अर्जुन म्हणाला
जे सोडून शास्त्रविधीस | श्रद्धेने करतात पूजनास || कृष्णा, त्यांच्या श्रद्धेस | सात्त्विक, राजस की तामस मानावे || अ.१७, ओ.१||
श्रीभगवान म्हणाले
अनुसरून स्वभावास | देहधारी धारण करतो तीन श्रद्धांस || सात्त्विक, राजस किंवा तामस | कशा ते ऐक || अ.१७, ओ.२||
स्वभावानुसार सर्व जण | भारता, करती श्रद्धेचे पालन || मनुष्य आहे श्रद्धापूर्ण | जशी श्रद्धा, तसाच तो || अ.१७, ओ.३||
सात्त्विक भजती देवांस | राजस भजती यक्षराक्षसांस || भूत आणि प्रेतगणांस | भजती तामसी लोक || अ.१७, ओ.४||
जे लोक दंभ आणि अहंकाराने युक्त | कामवासनांत आसक्त || न सांगितलेले शास्त्रात | घोर तप करून-||अ.१७, ओ.५||
-शरीरात राहणाऱ्या मला | आणि पंचमहाभूतसमूहाला || कारण होती त्रासाला, | ते अविवेकी लोक, जाण आसुर वृत्तीचे || अ.१७, ओ.६||
या तिघांच्या आहाराची | आवड तीन प्रकारची ||तीच तऱ्हा यज्ञ, तप आणि दानाची | फरक त्यांतील ऐक || अ.१७, ओ.७||
आयुष्य, सत्त्व, बल आणि आरोग्य वाढविणारा | सुख आणि प्रीती उत्पन्न करणारा || रम्य, स्निग्ध, स्थिर आणि मन प्रसन्न ठेवणारा | आहार सात्त्विकांस आवडतो || अ.१७, ओ.८||
कडू, आंबट, खारट आणि अति उष्ण असणारा | तिखट, रुक्ष आणि दाह करणारा || दु:ख, शोक आणि रोग उत्पन्न करणारा | आहार राजसांस आवडतो ||अ.१७, ओ.९||
तीन प्रहरांपूर्वी शिजविलेले | रसहीन, दुर्गंधियुक्त, नासलेले || अपवित्र उष्टे झालेले | अन्न तामसांस आवडते || अ.१७, ओ.१०||
फळाची आशा सोडून | शास्त्रविधीस अनुसरून ||यज्ञ हेच कर्तव्य मानून आणि मन शांत ठेवून | केलेला यज्ञ तो सात्त्विक || अ.१७, ओ.११||
फळाची आशा धरून | केवळ ढोंग म्हणून ||केलेला जाण | राजस यज्ञ || अ.१७, ओ.१२||
शास्त्रविधी सोडून, न करता अन्नसंतर्पण || न देता दक्षिणा, मंत्रहीन || करता श्रद्धाविहीन | तामसी यज्ञ म्हणतात || अ.१७, ओ.१३||
शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप | देव, ब्राह्मण, गुरू, विद्वानांस पुजणे | शुद्ध राहणे, सरळ वागणे || ब्रह्मचर्य आणि अहिंसा पाळणे | यास शारीरिक तप म्हणतात || अ.१७, ओ.१४||
दुसऱ्यास ज्याने न होईल त्रास | सत्य, प्रिय, साधेल हितास || होईल स्वाध्याय आणि अभ्यास | असे बोलणे म्हणजे वाचिक तप || अ.१७, ओ.१५||
मन प्रसन्न ठेवणे, सौम्य राहणे | मौन आणि आत्मनिग्रह पाळणे || शुद्ध भाव बाळगणे | यास मानसिक तप म्हणतात || अ.१७, ओ.१६||
न इच्छिता फळास | परावर ठेवून श्रद्धेस || करता या तीन प्रकारच्या तपास | म्हणती त्यास सात्त्विक तप || अ.१७, ओ.१७||
व्हावा सत्कार, मिळावा मान, व्हावे स्वत:चे पूजन | आणि ढोंग म्हणून || केलेले तप राजस जाण | ते असते अस्थिर आणि अनिश्चित || अ.१७, ओ.१८||
दुराग्रह पूर्ण करण्यास | ज्यात स्वत:सही होई त्रास || किंवा दुसऱ्याच्या नाशास | केले जाते ते तप तामस || अ.१७, ओ.१९||
दान हे कर्तव्य मानून | परतफेडीची अपेक्षा न ठेवून || स्थळ, काळ आणि पात्रता पाहून | दिलेले दान सात्त्विक || अ.१७, ओ.२०||
परतफेड व्हावी म्हणून | फळाची अपेक्षा ठेवून ||स्वत:स त्रागा करून | दिले जाते ते राजस दान || अ.१७, ओ.२१||
अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीस | करून अपमानित त्यास || दिलेल्या दानास | तामस म्हणतात || अ.१७, ओ.२२||
'ॐ तत्सत् इति' असा ब्रह्माचा | निर्देश तीन प्रकारचा || त्यांतून ब्राह्मण, वेद आणि यज्ञांचा | उद्भव पूर्वी झाला || अ.१७, ओ.२३||
त्या कारणे ब्रह्मवादी जन | ॐकार उच्चारून ||यज्ञ, तप, दान | या शास्त्रोक्त क्रिया आरंभती || अ.१७, ओ.२४||
मोक्ष इच्छिणारे जन | फळाची इच्छा सोडून || 'तत्' शब्दाचा उच्चार करून | यज्ञ, तप, दान अशा क्रिया करती || अ.१७, ओ.२५||
सद्भाव आणि साधुभाव दाखवण्यास | तसेच प्रशस्त कर्माच्या निर्देशास || येतो उपयोगास | 'सत्' हा शब्द पार्था || अ.१७, ओ.२६||
यज्ञ, तप आणि दान देणे | तसेच त्यांसाठी कर्म करणे || या सर्वांस एकत्रितपणे | 'सत्' असेच म्हणतात || अ.१७, ओ.२७||
श्रद्धेवाचून केलेले तप, कर्म, हवन | आणि दिलेले दान || पार्था, हे सारे 'असत्' जाण | इहलोकात वा परलोकात ते न उपयोगी || अ.१७, ओ.२८||
असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘श्रद्धात्रयविभागयोग ’ नावाचा सतरावा अध्याय पूर्ण झाला.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment