे, त्या शाखेच्या परंपरेनुसार.
विमृज्य – चोळून
श्लोक २७-
"याते अग्ने याज्ञयातनूः" ह्या मंत्राने अग्नीचा आपल्या ठिकाणी समारोप करून भस्म घेऊन "अग्निरिति भस्म" इत्यादि मंत्रांनी अभिमंत्रण करून अंगांचे ठायीं लावावे. २७.
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
शिवगीता - अध्याय २- वैराग्योपदेश
शिवगीता - अध्याय २- वैराग्योपदेश
ऋषी म्हणाले-
कुठल्या कारणाने अगस्त्य ऋषींस | यावे लागले रामचंद्राच्या भेटीस | का विरजा दीक्षेस | दिले त्यांनी राघवास | त्यायोगे काय लाभ झाला रामास | हे सांगण्यास | तूच समर्थ आहेस || अ.२, ओ.१ ||
सूत म्हणाला -
जनककन्या सीता | रावणाने अपहरण करिता | राघव विलाप करीत होता | वियोगदुःखाने || अ.२, ओ.२||
सोबत होता धाकटा भाऊ लक्ष्मण | तरी खाईपिई ना, झोपे ना, होऊन दीन | इच्छा करी रघुनंदन | प्राणत्यागाची || अ.२, ओ.३||
लोपामुद्रेच्या पतींस (=अगस्त्य ऋषींस) हे समजले | तेव्हा ते रामाच्या भेटीस आले | आणि रामाला बोध करू लागले | संसाराच्या असारतेविषयी || अ.२, ओ.४||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
हे राजा, काय बसलास दु:खी होऊन? | अरे, हा देह बनला पंचमहाभूतांपासून | त्याला नसे काही ज्ञान | तो कसा होईल कुणाची कांता ? || अ.२, ओ.५||
आत्मा आहे निर्लेप, परिपूर्ण | तो सच्चिदानंदरूप जाण | त्याला ना जन्म ना मरण | दु:खभोग नसे त्याला || अ.२, ओ.६||
सूर्याचे ☀️ चक्षूंमध्ये 👁️ (=डोळ्यांमध्ये) आहे स्थान | साऱ्या जगाचे 🌎 चक्षुत्व (=दृष्टी) होऊन | | तथापि चक्षुदोषांनी तो न | कधी होतो लिप्त, || अ.२, ओ.७||
तसाच आत्मा राहून सर्व भूतांच्या अंतरात | दृश्यवस्तूंनी लिप्त | नाही कधी होत. | देह केवळ मलपिंड, जीवहीन, जडरूप- || अ. २, ओ.८||
-जळतो काष्ठ 🪵 आणि अग्नी 🔥 यांच्या संयोगातून | खाल्ला जातो कोल्ह्यांसारख्या 🦊 प्राण्यांकडून | तरी देहाला नसे संवेदन | मग देहाच्या वियोगाचे दु:ख कशासाठी ? || अ.२, ओ.९||
(देहधारी स्त्री) सुवर्णासारखी गौरवर्णाची | किंवा दूर्वादलासारखी श्यामलवर्णाची | वाकलेली नाजूक कंबर जिची | पुष्ट आणि उन्नत स्तनांच्या भाराने, || अ.२, ओ.१० ||
नितंब आणि जांघा विस्तीर्ण | पाय 👣 कमळासारखे 🪷 रक्तवर्ण | मुख पौर्णिमेचा चंद्र 🌕 पूर्ण | कापलेल्या पिकलेल्या तोंडल्यासारखे ओठ 👄 असणारी, || अ. २, ओ.११||
- शोभतात तिचे नयन 👁️ | निळ्या कमळांसमान | स्वर मधुर जसा कोकिळेचे 🐦⬛ कूजन | चाल तिची डौलदार मत्त गजासारखी 🐘- || अ.२, ओ.१२||
-तिचे कटाक्ष म्हणजे पंचेषुचे (=कामदेवाचे ) उत्तम शर 💘 | माझ्यावर सोडून करिते अनुग्रह फार | असे मानणारा मूर्ख नर | आहे निश्चित पंचेषुशासित (=कामदेवाने किंवा पंचमहाभूतांनी शासित). || अ.२, ओ.१३||
राजा, आता यांतील अविवेक | सांगतो नीट ऐक | न स्त्री, न पुरुष, न नपुंसक | असे हा आत्मा || अ. २, ओ.१४||
पूर्ण पुरुष द्रष्टा अमूर्त | जीवात्मा जो वसे देहात |
| मलपिंडात्मक जडदेह प्रत्यक्षात. | जरी दिसे नाजूक ललना, || अ.२, ओ.१५||
- न दिसे काही तिला, न येई ऐकता | न येई वास घेता | त्याग कर तिचा (सीतेचा) आता | ती केवळ चर्मधारी तनू || अ.२, ओ.१६||
जी प्राणांहून प्रिय तुला | अरेरे, तीच व्हावी कारण दु:खाला ! | जर आत्मा भूतांपासून उत्पन्न झाला | तर तोही पांचभौतिक (=पंचमहाभूतांपसून उत्पन्न झालेला) म्हणावा || अ. २, ओ.१७||
परंतु एकच आत्मा त्यांत (=पंचमहाभूतांत) | परिपूर्ण सनातन निश्चित. | तेव्हा कुठली कांता आणि कुठला कांत | सर्व केवळ भाऊबहीण || अ.२, ओ.१८||
घरे 🏠 बांधली तर | त्यांतील अवकाशास येतो घरांचा आकार | परंतु ती घरे जळाल्यावर | त्यांतील अवकाशाचा नाश होत नाही || अ.२, ओ.१९||
देहांत करी जो आत्मा वास | तो परिपूर्ण सनातन असे खास | मारिले जरी देहांस | तरी आत्मा मरत नाही || अ.२, ओ. २०||
मारणारा जरी इच्छितो मारण्यास | किंवा मेलेला मानतो मृत स्वतःस | कळते न त्या दोघांस | आत्मा न मारतो न मारला जातो || अ.२, ओ.२१||
तेव्हा हे नृपती, काय उपयोग दु:ख करून?| काय या खेदाचे कारण?| स्वस्वरूप जाणून | दु:ख सोडून सुखी हो || अ.२, ओ.२२||
राम म्हणाला-
हे मुने ! नसेल जर दु:ख देहाला | आणि परमात्म्याला | तर भस्म करतो कसा मला | सीतावियोगदुःखरूपी अग्नी 🔥 ? || अ.२, ओ.२३||
हे मुनिश्रेष्ठ, ज्या गोष्टीचा अनुभव येतो निरंतर | तिला अस्तित्व नाही खरोखर | या तुमच्या सांगण्यावर | माझा विश्वास कसा बसावा ? || अ.२, ओ. २४||
सुख किंवा दु:ख जो भोगतो | आहे का कुणी दुसरा तो | ज्यामुळे जीव दु:खी होतो | सांगा मला मुनिश्रेष्ठ || अ.२, ओ.२५||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
समजणे कठीण आहे शंभूच्या मायेला | तिने मोहिले या जगाला | म्हणतात प्रकृती त्याच्या मायेला | मायेचा ईश्वर तो महेश्वर. || अ.२, ओ.२६||
शंभूचे अवयव जीव बनून | राहिले जगास व्यापून. | सत्यज्ञानात्मक, अंतहीन | सर्वशक्तिमान महेश्वर - || अ.२, ओ.२७||
-त्याचाच अंश जीवलोकात | असे प्राण्यांच्या हृदयात ❤️. | ज्याप्रमाणे काष्ठ 🪵 येता अग्नीच्या 🔥 संपर्कात | उत्पन्न होतात ठिणग्या, || अ.२, ओ.२८||
-त्या ठिणग्यांप्रमाणे जीव आहेत. | त्यांना क्षेत्रज्ञ म्हणतात | ते आहेत अनादिकर्मांनी बद्ध आणि अनादिवासनांनी युक्त | | जरी ते आहेत महेशाचे अंश || अ.२, ओ.२९ ||
आता जाण अंत:करण | बुद्धी, अहंकार, चित्त आणि मन | हे चार मिळून | आकारास ते येते.|| अ.२, ओ.३०||
अंत:करणात प्रतिबिंबित | होऊन जीव कर्मफळे भोगतात. | त्यातून उत्पन्न होतात | वैषयिक सुखे वा दु:खे. ||अ.२, ओ.३१||
आहे हे शरीर | जणू जीवांचे भोग भोगण्याचे घर 🏠.|
शरीरांचे दोन प्रकार | स्थावर आणि जंगम || अ.२, ओ.३२||
सूक्ष्म वनस्पती, वेली , तरुवर 🌲 | हे सारे स्थावर | अंडज 🐦, स्वेदज 🦟, उद्भिज्ज 🌱, जरायुज 🐄 हे प्रकार | जंगमात मोडतात || अ. २, ओ.३३||
जशी कर्मे व जसे ज्ञान | तसा देह करण्या धारण | स्थावर किंवा योनींत स्थान | आत्मा प्राप्त करतो || अ.२, ओ.३४||
निर्लेप आणि ज्योतिर्मय असून । शंभूच्या मायेने मोह पावून । जीव धरतो अभिमान । मी सुखी किंवा मी दु:खी आहे ॥ ३५ ॥
ठेव याची जाण । की अहंकारापासून । होतात उत्पन्न । काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य आणि मोह हे षड्रिपु. ॥ ३६ ॥
स्वप्न आणि जागृती या अवस्थांत | जीव पडे बंधनात ⛓️💥 | अहंकाराचा अभाव असे सुषुप्तीत | म्हणून सुषुप्तीत जीव शंकरता प्राप्त करतो. || अ.२, ओ.३७||
माया जीवास जेव्हा स्पर्शते | तेव्हा ते कारण होते सुख-दु:खांचे. | मायेमुळे शिवामध्ये दर्शन होते विश्वाचे 🌎 | जसे शिंपल्यावर 🦪 दिसे रुपे. || अ.२, ओ.३८||
तेव्हा पहा विवेकबुद्धीने | कुणीही नाही पीडित दु:खाने | थांबव हे दु:ख करणे | कशाला त्रास करून घेतोस? || अ.२, ओ.३९||
श्रीराम म्हणाला-
मुनिवर, तुम्ही जे सारे सांगितले मला | अर्थ आहे निश्चित त्याला | तथापि हा प्रारब्धभोग मला | सोडतच नाही || अ.२, ओ.४०||
ज्या ब्राह्मणाचे नष्ट झाले अज्ञान | तोसुद्धा जसा उन्मत्त होईल मद्यपान 🍷 करून | तसा प्रारब्धभोग कठीण | विचारी मनुष्यास सोडत नाही || अ.२, ओ.४१||
तेव्हां काय उपयोग फार बोलून ! । मदन, प्रारब्धाचा सचिव होऊन । मला पीडा देत आहे रात्रंदिन | तसाच पीडतो अहंकार || अ.२, ओ. ४२ ||
पीडा होता जीवास | जीव त्यागतो स्थूल देहास | तेव्हा माझे प्राण वाचविण्यास | काही उपाय कर हे द्विजश्रेष्ठा || अ.२, ओ. ४३ ||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'वैराग्योपदेश' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
शब्दार्थ व टीपा:
रदच्छद (ना.पुं)=ओठ, वलग्न (ना. पुं. नपुं.)=कटिप्रदेश, राका (ना.स्त्री.)=पौर्णिमेची देवता,नीकाश (वि.)=सारखा, शिव (ना. पुं)=कोल्हा, बिम्ब (ना.नपुं.)=तोंडले
पंचेषु=कामदेवाला पंचेषु म्हणजे ज्याच्या भात्यात पाच बाण (पंच=पाच, इषु=बाण) आहेत असा, म्हणतात. कामदेवाचे धनुष्य ऊसापासून बनवलेले असते. त्याच्या भात्यात लाल कमळ, अशोक, आम्रपुष्प, जाई आणि निळे कमळ असे पाच बाण असतात.
जंगम(जन्+गम्= जन्म घेणारा, हलू शकणारा)
जंगम जीवांचे प्रकार:
अंडज = अंड्यातून उत्पन्न होणारे, पक्षि, सर्प इत्यादि. स्वेदज= स्वेदातून (=घामातून, ओलसर , दमट ठिकाणांतून) उत्पन्न होणारे, कृमि, मशक इत्यादि
उद्भिज्ज (=उद्भवणारे) कोंब वगैरे
जरायुज (=गर्भातून उत्पन्न होणारे, जरायु= गर्भाशय) =मनुष्य, गाई इत्यादि.
शुक्ति (ना.पुं)=शिंपला
मुधा (अव्यय)=उगीचच
प्रारब्धादृष्टमुल्बणम्=प्रारब्ध+अदृष्टम्+उल्बणम्
उल्बण (वि.)=अनावश्यक
किं बहुनोक्तेन = फार बोलून काय उपयोग
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
शिवगीता - अध्याय १ -शिवभक्त्युत्कर्षनिरूपणम्
महेशाचा अनुग्रह ज्यावरी || जे आहे शुद्ध, कैवल्यदायी, मुक्तिकारी | भवदु:खावरील औषध गुणकारी | सांगेन आता || अ.१, ओ.१||
न कर्माने, न अनुष्ठानाने | न दानाने वा तपाने || परंतु केवळ ज्ञानाने | मनुष्याला लाभते कैवल्य || अ.१, ओ.२||
'शिवगीता' नावाने ज्ञात || आहे ती गुह्यतम गुह्यात | रामास दंडकारण्यात | पूर्वी पार्वतिपतीने जी सांगितली || अ.१, ओ.३||
जिचा श्रवणमात्र जरी ऐकला | तरी मुक्तीचा ध्रुव मिळे मनुष्याला | ती सांगितली सनत्कुमाराला | पूर्वी स्कंदाने || अ.१, ओ.४||
ही शिवगीता, हे मुनिवर | सांगती व्यासांना सनत्कुमार | बादरायण (=व्यासमुनी) नंतर | कृपाळूपणे ती देती मला || अ. १, ओ.५ ||
त्यांनी सांगितले मला, | 'सूतपुत्रा, ही गीता तू न द्यावी कोणाला | नाहीतर देव तुला | रागावून शाप देतील' || अ.१, ओ.६ ||
'ब्राह्मण हो ! मग मी विचारला प्रश्न, | 'हे बादरायण भगवान, | सर्व देवता रागावून | शाप का देतील ? || अ.१, ओ.७ ||
ह्यांत देवतांची काय हानी, | की रागवावे त्यांनी?' | तेव्हा मला सांगितले पाराशरांनी (=व्यासांनी),| 'वत्सा, ऐक तर मग || अ.१, ओ.८||
जे ब्राह्मण गृहस्थाश्रमात | असून नेहमी अग्निहोत्र करतात | ते कामधेनूंप्रमाणे असतात | देवांना सर्व फळे देणाऱ्या || अ.१, श्लो.९||
देवांचे जे जे असे इच्छित | ते हवीतून देवांना होई प्राप्त | हवन करिता अग्नीत | भक्ष्य, भोज्य आणि पेय || अ.१, ओ.१०||
हवन करिता यज्ञात | देवांना इष्ट सिद्धी होई प्राप्त. ||
गृहस्थ होतो जसा दु:खित | दुभती गाय नेली असता-|| अ.१, ओ.११||
-तसे दु:ख होते देवांस | पाहून ज्ञानवान ब्राह्मणास | म्हणून देव निर्मिती विघ्नांस | विषयांत प्रवेश करून || अ.१, ओ.१२||
शिवाची भक्ती न होई उत्पन्न | कोणा मनुष्यात म्हणून | | अज्ञानी त्यातून | मुळी न भजती शूलपाणि || अ.१, ओ.१३ ||
जरी मनुष्यांत भक्ती झाली उत्पन्न | मध्येच होई छिन्न | झाले मनुष्यास जरी शिवज्ञान | त्याचा विश्वास न बसे पुरेसा || अ. १, ओ.१४||
ऋषी म्हणाले-
देव जर मनुष्यांस | आणती विघ्नांस | तिथे मुक्ती होण्यास | पुरुषार्थ कोणाचा चालेल ? || अ.१, ओ.१५||
सूतात्मजा सांग सत्य | येथे आहे की नाही उपाय? |
सूत म्हणाले-
कोटिजन्मांत मिळविता पुण्य | शिवाची भक्ती उपजते || अ.१, ओ.१६||
त्या भक्तीच्या योगाने | इच्छा त्यागून शिवार्पणबुद्धीने | इष्टापूर्त कर्मे योग्य विधीने | आचरितो मानव || अ.१, ओ.१७||
अनुग्रह होता शंभूचा | नरास लाभ होई शक्तीचा | मग त्याग करून विघ्नांचा | देव घाबरून पलायन करती || अ.१, ओ.१८||
त्यामुळे इच्छा होते मनुष्यास | चंद्रमौळीचे चरित्र ऐकण्यास | ते ऐकून तो मिळवतो ज्ञानास | ज्ञानातून मुक्त होतो || अ.१, ओ.१९ ||
पुष्कळांनी जो त्यागला | तो मनुष्य जर शिवभक्तीत दृढ झाला | तो जरी कोट्यवधी महापापे, उपपापे यांच्या ओघात असे बुडाला | तरी मुक्त होतो || अ.१, ओ.२०||
अनादराने, कपटाने | उपहासाने किंवा भ्रमाने | जो युक्त शिवभक्तीने | तो अंत्यज असला तरी मुक्त होतो || अ.१, ओ.२१||
अशी शिवभक्ती ही | सर्वदा सर्वतोमुखी राही | आणि तरीही | संसारबंधनातून - || अ.१, ओ.२२||
-नाही जो मर्त्य मुक्त होणार, | त्याच्याहून दुसरा, असेल का मूर्ख खरोखर? | नेमाने शिवभक्ती वा तिरस्कार | जो करील शिवाचा-|| अ.१, ओ.२३||
-त्यावरही होऊन प्रसन्नचित्त | शिव देतो फल इच्छित. | घेऊन द्रव्य किंचित | किंवा पाणी क्षुल्लक -|| अ.१, ओ.२४||
-नियमाने जो देतो | त्यास शिव त्रैलोक्य बहाल करतो. | तेही देण्यास जो असमर्थ असेल तो, | नियमाने नमस्कार वा प्रदक्षिणा -|| अ.१, ओ.२५||
-महेशास करता, | मिळवितो शिवाची संतुष्टता. |
ज्याची त्यासही असमर्थता | तो मनात शिवाचे -||अ.१, ओ.२६||
- उठता-बसता करील चिंतन | त्यासही शिव करतो अभीष्ट प्रदान. | बेलाच्या काष्ठाचे चंदन | किंवा रानातील फुले-फळे- || अ.१, ओ.२७||
- अशा गोष्टी सामान्य | ज्यास असती प्रिय | त्याच्या सेवेस त्रिभुवनात काय | न मिळणारे आहे? || अ.१, ओ.२८||
प्रीती परमेश्वरी (=शिवाची) | जशी असे वनातील वस्तूंवरी | तशी नसे गावातील वस्तूंवरी | जरी त्या अधिक चांगल्या असती || अ. १, ओ.२९||
देवाला सोडून अशा त्या | सेवितो जो देवता दुसऱ्या | तो भागीरथीला सोडूनीया | मृगजळाची इच्छा धरतो || अ.१, ओ.३०||
परंतु कोट्यवधी जन्मांतून | ज्याने ठेविले पाप साठवून | त्याला हा अर्थ न येई दिसून | मोहाने अंध झालेल्याला || अ.१, ओ.३१||
न नियम काळाचा येथे | न देशाचा न स्थळाचा नियम येथे || चित्त याचे (=आपले) रमते येथे | केवळ त्याच्या (=शिवाच्या) ध्यानाने- || अ.१, ओ.३२||
- (मग) योजावे शिवाशी आत्मत्व (=शिवरूपाच्या जवळ जाऊन)| त्यातून साधावे शिवाशी सायुज्यत्व (=शिवाशी एकरूपता). | आहे ज्याच्यात अल्पायुष्याचे न्यूनत्व | परंतु भूतेशाच्या (=शिवाच्या) अंशातील अंशाने जो युक्त आहे-||अ.१, ओ.३३||
-तो गणगोतासह नाश करी त्याचा | ज्यास अभिमान आहे राजा असण्याचा. | शिव कर्ता असे सर्व लोकांचा | अक्षय आणि ऐश्वर्यवान असा- || अ.१, ओ.३४||
- नि:संशय तरी | स्वतःच्या रूपापरी | त्यालाही करी 'मी शिव आहे' म्हणणार्याला ||अ. १, ओ.३५||
हे ऋषिहो ! आतां धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांप्रत | ज्या व्रतायोगे जातात | ते 'पाशुपत' नावाचे व्रत | मी तुम्हांला सांगतो || अ. १, ओ.३६ ||
'विरजा' नावाची दीक्षा स्वीकारून | विभूति आणि रुद्राक्ष धारण करून | शिवसहस्त्रनाम जपून | (शिवसहस्रनाम वेदांचे सार आहे)-|| अ.१, ओ.३७||
-त्याग करून मर्त्यत्व | प्राप्त होईल तनू शैव | आणि पावून प्रसन्नत्व | लोकशंकर भगवान शंकर- ||
-दर्शन देऊन तुम्हास | प्रदान करील कैवल्यास || अ.१, ओ.३८||
दंडकारण्यात रामाला | कुंभसंभव (=अगस्त्य ऋषी) जसा वदता झाला | ते सर्व सांगेन तुम्हाला | भक्तियुक्त होऊन ऐका || अ.१, ओ.३९||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'शिवभक्त्युत्कर्षनिरूपण' नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.
🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved
Tuesday, July 15, 2025
शिवगीता - अध्याय ४- शिवप्रदुर्भावाख्य
सूत म्हणाला-
अगस्त्य ऋषी रामास असे सांगून | त्यांच्या आश्रमात गेले निघून | नंतर राम रामगिरीवर जाऊन | गोदावरीच्या तटावर- ॥ अ. ४, ओ.१ ॥
शिवलिंगाची स्थापना करून | विरजा दीक्षेचा विधी यथासांग करून | विभूतीने भूषित होऊन | धारण करून रुद्राक्षमाला - || अ.४, ओ.२ ||
गौतमी (=गोदावरी) नदीतून 🌊| आणलेल्या पवित्र जलांनी 💦 शिवलिंगास अभिषेक करून | पूजा करून | वन्य फुलाफळांनी 🌺 🍑- || अ.४, ओ.३||
-भस्माच्छादित होऊन, भस्मात शयन करून | व्याघ्रचर्माच्या 🐯 आसनावर बसून | अनन्यबुद्धी होऊन | (शिवाचे) सहस्रनाम जपू लागला || अ.४, ओ.४ ||
पहिल्या महिन्यात फळांचा 🍎| दुसऱ्या महिन्यात पानांचा 🌿 | तिसऱ्या महिन्यात जलाचा 💦 आणि चौथ्या महिन्यात वायूचा 🌬️ | आहार करीत - || अ.४, ओ.५ ||
-होऊन शांत, दांत आणि प्रसन्नचित्त | उमेचा अर्धदेह धारण करणारा (=शिव), जो राहतो हृदयपंकजात ❤️ | त्याचे ध्यान सतत | राम करीत असे || अ. ४, ओ.६ ||ट
चार हात आणि तीन नेत्र 👁️ असणारा | विजेप्रमाणे ⚡ पिंगट जटा असणारा | कोटी सूर्यांप्रमाणे ☀️ तेजस्वी असणारा | तर कोटी चंद्रांप्रमाणे 🌙 असणारा शीतल- || अ.४, ओ.७ ||
सर्व आभरणे धारण करणारा | नागरूपी यज्ञोपवित धारण करणारा | व्याघ्रचर्माचे 🐯 वस्त्र परिधान करणारा | देणारा वर आणि अभय || अ.४, ओ.८||
व्याघ्रचर्म 🐯 उत्तरीय ज्यास | सुर आणि असुर वंदिती ज्यास | शिरावर चंद्र 🌙 ज्याच्या, पाच मुखे ज्यास | त्रिशूल 🔱 आणि डमरू जो धारण करतो || अ.४, ओ.९||
जो आहे नित्य, शाश्वत, शुद्ध खरोखर | ध्रुव (=स्थिर), अव्यय (=बदल न होणारा) ,अक्षर (=नाश न होणारा), | अशा शिवाच्या नामाचा राम जप करीत असता निरंतर | चार महिने उलटले.|| अ.४, ओ.१०||
मग अचानक झाला उत्पन्न | ध्वनी भीषण | प्रलयकाळीच्या मेघगर्जनेसमान | किंवा मंदारपर्वतापासून 🏔️ समुद्रमंथनात 🌊 || अ.४, ओ.११||
किंवा त्रिपुरे जेव्हा गेली भस्म 🔥 होऊनी | रुद्राच्या बाणांनी 🏹. | राम तेव्हा पाही गोंधळूनी | जलाशयाकडे 🌊- || अ.४, ओ.१२||
- ब्राह्मण हो, त्या वेळी रामाला समोर | दिसले तेज प्रखर 🚨 | त्या तेजाने भ्रमित होऊन फार | दशदिशा त्याला दिसेनात || अ.४, ओ.१३||
अंधत्व येऊन क्षणभर | गोंधळून गेला तो राजकुमार (=राम) | द्विजेश्वर हो, त्याने केला विचार | की ही राक्षसाची (=रावणाची ) माया असावी || अ.४, ओ. १४ ||
नंतर त्या महावीराने (=रामाने) उठून | धनुष्य सज्ज करून | दिव्य मंत्राने अभिमंत्रित करून | तीक्ष्ण बाणांची आणि अस्त्रांची वृष्टी केली || अ.४, ओ.१५||
अग्न्यस्त्र🔥 ,वरुणास्त्र 💦 || सोमास्त्र 🌙, मोहनास्त्र || सूर्यास्त्र ☀️, पर्वतास्त्र 🏔️|| महाचक्र 🛞, सुदर्शनास्त्र || कालचक्र, वैष्णवास्त्र - || अ.४, ओ.१६||
-रुद्रास्त्र, पाशुपतास्त्र | ब्रह्मास्त्र, कुबेरास्त्र | वज्रास्त्र, वाय्वस्त्र 🌬️ आणि परशुरामास्त्र, | अशी अस्त्रे राघवाने योजिली || अ.४, ओ. १७ ||
परंतु त्या तेजात 🚨 | त्या महीपतीची (=रामाची) शस्त्रे आणि अस्त्रे झाली लुप्त | जशा होती समुद्रात 🌊| ढगांतून ☁️ पडलेल्या गारा || अ.४, ओ.१८ ||
तेव्हा त्याच्या हातून | धनुष्य 🏹 पडून गेले जळून | भाता, गोधिका, अंगुस्तान | हेही सर्व जळाले || अ.४, ओ.१९||
तेव्हा घाबरलेला लक्ष्मण | भूमीवर पडला मूर्च्छित होऊन | रामही असहाय्य आणि भयभीत होऊन | मिटून डोळे 👁️- || अ.१४, ओ.२०||
-जमिनीवर टेकून गुडघ्यांस | जाऊन शरण शंकरास | शंभूच्या सहस्रनामास | मोठ्याने म्हणू लागला- || अ.४, ओ.२१||
-पुन्हा पुन्हा भूमीवर | शिवास करू लागला दंडवत् नमस्कार. | त्याच वेळी पुन्हा झाला ध्वनी भयंकर | दशदिशा दणाणून सोडणारा || अ.४, ओ.२२ ||
त्या ध्वनीमुळे भूस्तर हलले, | पर्वत 🏔️ कंपित झाले. | आणि तेज प्रगट झाले | चंद्रासारखे 🌙 शीतल. || अ.४, ओ.२३||
रामाने डोळे 👁️ उघडून पाहिले, | तेव्हा त्याला दिसले | सर्व अलंकारांनी ज्याला भूषविले | असा वृषभ 🐂 समोर आहे. || अ.४, ओ.२४ ||
वृषभ 🐂 तो शुभ्र लोण्यासमान | वर आलेल्या घुसळलेल्या ताकातून. | सोन्याच्या तारेत ओवलेल्या मरकत मण्यांसमान | दोन शिंगे त्याची. || अ.४, ओ.२५ ||
डोळे 👁️ नीलमण्यांसमान 🧿 | नाजूक गळ्यात कंठवसन 🧣 (=गळपट्टा, स्कार्फ) | पाठीवर रत्नजडित आसन | शुभ्र चामरांनी युक्त || अ. ओ.२६||
नादाने गळ्यातील घुंगुरघंटांच्या | दाही दिशा भरल्या | अशा वृषभावर त्या | होता आरूढ महादेव, कांती असलेला स्फटिकासमान, || अ.४, ओ.२७ ||
तेजस्वी कोटिसूर्यांसमान | शीतल कोटिचंद्रांसमान | केले व्याघ्रांबर परिधान | आणि नागयज्ञोपवीत || अ.४, ओ.२८||
सर्व अलंकार केले परिधान | विद्युल्लतेसारख्या पिंगट जटा करी धारण | ज्याचा कंठ नील, व्याघ्रचर्म ज्याचे प्रावरण | आणि मस्तकी शोभे चंद्र || अ.४, ओ. २९||
ज्याच्या दहा भुजांत | अनेक आयुधे शोभतात | जो आहे त्रिलोचन, तरुण, श्रेष्ठ सर्व पुरुषांत | आणि सच्चिदानंदरूप || अ. ४, ओ.३० ||
त्या वृषभावर शिवासह पार्वती विराजमान | मुख जिचे पूर्णचंद्रासमान | कांती निळ्या कमळाच्या मालेसमान | मरकतरत्नासमान अथवा || अ.४, ओ.३१||
अलंकृत मौक्तिकाभरणांनी 🦪 | जशी रात्र शोभते तारकांनी ✨| विंध्यपर्वतासारख्या 🏔️ उत्तुंग स्तनांनी | लवून गेलेली || अ.४, ओ.३२||
आहे की नाही असा पडावा प्रश्न | अशा नाजूक मध्यभागी, अंतर्वस्त्र करून परिधान | दिव्य अलंकार लेऊन | लावून दिव्य अनुलेप || अ. ४, ओ.३३||
दिव्य माळा वस्त्रांवर | निळ्या कमळांप्रमाणे डोळे 👁️ मनोहर | कुरळ्या केसांनी दिसे चेहरा सुंदर | तांबूलभक्षणाने मुख 👄 शोभते || अ. ४, ओ.३४||
शिवाला आलिंगन देऊन | पुलकित झाले जिचे तन | ख्यात जी सच्चिदानंदरूप म्हणून | अशी ती त्रैलोक्याची माता || अ.४, ओ.३५||
सौंदर्याचे सार काढून जिला बनविले | अशा पार्वतीचे रघुनंदनाला दर्शन झाले. | तसेच
आपापल्या वाहनांवर बसलेले | धारण करून
आपापली आयुधें || अ. ४, ओ. ३६||
बृहद्रथंतरादि सामें गात | आपापल्या स्त्रियांनी युक्त | होते शोभत | इंद्रादि दिक्पाल. || अ. ४, ओ.३७||
अग्रभागी गरुडावर बैसून | शंख, चक्र, गदा धारण करून | ज्याची शरीरकांति नीलमेघासमान | विद्युत्कांति लक्ष्मीनें युक्त || अ.४, ओ.३८||
जनार्दन एकचित्त | होता रुद्राध्यायाचा जप करीत. | मागे हंसावर शोभत | होता ब्रह्मदेव- || अ.४, ओ.३९||
-चार मुखे, लांब दाढी आणि जटा धारण करणारा | सोबत देवी भारती (=सरस्वती) असणारा | वेद आणि रुद्रसूक्ते गात | महेश्वराची स्तुति करणारा. | || अ. ४, ओ. ४०||
अथर्वोपनिषद गात | मुनिमंडल होते देवाची (=शिवाची) स्तुती करीत. | गंगादि नद्यांनी युक्त | असणारा नीलवर्ण सागर 🌊- || अ. ४, ओ. ४१||
-श्वेताश्वतर मंत्र म्हणत | होता गिरिजापतीची स्तुति करीत. | कैलासपर्वतासम 🏔️ असणारे अनंत | आणि इतर नाग - || अ.४, ओ.४२||
-होते रत्नांनी विभूषित | आणि मुखाने कैवल्योपनिषद गात. | सुवर्णाचा वेत घेऊन हातात | पुढे होता नंदी उभा. || अ. ४, ओ. ४३||
दक्षिणभागीं गणेश मूषकावर | शोभे जसा गिरिवर. | | उत्तरभागीं मयूरावर | आरूढ झालेला षण्मुख || अ.४, ओ.४४||
पाठीमागे येती दिसून | महाकाल आणि चंडेश भीषण. | जळत्या दावाग्नीसमान | कालाग्निरुद्र दूर दिसे.|| अ. ४, ओ.४५ ||
तीन पायांचा त्रिपाद, ज्याचा आकार भीषण, | भृंगिरिटि, जो करी नृत्य आणि भुंग्याप्रमाणे गुणगुण | असे कोट्यवधि प्रमथगण | अनेक प्रकारचे आणि अनेक चेहऱ्यांचे || अ.४, ओ.४६ ||
आरूढ नाना वाहनांवर. | मातृमंडल सभोवार. | सिद्ध आणि विद्याधर | पंचाक्षरी (=ॐ नमः शिवाय) जपात मग्न || अ.४, ओ. ४७ ||
दिव्य रुद्रगीतांचे गायन | करती किन्नरजन | जप करती द्विजगण | 'त्र्यंबकं यजामहे" मंत्राचा || अ.४, ओ.४८||
नारद आकाशात | होते वीणेवर गीत गात, नृत्य करीत. | नृत्य नाट्ययुक्त | करती रंभादी अप्सरा. || अ. ४, ओ. ४९ ||
होते गाण्यात | चित्ररथादी गंधर्व रत. |
जणू भूषणे शंभूच्या कानांत | कंबल आणि अश्वतर हे नाग || अ.४, ओ. ५०||
नाग कपाल आणि कंबल | गीत गाती सुरेल. | पाहून अशी देवसभा अखिल | रघुनंदन कृतार्थ झाला || अ.४, ओ.५१ ||
हर्षाने सद्गदित होऊन | राम करी दिव्य सहस्त्रनामाने महेश्वराचे स्तवन | आणि महेश्वरास करी नमन | पुन्हा पुन्हा || अ.४, ओ.५२||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'शिवप्रदुर्भावाख्य' नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला.
🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏🪔 🌺
शब्दार्थ व टीपा:
प्रदुर्भाव: प्रकट होणे, अवतरण, अस्तित्वात येणे
आख्या (आख्य): कथन, वर्णन, अध्याय
'शिवप्रदुर्भावाख्य' = "शिवाच्या प्रकट होण्याचे वर्णन असलेला अध्याय"
श्लोक ४-
गौतमी=गोदावरी नदीचे नाव.एक कथा अशी आहे की, गौतम ऋषींनी आपल्या तपोबलाने गंगा देवीला पृथ्वीवर आणले. त्यांच्या कृपेने गंगा नदी दक्षिण भारतात गोदावरीच्या स्वरूपात प्रकट झाली.
सिंधु= येथे सिंधु हा शब्द नदी या अर्थाने वापरला आहे.
जलै:= नदीच्या जलात अनेक पाण्यांचे प्रवाह मिसळलेले असतात. म्हणून 'जलै:' असे बहुवचन वापरले आहे.
प्रतीकाश (ना.पुं.)=सारखा, सारखा दिसणारा (श्लो.७)
अवनिभृत् (ना.पुं.) = पर्वत (श्लो.११)
श्लो.१२
पुष्कर (ना.न.पुं)=जलाशय, सरोवर
भ्रश्यत् – धातू "भ्रंश् (१, प.प.) (पडणे, खाली पडणे, नष्ट होणे) चा वर्तमानकाळातील कृदंत रूप.
विभ्रमः (ना.पुं)– भ्रम, हालचाल, गोंधळ, उलथापालथ, गती.
त्रिपुरांची थोडक्यात कथा-
विद्युन्माली, तारण आणि कमलाक्ष असे तारकासुराचे तीन पुत्र होते. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचा वर मागितला. असा वर देण्यास आपण असमर्थ असल्याचे ब्रह्मदेवाने सांगताच या असुरांनी ब्रह्मदेवांकडून तीन पुरे मागून घेतली. पहिले पुर सोन्याचे, दुसरे रुप्याचे आणि तिसरे लोखंडाचे. ही तीनही पुरे सतत आकाशात फिरत राहावीत आणि एक सहस्र वर्षांनी एका सरळ रेषेत येतील आणि फक्त त्याच वेळी एकच बाण मारून ती नष्ट करता यावीत. ब्रह्मदेवांनी तसा वर दिला. या वरप्राप्तीमुळे हे असुर प्रबळ झाले आणि अधर्म माजवू लागले. त्यामुळे देवांच्या विनंतीवरून शिवांनी एक विशाल रथ तयार केला तो असा, पृथ्वी हा रथ, सूर्य आणि चंद्र ही चाकं, ब्रह्मा हा सारथी आणि विष्णू हा बाण. एक सहस्र वर्षांनी ही तीन पुरे एकाच रेषेत आल्यावर, भगवान शिवांनी एकाच बाणाने ती नष्ट केली. विद्युन्माली, तारण आणि कमलाक्ष हे आपल्या पुरांचा नाश झाल्यावर भगवान शिवांना शरण आले.
श्लो.१४
अन्धीकृतेक्षण=अन्धीकृत + ईक्षण (=दृष्टी)= ज्याची दृष्टी अंध केली गेली आहे असा.
तूर्णम् (अ.)=लवकर, तत्क्षण.
श्लो. १५
स्वक (वि.)=स्वतःचे; व्यध् - विध्यति (४ प.प.)=वेध घेणे; निशित (वि.)=तीक्ष्ण;
कुलिश (ना. नपुं.)= वज्र (श्लो.१७)
प्रायुङ्क्त= प्रायोजिली (शस्त्रे आणि अस्त्रे) (प्र + युज् ७ प.प) कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. येथे भूतकाळ दर्शविण्यासाठी वापरले आहे. (श्लो.१७)
करका (ना.स्त्री)=पावसात पडणारी गार
गोधिका (ना.स्त्री.)= धनुष्याच्या दोरीचा आघात होऊं नये म्हणून मनगटावर बांधलेलें चर्म (श्लो.१९)
अकिञ्चित्कर (वि.) = निष्फळ, असहाय, काहीच करू न शकणारा (श्लो.२०)
स्वरेणाप्युच्चरन्नुच्चैः =स्वरेण + अपि + उच्चरन् (=उच्चारणारा)+उच्चै: (श्लो.२१)
श्लो.२५
मरकत (ना. नपुं)=पाचू
प्रोत (वि)=ओवलेला धातु: प्रि (प्री-प्रयति)= वाणणे, विणणे, ओवणे, गुंफणे
श्लो.२६
पल्याण (ना.नपुं.)= आसन, मखर, सवारीचा भाग
निबद्धम् (नि+बध्)= वेढलेले / बांधलेले
श्लो.२७
घर्घरी(ना.स्त्री.)=घंटिकायुक्त गळपट्टा
विग्रह (ना. पुं)= देह, मूर्ती, रूप
श्लो. ३१
निभ (वि.)= सदृश / सारखा / समान
दामा (ना. स्त्री.)= माळ / हार
उद्यत् (वि.)=प्रकाशणारा, झळकणारा
"भरालसा" → येथे "भर" हा धातू (भृ — उचलणे, वाहणे) म्हणून वापरलेला असून तो क्रियापद किंवा क्रियासूचक विशेषण तयार करतो.
म्हणजेच: "भार वहाण्याचा आळस असलेली" (श्लो.३२)
अन्तराबर (ना. नपुं.)= अंतर्वस्त्र (श्लो.३३)
"आढ्य" (वि.):
1. समृद्ध, श्रीमंत, धनाढ्य – ज्याच्याकडे खूप धन, ऐश्वर्य किंवा वैभव आहे.
2. परिपूर्ण, भरलेला – एखाद्या गुणाने परिपूर्ण असलेला. (श्लो.३५)
श्लो.४२
श्वेताश्वतर मंत्र= "श्वेताश्वतरमन्त्र" म्हणजे "श्वेताश्वतर उपनिषदातले मंत्र", जे वेदांतातील एक महत्त्वाचे उपनिषद आहे. यामध्ये शिवतत्त्वाचे वर्णन केलेले आहे, विशेषतः ब्रह्मस्वरूप शिवाचे (परमात्मा) रूप.
"अनन्तादि महा नाग" — अनंत, वासुकी, तक्षक इ. महान नाग.
श्लो.४७
“मातृमण्डल” हा शब्द “मातृका” या संकल्पनेशी संबंधित आहे. मातृका म्हणजे देवतेच्या रूपातील शक्ती – विशेषतः शक्तिच्या विविध रूपांतील देवीमूर्ती. हिंदू तांत्रिक परंपरेत “मातृका” म्हणजे सप्तमातृका (सप्तदेवी) — ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी, चामुंडा अशा देवींचा समूह.
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved
China Trip
DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...
-
आपण अलिकडे हवामानातील बदल, पर्यावरणाचे रक्षण वगैरे विषयांबद्दल बरेच वाचतो आणि ऐकतो. पर्यावरणाचे रक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे ...
-
ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसचे वातावरण सुरू होते. आमची सून मनाली हिने हंटर्स व्हॅली गार्डनमध्ये ख्रिसमस ला...
-
थायलंड (पूर्वीचे नाव : सयाम) हा आग्नेय आशियातील सुंदर देश आहे. येथे आधुनिक प्रगती आणि प्राचीन संस्कृती यांचा सुंदर संगम ...