सत्त्वशुद्धी, निर्भयता | ज्ञानयोगात मग्नता || दम, यज्ञ, दानशीलता | स्वाध्याय, तप, सरळपणा-|| अ.१६, ओ.१||
-अहिंसा, शांती, क्रोधहीनता | त्याग, दोषदृष्टीचा अभाव, सत्यशीलता || भूतदया, लोभहीनता | मृदुता, चंचलतेचा अभाव-||अ.१६, ओ.२||
-तेज, धैर्य, क्षमाशीलता | द्रोह, अभिमानाचा अभाव आणि शुद्धता || हे त्याचे गुण भारता | जो दैवी संपत्तीसहित जन्मतो || अ.१६, ओ.३||
दंभ, दर्प, अभिमान | क्रोध, कठोरता आणि अज्ञान || हे आहेत त्याचे गुण | जो आसुरी संपत्तीसहित जन्मतो || अ.१६, ओ.४||
दैवी संपत्ती देते मोक्षास | आसुरी संपत्ती होते कारण बंधनास || पांडवा, तू दैवी संपत्ती घेऊन जन्मलास | तेव्हा शोक सोडून दे || अ.६, ओ.५||
भूतांचे दोन प्रकार | एक दैवी तर दुसरे आसुर ||दैवी भूतांचा याआधी केला विस्तार | आता पार्था ऐक आसुरांबद्दल || अ.१६, ओ.६||
प्रवृत्ती आणि निवृत्ती | आसुर जन न जाणती ||नसे त्यांना क्षिती | शुद्धता, आचार किंवा सत्याची || अ.१६, ओ.७||
ईश्वर नाही जगात | जग आहे असत्य, प्रतिष्ठाविरहित || परस्परसंबंध नसे त्यात | त्यास कामपूर्तीशिवाय अन्य हेतू नाही || अ.१६, ओ.८||
असा दृष्टिकोन स्वीकारून | अहितकारी, उग्र कर्मे करून || हे अल्पबुद्धी, स्वत:चा नाश ओढवून | जगाच्या नाशास सिद्ध होती ||अ.१६, ओ.९||
तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन | दंभ, अभिमान, मद, अशुद्धता यांनी युक्त होऊन ||मोहाने अयोग्य गोष्टींचा आग्रह धरून | ते वर्तन करतात || अ.१६, ओ.१०||
वाहणे आमरणांत | चिंता अपरिमित || राहणे कामतृप्ती आणि उपभोगात रत | एवढेच त्यांनी ठरवले || अ.१६, ओ.११||
शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध होऊन | काम आणि क्रोधात होऊन परायण || काम आणि भोगांचे करण्या समाधान | अन्यायाने धनसंचय इच्छितात || अ.१६, ओ.१२||
‘मी आज मिळवले यास | पूर्ण करीन त्या मनोरथास || मिळवले या धनास | ते धनही माझे होईल || अ.१६, ओ.१३||
मी मारले या शत्रूस | मारीन त्या दुसऱ्यास || मी ईश्वर, मी भोगी खास | मी सिद्ध, बलवान आणि सुखी || अ.१६, ओ.१४||
पुष्कळ माझे गणगोत, आहे मी धनसंपन्न | नाही कोणी माझ्यासमान || यज्ञ करीन, दान देईन, ऐष करीन’ | असे म्हणणारे अज्ञानविमोहित,- || अ.१६, ओ.१५||
-अनेक विचारांनी भ्रमित झालेले, | मोहजालात गुंतलेले, || कामभोगात आसक्त झालेले | हे जन अशुद्ध नरकात पडतात || अ.१६, ओ.१६||
गर्विष्ठ आणि आत्मकेंद्रित | धन, मान, मदाने उन्मत्त || दांभिकपणे, नावासाठी यज्ञ करतात | विधीला सोडून || अ.१६, ओ.१७||
असे अहंकार, बल आणि दर्प त्यांच्यात | असती काम आणि क्रोधाने युक्त || सर्वांच्या देहात | राहणाऱ्या माझा द्वेष करती || अ.१६, ओ.१८||
ते द्वेष्टे, क्रूर | अशुभ आणि अधम नर || त्यांना संसारातील योनींत आसुर | निरंतर मी पाठवतो || अ.१६, ओ.१९||
जन्मोजन्मी आसुरी योनींस | जावे लागते त्या मूढांस || जातात अधम गतीस | माझी प्राप्ती न होता कौंतेया || अ.१६, ओ.२०||
काम, क्रोध, लोभ यांच्या रूपात | आहे नरकाचे त्रिविध द्वार साक्षात || करते आपला घात | म्हणून त्या तिघांस सोडावे || अ.१६, ओ.२१||
तमरूप या तीन द्वारांपासून | कौंतेया, जो नर जातो सुटून || तो करतो आत्महितकारी वर्तन | आणि जातो परम गतीस || अ.१६, ओ.२२||
जो शास्त्रविधीस सोडून | वागतो इच्छांस अनुसरून || तो बसतो सिद्धी गमावून | त्यास न मिळे सुख, न परम गती || अ.१६, ओ.२३||
म्हणून प्रमाण मानून शास्त्रास | ठरवावे कार्य किंवा अकार्यास || जाणून शास्त्रातील विधानांस | कर्म करणे योग्य आहे || अ.१६, ओ.२४ ||
असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘दैवासुरसम्पद्विभागयोग’ नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment