Monday, October 13, 2025

शिवगीता-अध्याय ६- विभूतियोग

श्रीराम म्हणाला

हे भगवन् , तुझी कांती स्फटिकासमान | तुझे तीन नयन | शिरावर करसी चंद्र धारण | पुरुषरूपात तू-  || अ.६, ओ.१|| 

-अंबा आणि प्रमथगणांसोबत | रमतोस सुखात. |   | स्वतः बद्ध असताना अशा मूर्त रूपात | कसा म्हणू शकतोस -|| अ.६, ओ.२||

-की पंचभूतांस आणि सर्व जगास | निर्माण तू केलेस? | हे गिरिजाकांता, तूच निरसन करू शकतोस | माझ्या या शंकेचे. || अ.६, ओ.३ ||

श्रीभगवान म्हणाले-

चांगला  केलास प्रश्न |  हे सुव्रता, तुझ्या भक्तीनें व ब्रह्मचर्याने प्रसन्न होऊन |   जें देवांना समजण्यास कठिण | ते तुला देतो ज्ञान-  || अ.६, ओ.४ ||

-त्यायोगे  करशील पार | सहजतेने संसारसागर. | पंचभूते जी दृष्टिगोचर | आणि चौदा लोक, || अ.६, ओ.५||

-समुद्र, नद्या, देव | ऋषी आणि दानव |

अचल वस्तू आणि चल जीव   | जे दृष्टीस पडतात || अ.६, ओ. ६ ||

प्रमथ,  नाग  आणि गंधर्व | या माझ्या विभूती सर्व. |

एकदा ब्रह्मादी देव | माझे स्वरूप पाहण्याच्या इच्छेने- || अ.६, ओ.७ ||

-आले माझ्या प्रिय मंदरपर्वतावर | आणि  जोडून कर | स्तुती करून माझ्यासमोर | उभे राहिले. || अ.६, ओ. ८ ||

तेव्हा माझी लीला दाखवून | मी केले अपहरण | सकल ज्ञान |  ब्रह्मादी देवांचे. || अ.६, ओ. ९||

ते ज्ञानहीन होऊन | विचारती मला, 'आपण कोण?'|  'मीच देव पुरातन' | मी उत्तर दिले, || अ. ६, ओ. १० ||

'हे सुरेश्वर हो, होतो पूर्वी मी | आता आहे मी | पुढे असेन मी | माझ्यावाचून काही नसे जगी || अ.६, ओ.११||

हे सुरेश्वर हो, मी नाही ज्यात | अशी वस्तू नाही जगात | मी शाश्वत, अशाश्वत, पापरहित | ब्रह्मदेवाचाही स्वामी || अ.६, ओ.१२ ||

दक्षिणेकडे, उत्तरेकडे |  पूर्वेकडे व पश्चिमेकडे | खालीं, वर, आग्नेयादी उपदिशांकडे | आहे मी सुरेश्वर हो || अ. ६, ओ. १३ ||     

सावित्री अन् गायत्री मी | पुरुष, नपुंसक आणि स्त्री मी | त्रिष्टुप्, जगती, अनुष्टुप्, पंक्ति, छंद मी | तीन वेदसुद्धा मीच आहे || अ.६, ओ.१४ ||

सत्य, सर्वगामी ,शांत‌ मी | त्रेताग्नि, गौरी (=पार्वती), गुरु मी | गौरी (=शक्ती), गह्वर(=गूढस्थान) मी | मीच स्वर्ग, मीच जग व्यापणारा || अ.६, ओ.१५ ||

मी ज्येष्ठ, श्रेष्ठ सर्व देवांत | मी पाण्याचा अधिपती, वरिष्ठ सर्वांत | मी आर्य, ईश, भगवंत | मी तेज,  आदि (=आरंभ) सर्वांचा || अ.६, ओ.१६ ||

मी ऋग्वेद, यजुर्वेद | मी स्वयंभू, मी सामवेद |  मी मंत्र , मी अथर्ववेद | अंगिरसांमध्ये श्रेष्ठ मी || अ. ६, ओ. १७ ||

पुराणे मी , इतिहास मी |  कल्पसूत्रे मी, कल्पसूत्रांचा जाणता मी | नाराशंसी मी, गाथा मी | मी विद्या, मी उपनिषदे || अ. ६, ओ. १८ ||

श्लोक आणि सूत्रे मी | व्याख्याने आणि अनुव्याख्याने मी | परविद्या (=अध्यात्मविद्या) मी | मी इष्ट हवन आणि आहुती || अ.६, ओ.१९ ||

दत्त (=दिलेले) आणि अदत्त (=न दिलेले) यांनी व्यापलेला हा लोक मी | परलोक मी, अक्षर मी | दांति मी, शांति मी | भूते सारी क्षर (=नाशवंत) असती || अ.६, श्लो.२० ||

सर्व वेदांचे गुह्य जे आरण्यक ते मी | जन्मरहित मी | पुष्कर, पवित्र, मध्य मी | मी सर्वांच्या पुढे || अ. ६, ओ. २१ ||

बाहेर मी, आत मी | पुढे मी, अव्यय मी | तेज मी, अंधार मी | इंद्रिये मी, मी त्यांच्या पाच मात्रा (=इंद्रियांचे विषय)  || अ.६, ओ.२२||

बुद्धी मी, अहंकार मी | विषयसुद्धा मी | ब्रह्मा, विष्णू, महेश मी | मी उमा, स्कंद आणि विनायक || अ.६, ओ. २३||

इंद्र मी, अग्नी मी, यम मी | निर्ऋती, वरुण, अनिल (=वारा) मी | कुबेर मी, ईशान मी | मी भू, भुव, स्व, मह, जन || अ.६, ओ.२४ ||

तप मी, सत्य मी, पृथ्वी मी | आप (=पाणी) मी, तेज मी, अनिल मी | आकाश मी, रवी मी, सोम मी | मी नक्षत्रे आणि ग्रह || अ.६, ओ.२५||

प्राण मी, काल मी | मृत्यू मी, अमृत मी, भूत (=जीव) सुद्धा मी | वर्तमान मी, भविष्य मी | सर्व विश्व मी, मी सर्वात्मक || अ.६, ओ.२६ ||

गायत्री मंत्रातील आरंभीचा ॐ मी | मधील 'भूर्भुव: स्व:' मी | नेहमी जपले जाणारे गायत्रीशीर्ष मी | असा मी विश्वरूप आहे || अ.६, ओ.२७ ||

भक्षण केलेले मी प्राशन केलेले मी | केलेले कर्म मी, न केलेले कर्म मी | पर मी , अपर मी | मी सर्वपरायण आहे || अ. ६, ओ. २८ ||   

जगाचे दिव्य हित मी | अक्षर मी, सूक्ष्म मी, अव्यय मी | प्रजापती आणि सोम ज्यांचे पावित्र्य ते मी | मी अग्राह्य आणि सर्वांचा आरंभ || अ. ६, ओ. २९ ||

जगाचा संहारकर्ता मी |  सर्व जगास गिळणारा मी,  तेजाचा निधी (=साठा) मी | सर्वांच्या हृदयात  मी |  देवतारूपाने आणि प्राणरूपाने प्रतिष्ठित || अ.६, ओ. ३०||

ज्याचे शिर उत्तरेस | ज्याचे पाय दक्षिणेस | जो सर्वांत सरस | तो साक्षात त्रिमात्रक ओंकार मी || अ.६, ओ.३१||

वर नेतो  मी | खालीही आणतो  मी | आहे एकच मी | नित्य , सनातन ओंकार || अ.६, ओ.३२ ||

ऋचा, यजुर्मंत्र आणि साम यांचे पठण | यज्ञांत करी जो ब्राह्मण || त्याला मी करतो नमन | त्याकारणे मला प्रणव मानती || अ.६, ओ. ३३||

स्निग्धद्रव्य  मांसपिंडात शिरून | राहते त्यास व्यापून || तसा लोकांस व्यापतो म्हणून | मी सर्वव्यापी आहे || अ.६, ओ.३४||

ब्रह्मा, भगवान हरी यांना | तसेच अन्य देवांना |   माझा आरंभ आणि अंत कळेना | म्हणून मला अनंत म्हणती || अ. ६, ओ.३५ ||

गर्भवास, जन्म, जरा, मरण | संसारभवसागरापासून || भक्ताचे करतों रक्षण| म्हणून मला तार म्हणती || अ. ६, ओ. ३६ ||

चार प्रकारच्या जीवांत | राहतो जीवरूपात || आणि सूक्ष्मत्वाने त्यांच्या हृदयांत | म्हणून मला सूक्ष्म म्हणती || अ. ६, ओ. ३७ ||

जे ग्रस्त घोर अंधाराने | त्यांना उजळतो मी प्रकाशाने | माझ्या विजेसमान रूपाने | म्हणून मी विद्युत आहे  || अ. ६, ओ. ३८ ||

मी लोकांस प्रसवतो | मी त्यांचा लय करतो |  मी त्यांना वसवितो, त्यांचे पोषण करतो | म्हणून मी एकच ईश्वर आहे || अ. ६, ओ. ३९ ||

मी स्वतः ब्रह्म तुरीय | दुसरे काही नसे माझ्याशिवाय  | स्वतःत सर्व भूतांचा करून  लय | मी एकच रुद्र वास करतो || अ. ६, ओ. ४० ||

मी राहतो तिन्ही लोकांस नियंत्रित करुनी  | माझ्या ईशानी शक्तींनी | मी चक्षू  या जगाचा म्हणुनी |  ईशानरूप, ईश्वरी, स्वर्गदर्शक || अ.६, ओ.४१||

मी ईशान या जगाचा | मी ईशान नित्य सर्वांचा | मी ईशान सर्व विद्यांचा | म्हणून मी ईशान आहे || अ. ६, ओ.४२||

मी सर्व भावांस पाहतो | मी आत्मज्ञान  देतो  | मी योगाप्रत नेतो | म्हणून थोर पुरुष मला भगवान मानती || अ. ६, ओ. ४३ ||

मी   करतो निरंतर ग्रहणास | मी  करतो उत्पत्ती  आणि विलयास  | मी कारण सर्वांच्या अस्तित्वास | म्हणून आहे मी महेश्वर || अ. ६, ओ. ४४ ||



शब्दार्थ व टीपा:

श्लो.१

सङ्काश (ना.पुं)=सारखा दिसणारा 

चंद्रशेखर = (शेखर=शिराचे भूषण, अलंकार) चंद्र ज्याच्या शिराचे भूषण आहे असा, शिव.

परिच्छिन्न (वि.)=विभाजित, मर्यादित (श्लो.२)

यास्यस्यनायासाद्येन= संधिविग्रह= यास्यसि+अनायासात्+येन (श्लो.५)

श्लो. ६ मध्ये उल्लेख केलेले चौदा लोक:

हे लोक दोन भागांत विभागले जातात:

सप्त उर्ध्व लोक:

1. सत्यलोक – ब्रह्मदेवाचे निवासस्थान;

2. तपोलोक

3. जनलोक

4. महर्लोक

5. स्वर्लोक – इंद्राचे राज्य

6. भुवर्लोक – ऋषी व गंधर्व यांचे निवासस्थान

7. भूलोक – आपला पृथ्वीवरील मानवांचा लोक

सप्त अधोलोक:

8. अतल

9. वितल

10. सुतल – बळीराजाचे निवासस्थान

11. तालातल

12. महातल

13. रसातल

14. पाताळ – सर्वात खालचा लोक

श्लो.९

लीलाकुलितचेतसः (लीला + आकुलित + चेतसः)

लीला = ईश्वराची दिव्य क्रीडा; आकुलित = व्याकुळ, गोंधळलेले, भ्रमित झालेले; चेतसः = मन, चेतना, विचार.

दिवौकसाम् (दिवि + औकसाम्)

दिवि = स्वर्ग; औकसाम् = राहणारे (औकस = वास करणारा): दिवौकस म्हणजे स्वर्गात राहणारे, म्हणजेच देवता.

मत्तः = "माझ्यापासून", "माझ्याव्यतिरिक्त", "माझ्या वगळता" (श्लो.११)

श्लो.१३

ही सर्व शब्दरूपे "अञ्" प्रत्ययाने बनलेली विशेषणे आहेत, जी दिशा दर्शवणारी आहेत:

दक्षिण= दक्षिण दिशा; दक्षिणाञ्च =दक्षिण दिशेला असलेला; उदक = उत्तरेस ; उदञ्चः =उत्तर दिशेला असलेला; प्र =पूर्वेस; प्राञ्चः = पूर्व दिशेला असलेला; प्रत्य= पश्‍चिमेस; प्रत्यञ्चः =पश्चिम दिशेला असलेला.

विदिशः = कोनदिशा, म्हणजे मुख्य चार दिशांच्या मधल्या दिशाही (जसे की आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान).

दिशः = मुख्य दिशांचा उल्लेख – पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण.

श्लो.१४

सावित्री=वेदांचे दुसरे रूप

त्रिष्टुब् – वेदांमधील एक छंद (metre) — प्रायः ऋग्वेदात वापरला जातो (११ अक्षरी पंक्ती).

जगती – दुसरा वेदछंद — १२ अक्षरी पंक्ती.

अनुष्टुप् – सर्वसामान्य ८+८ अक्षरी पंक्ती असलेला छंद (जसा की श्रीरामरक्षेतील श्लोक).

पंक्तिः – पंक्ति नावाचा १० अक्षरी छंद.

छन्दः – म्हणजे छंद/छन्दःशास्त्र, म्हणजे वाचन/पठणातील लयबद्धता.

त्रयीमयः – वेदत्रयींमधून निर्माण झालेला — म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांचा मूर्त स्वरूप.

श्लो.१५

गह्वर=गुहागृह, गुहा, खोल जागा; अंधाराचे स्थान, अरण्य किंवा डोंगरातील दुर्गम जागा; एखादी खोल, गंभीर किंवा गूढ जागा.

त्रेताग्निः – त्रेतायुगातील यज्ञातला अग्नि. तीन प्रकारचे अग्नि – गार्हपत्य, आहवनीय, दक्षिणाग्नि

गौर्यः अहं – मी गौरी आहे (म्हणजे पार्वतीस्वरूप किंवा ती शक्ती).

गौर्यः अहं – मी पुनः गौरी आहे (पुनरुक्ती; यात शक्तीस्वरूप दाखवले आहे).

श्लो.१६

अपां पतिः — पाण्यांचा अधिपती (वरुण किंवा जलतत्त्वाचा स्वामी).अप्" (अर्थ: पाणी)  

"अप्" हा शब्द प्रायः फक्त बहुवचनी (plural only) रूपातच वापरला जातो. एकवचन किंवा द्विवचन प्रायः वापरात नाहीत.

श्लो.१७

अङ्गिरस ऋषींबद्दल माहिती:

अङ्गिरा (किंवा अङ्गिरस) हे वेदकाळातील एक प्रसिद्ध सप्तर्षी होते. ते एक महत्त्वाचे ब्रह्मर्षी मानले जातात.

अथर्ववेद आणि काही ऋग्वेद सूक्त अङ्गिरस ऋषी किंवा त्यांच्या वंशजांनी रचले आहेत.

ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी अङ्गिरा हे एक होते.

अग्नि, बृहस्पति, उतथ्य, आणि शंख हे त्यांच्या पुत्रांपैकी मानले जातात (काही मतांनुसार).

अङ्गिरस ऋषी अनेक मंत्रद्रष्टा ऋषींचे वंशजही आहेत. म्हणूनच "अङ्गिरस" हा शब्द कधी कधी संपूर्ण ऋषिवंशासाठी वापरला जातो.

मूलतः "अङ्गिरा" हा एक ऋषी होता, पण "अङ्गिरस" हा शब्द बहुवचनी अर्थाने देखील वापरला जातो.

वेदकाळात अङ्गिरस ऋषींचा एक वंश होता, आणि त्यात अनेक ऋषी होत. म्हणून "अङ्गिरस" म्हणजे अङ्गिरा ऋषी व त्यांच्या वंशजांचे समुदाय.

ऋग्वेदातील अनेक सूक्ते अङ्गिरस ऋषी किंवा त्यांच्या वंशजांनी रचली आहेत.

श्लो.४१

सर्वांल्लोकान्यदीशेहमीशिनीभिश्च शक्तिभिः ।ईशानमस्य जगतः स्वर्दृशं चक्षुरीश्वरम् ॥ ४१ ॥


मी या श्लोकाचा अन्वय असा केला आहे-
अन्वय:
यद् अहं सर्वांन् लोकान् ईशिनीभि: शक्तिभि: ईशे, (अहं) अस्य जगत: ईशानं, स्वर्दृशं, ईश्वरम् चक्षु: अस्मि |
अर्थ-
ज्या अर्थी मी सर्व लोकांस (=त्रैलोक्यास) माझ्या ईशिनी शक्तींनी नियंत्रित करतो,  (त्या अर्थी मी) या जगाचा ईशानरूप, स्वर्ग दाखविणारा, ईश्वररूप असा चक्षू (=डोळा) आहे.

शिवांच्या ईशिनी शक्ती:

1️⃣ चिद्‌शक्ती (चित्शक्ती) ज्ञानरूप — सर्व चेतनेचा स्रोत शिवस्वरूप
2️⃣ आनन्दशक्ती सुख, समाधान, ब्रह्मानंद यांचे मूळ पाराशक्ती / आदिशक्ती
3️⃣ इच्छाशक्ती सृष्टी करण्याची इच्छा, संकल्प भवानी / काली
4️⃣ ज्ञानशक्ती सृष्टीचे नियोजन करणारी बुद्धिशक्ती सरस्वती
5️⃣ क्रियाशक्ती प्रत्यक्ष सृष्टी निर्माण करणारी कार्यशक्ती पार्वती / दुर्गा
श्लो.४४ अजस्रम् (क्रि. वि.)=अखंडपणे, निरंतर







Thursday, October 9, 2025

II श्री गजानन विजय परिचय II अध्याय ६ मधमाश्यांच्या चावण्याचा महाराजांवर परिणाम नाही

 

--------------------------------------------------------+-

या अध्यायात काय आहे:-

-मधमाश्यांच्या चावण्याचा महाराजांवर परिणाम नाही

-महाराजांची आणि अकोटचे श्रीनरसिंगजी महाराज यांची भेट

-शिवर गावचे व्रजभूषण पंडित आणि महाराजांची भेट

-महाराज बंकटलालचे घर सोडून शेगावातील मारुतीच्या मंदिरात वास्तव्यास जातात

------------------------------------------------------+---

🌺 मधमाश्यांच्या 🐝 🐝 🐝 चावण्याचा महाराजांवर परिणाम नाही 

शेगावातील  महाराजांचे वास्तव्य बंकटलालच्या घरीच होते. गावाच्या दक्षिणेस बंकटलालचा मळा होता. या मळ्यात एक दिवस सर्वजण महाराजांना घेऊन कणसे खाण्यास गेले. मळ्यात मोठमोठी झाडे होती. एका विहिरीजवळ सर्वांनी कणसे भाजण्याची तयारी केली आणि दहा बारा आगट्या पेटवल्या. या आगट्यांमुळे धुराचा डोंब उठला आणि चिंचेच्या झाडावर असणाऱ्या मोहळातून मधमाश्या घोंघावू लागल्या आणि त्या साऱ्या मळ्यात पसरल्या. त्याबरोबर सारी मंडळी घाबरून कणसे तेथेच टाकून पळाली.

महाराज मात्र आपल्या जागी बसून होते. साऱ्या माश्या महाराजांच्या अंगावर बसल्या आणि महाराज जणू माश्यांची पासोडी पांघरले आहेत असे ते दृश्य दिसत होते. महाराज चिंतन करीत होते की माशीही मीच झालो आणि मोहळही मीच झालो. कणसे खाण्यास मीच आलो आणि कणसेही माझेच रूप आहे. माश्या मात्र महाराजांना चावतच होत्या आणि त्यांचे असंख्य काटे महाराजांच्या अंगात रुतले होते. महाराज मात्र चिंतन करीत आनंदात डोलत होते.

असा एक प्रहर लोटला. भक्त चिंतातुर झाले. बंकटलालला वाटू लागले की आपण उगीचच महाराजांना मळ्यात येण्यास भरीस पाडले. आपल्यामुळेच महाराजांवर हे संकट ओढवले. त्यामुळे तो मळ्यात जाण्यास निघाला.

बंकटलाल आपल्याला भेटण्यास येतो आहे हे महाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि माश्यांपासून त्याला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी माश्यांना मोहळात परत जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे माश्या मोहळामध्ये परत गेल्या.

बंकटलाल जेव्हा इतर खेडूतांसह मळ्यात पोहचला, तेव्हा महाराज हसून त्याला म्हणाले, 

' वा ! माश्यांची छान मेजवानी दिली की मला ! ते विषारी जीव माझ्या अंगावर बसले, तेव्हा लड्डूभक्त पळून गेले. यावरून तरी धडा घे की संकट आल्यावर एका ईश्वरावाचून कोणी सहाय्य करणार नाही.'

बंकटलाल यावर गोड शब्दांत म्हणाला,' महाराज, मी महापापी आहे. माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. तुमच्या अंगातील काटे काढण्यासाठी सोनाराला बोलावू का?'

महाराज यावर म्हणाले,' बाबा रे, मला काही झाले नाही. डसणे हा माश्यांचा स्वभावधर्म आहे. माश्यासुद्धा सच्चिदानंदस्वरूप आहेत. ते स्वरूप मी जाणले. म्हणून त्या मला इजा करू शकल्या नाहीत.'

तरीसुद्धा बंकटलालने सोनारांना बोलावले. सोनार त्याप्रमाणे चिमटे घेऊन आले आणि महाराजांच्या शरीरात काटे शोधू लागले.

महाराजांनी आपल्या शरीरातील वायू रोखून धरताच सारे काटे आपोआप वर आले. हे पाहून लोक चकित झाले आणि महाराजांची योग्यता त्यांना कळली.

🌺 महाराजांची आणि अकोटचे श्रीनरसिंगजी महाराज यांची भेट

शेगावच्या ईशान्य दिशेह सुमारे अठरा कोसांवर (५७ किमी) अकोट नावाचे गाव आहे.

शेगाव आणि अकोट यांचे स्थान दाखविणारा नकाशा (Source: © OpenStreetMap contributors)

या अकोटमध्ये श्रीनरसिंगजी महाराज नावाचे संत होते. श्री नरसिंगजी महाराज जातीने मराठा असून कोतश्या अल्लीचे शिष्य होते. श्रीनरसिंगजी महाराज विठ्ठलभक्त होते. (या श्रीनरसिंगजी महाराज यांच्याविषयी श्री दासगणूंनी त्यांच्या भक्तलीलामृतात लिहिले आहे असा या अध्यायात उल्लेख आहे). या श्रीनरसिंगजी महाराजांचा आणि श्रीगजानन महाराजांचा स्नेह होता.

एकांत मिळावा म्हणून  श्रीनरसिंगजीमहाराज अकोटजवळील घनदाट अरण्यात राहत. श्रीनरसिंगजीमहाराजांना एकदा श्रीगजानन महाराज भेटण्यास गेले. यावेळी दोन्ही संतश्रेष्ठांच्या आध्यात्मिक विषयावर बऱ्याच चर्चा झाल्या. श्रीगजानन महाराज श्रीनरसिंगजी महाराजांच्या सहवासात रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी श्रीगजानन महाराजांनी श्री नरसिंगजी महाराजांचा निरोप घेतला. त्या वेळी श्रीनरसिंगजी महाराजांनी श्री गजानन महाराजांना असेच भेटत राहण्यास सांगितले.

गजानन महाराज श्री नरसिंग महाराजांना भेटण्यासाठी आल्याची बातमी गुराख्यांतर्फे गावात पोहचताच गावकरी त्यांना भेटण्यास लोटले. परंतु त्याआधी गजानन महाराज तेथून निघून गेले होते.

🌺 शिवर गावचे व्रजभूषण पंडित आणि महाराजांची भेट
गजानन महाराज शिष्यांबरोबर फिरत दर्यापूरजवळील शिवर नावाच्या गावी आले. हे गाव चंद्रभागेच्या तीरावर आहे.  ही चंद्रभागा आपल्या परिचयाची पंढरपूरजवळ  असणारी नाही . पयोष्णीला मिळणारी ही एक छोटी नदी आहे.

या शिवर गावात व्रजभूषण नावाचा पंडित राहत होता. हा व्रजभूषण फार विद्वान असून त्याला चार भाषा येत होत्या. व्रजभूषण सूर्याचा भक्त होता. तो रोज सकाळी चंद्रभागेच्या तीरी येऊन सूर्याला अर्घ्य देत असे.

त्याच्या नित्यक्रमाप्रमाणे तो चंद्रभागेच्या तीरावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आला असता त्याला महाराजांचे दर्शन झाले. महाराज वाळवंटामध्ये ध्यानस्थ बसले होते. सभोवती त्यांचे शिष्य बसले होते.

महाराजांना पाहताच व्रजभूषणाला त्यांच्या दिव्यत्वाची ओळख पटली. सूर्याऐवजी महाराजांनाच अर्घ्य देऊन त्याने महाराजांचे पूजन केले आणि महाराजांच्या स्तवनपर श्लोक म्हटला-

हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । 

ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी 

झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । 

नासे गजाननगुरोमज पाव आतां ॥१॥

आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराजांनी व्रजभूषणाला प्रेमाने आलिंगन देऊन आशिर्वाद दिला. 

व्रजभूषणाला कर्ममार्गाचा उपदेश करून महाराज शिष्यांसह शेगावला परत आले.

🌺 महाराज बंकटलालचे घर सोडून शेगावातील मारुतीच्या मंदिरात वास्तव्यास जातात

महाराज अशा प्रकारे अकोट, अकोले, मलकापूर अशा निरनिराळ्या गावांत सतत फिरत असत. श्रावण महिन्यात या मंदिरात मारुतीचा मोठा उत्सव होत असे. या उत्सवामध्ये अभिषेक, भजन, कीर्तन असे निरनिराळे कार्यक्रम चालत. अन्नदान होत असे. खंडू हा गावचा पाटील या उत्सवाचा पुढारी होता.

हा उत्सव सुरू होण्याच्या सुमारास महाराज या मारुतीच्या मंदिरात आले आणि बंकटलालला म्हणाले,' मी इथून पुढे या मारुतीच्या मंदिरात वास्तव्य करतो. गोसावी, संन्यासी, फकीर यांना कायमचे घर असू नये. त्यामुळे तुझ्यासारख्या प्रापंचिकाच्या घरी राहणे मला योग्य नाही.'

बंकटलालला ही गोष्ट पसंत नव्हती. परंतु महाराजांच्या निर्धारापुढे त्याचा निरुपाय झाला आणि अखेर तो तयार झाला आणि इथून पुढे महाराज मारुतीच्या मंदिरात वास्तव्य करू लागले. महाराजांचा भक्त भास्कर महाराजांच्या सेवेसाठी महाराजांबरोबर राहिला.

महाराज मारुतीच्या मंदिरात राहायला येताच सर्व गावकऱ्यांना खूप आनंद झाला. परंतु मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या पाटील मंडळींनी महाराजांशी संघर्ष सुरू केला. पण या संघर्षामुळेच पाटील मंडळींना महाराजांचे मोठेपण कळले. पाटील मंडळीचा अहंकार दूर करून त्यांना उचित मार्ग दाखवावा ही महाराजांचीच योजना असावी.

       || श्रीहरिहरार्पणमस्तु | शुभं भवतु ||

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved




 


 





 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


Friday, October 3, 2025

वटवृक्षाची आधुनिक कहाणी

वटवृक्षाची आधुनिक कहाणी

आटपाट नगर नव्हतंआजचं एक स्मार्ट सिटी होतंअंकिता सकाळी जागी झालीअंकिता उच्चविद्याविभूषित असली तरी पारंपरिक हिंदू रीतिरिवांजावर श्रद्धा ठेवत होतीआज वटपौर्णिमा होतीपती कामावर गेला होताअंकिता स्नान करून तयार झालीपारंपरिक साडी नेसूनपूजेचे साहित्यघेऊन  तिच्या नेहमीच्या मैत्रिणी हसतील म्हणून त्यांना  सांगताच वडाच्या पूजेस निघालीस्मार्ट सिटीच्या खूप बाहेर वडाचं एकच झाड शिल्लक राहिलं होतातेथे आलीवडाला फेऱ्या घातल्यावडाची पूजा केला आणि मनोभावे प्रार्थना करू लागली, '' 'मुलीअचानक गंभीर आवाज आलाअंकिता इकडे तिकडे पाहू लागली. 'कोण बोलत आहे?' तिने विचारलं. ' मीवटवृक्ष,' वटवृक्षाने उत्तर दिलं.' अय्याम्हणजे मी आजवर गोष्टी वाचल्यातसे तुम्ही माझ्या उपासनेवर प्रसन्न झाला आहात?' 'होय मुलीकाय प्रार्थना आहे तुझी ?'   'हे वटवृक्षामला जन्मोजन्मी हाच पती लाभू देअंकिता म्हणाली. 'तर माझा वसा ऐक.  उतू नकोसमातु नकोसघेतला वसा टाकू नकोस.' 'उतणार नाहीमातणार नाहीघेतला वसा टाकणार नाही.' अंकिता निश्चयाने म्हणाली. 'तर मग ऐकपतीशी प्रेमाने वागपतीला दुसऱ्या पतीची उदाहरणं देऊ नकोसपतीला मिष्टान्न नको आहेदोन गोड शब्द हवे आहेतयाने त्याचे आयुष्य वाढेलतुझे आयुष्यही वाढेलतुमचा हा जन्म तरी सुखाचा जाईलसात जन्मांचं कुणी पाहिलं आहे?' 'खरं आहे वटदेवा,' अंकिता मनापासून म्हणाली. 'आणखी,'वटवृक्ष म्हणाला. 'आणखी काय वटदेवा,'अंकितानं विचारलं. ' सध्या मलाच माझ्या जन्माची शाश्वती राहिली नाहीआज वडाची झाडं कुणी लावत नाहीतवटपौर्णिमा आली की लोकं क्रूरपणे माझ्या फांद्या तोडतातहे सर्व थाबलं पाहिजेतू शहाणी आहेसमाझी पूजा करण्यास वनात आलीसबाजारातून फांदी आणली नाहीसमला वाचवशीलतर सारी पृथ्वी वाचेलतरच तुम्हाला सात जन्मांची अपेक्षा ठेवता  येईल.' 'खरं आहेवटदेवातू माझे डोळे उघडलेसनिघते मी आता,' अंकिता वटवृक्षास नमस्कार करून म्हणाली आणि घरी आलीवटवृक्षाचा वसा आयुष्यभर मनोभावे पाळलावटवृक्ष अंकिताला पावलातिचा संसार सुखाचा झालातसा तुमचा आमचा संसार सुखाचा होवोही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरांत सुफळ संपूर्ण.   

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

 

शिर्डी साईबाबांचे निर्वाण, लक्ष्मीबाईंची कथा आणि अन्नदानाचा संदेश | Sai Baba Nirvana Story in Marathi

श्रीसाईसच्चरित (अध्याय ४२ मधून)

बाबांनी आपल्या निर्वाणाची तयारी केली. शके १८४० (इ.स.१९१८) मध्ये विजयादशमीचा दिवस बाबांनी निर्वाणकाळ म्हणून साधला. परंतु शके १८३८ (इ.स.१९१६) मध्ये दसऱ्याच्या दिवशीच बाबांनी आपल्या निर्वाणाचा संकेत दिला होता.

बाबा आपले कपडे जाळून टाकतात
तो १९१६ मधील विजयादशमीचा दिवस होता. संध्याकाळी शिलंगणाचा मुहूर्त. बाबांनी अचानक जमदग्नीचा अवतार धारण केला. त्यांनी आपले डोक्याला बांधायचे फडके सोडले. अंगातील कफनी काढली. अगदी कौपीन आणि लंगोटही सोडला. बाबा पूर्णपणे दिगंबर झाले. हे सारे कपडे बाबांनी धुनीत टाकली. धुनी पेटलेली होती आणि या कपड्यांचे इंधन मिळाल्यामुळे धुनीतील ज्वाळा चांगल्याच भडकल्या आणि हां हां म्हणता म्हणता कपडे जळून गेले.

एकीकडे बाबांचा तोंडाचा पट्टा चालू होता, ' घ्या एकदाचे बघून, मी हिंदू आहे की मुसलमान. शंका फेडून घ्या.'

विजयादशमीचा दिवस असल्याने बाबांना  पालखीतून नेण्यासाठी चावडीपाशी लोक जमले होते. बाबांचा रुद्रावतार पाहून त्यांच्या जवळ जाण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. शेवटी बाबांचा प्रिय भक्त भागोजी शिंदा धीर करून बाबांजवळ गेला आणि त्याने बाबांना लंगोट नेसवला. बाबा हळूहळू शांत झाले आणि लोक बाबांना वाजत गाजत पालखीत बसवून घेऊन गेले.

तात्याचे मरण स्वतःवर घेतले
बाबांच्या निर्वाणाआधी रामचंद्र दादा पाटील आजारी पडले. हे आजारपण इतके विकोपाला गेले की रामचंद्र दादा पाटील जिवाला कंटाळले. अशा परिस्थितीत एकदा मध्यरात्री त्यांच्या उशाशी बाबांची मूर्ती प्रगटली. बाबांनी पाटलांना सांगितले की पाटलांवरील गंडांतर टळले आहे, परंतु तात्याची धडगत नाही. बाबांनी पाटलांस असेही सांगितले की शके अठराशे चाळीसच्या विजयादशमीस तात्याला अक्षयपदाची प्राप्ती होईल. परंतु तात्याला हे न सांगण्याविषयी बाबांनी पाटलांना बजावले. तरीसुद्धा रामचंद्र पाटलांना राहवले नाही आणि ही गोष्ट त्यांनी बाळा शिंप्याच्या कानावर घातली. 

बाबांनी सांगितल्याप्रमाणे रामचंद्र पाटील बरे झाले परंतु शके अठराशे चाळीसच्या भाद्रपद महिन्यात तात्याने अंथरुण धरले. त्याला अतिशय यातना होऊ लागल्या आणि त्याला बाबांच्या दर्शनासही येता येईना. परंतु तात्याचा बाबांवर भरवसा होता.

याच सुमारास बाबांनाही शिरशिरी भरली. दुखण्यामुळे बाबांचेही कण्हणे , कुंथणे सुरू झाले.

इकडे बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ येऊ लागला तसे बाळा शिंपी आणि रामचंद्र पाटील घाबरून गेले.

तात्याची तब्येत अधिकाधिक बिघडत होती. त्याची नाडीही मंद होऊ लागली. पण प्रत्यक्षात निराळेच घडले. तात्यावरीलही गंडांतर टळले. बाबांचेच निर्वाण झाले. जणू बाबांनी आपली निर्वाणवेळ  कळू नये म्हणून तात्याचे नाव पुढे केले. लोक असेही म्हणतात की तात्याचे मरण बाबांनी स्वतःवर घेतले.

निर्वाणसमयी श्री दासगणूंना दृष्टांत
बाबांनी ज्या दिवशी देह ठेवला, त्या दिवशी सकाळी पंढरपूरमध्ये दासगणूंना दृष्टांत झाला तो असा-

'मशीद पडली ढांसळोनी | अवघे शिरडीचे तेली वाणी | त्रासवूनि सोडिले मजलागूनी | जातो तेथूनि मी आता || अ.४२, ओ.७०||
म्हणोनि आलो येथवरी | फुलांही मज 'बख्खळ' डंवरी | इच्छा एवढी पुरी करी | चल झडकरी शिरडीत' || अ.४२, ओ.७०||

त्याच वेळी शिरडीहून पत्र आले. त्यामध्ये बाबा समाधिस्थ झाल्याची बातमी होती. त्यामुळे दासगणू क्षणाचाही उशीर न करता शिरडीला जाण्यास निघाले. बरोबर शिष्यपरिवार घेऊन त्यांनी समाधीसमोर अष्टौप्रहर भजन-कीर्तनाचा गजर मांडला. त्या भजन-कीर्तनाच्या गजरामुळे शिरडी म्हणजे भूवरील वैकुंठच वाटू लागले.

निर्वाणाआधी बाबांनी लक्ष्मीला नऊ नाणी दिली
बाबांवर परम भक्ती असणारी लक्ष्मीबाई शिंदे बाबांच्या निर्वाणसमयी बाबांजवळ होती. निर्वाणास काही क्षण बाकी असताना बाबांनी कफनीच्या खिशात हात घालून लक्ष्मीला एकदा पाच आणि नंतर चार अशी एकूण नऊ नाणी दिली. बाबांनी नवविधा भक्तीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीला ही नऊ नाणी दिली असे मानतात.

बाबांचे निर्वाण 
बाबांना आपल्या निर्वाणाची वेळ जवळ आल्याचे कळले तेव्हा लोकांच्या जेवणाची वेळ झाली होती. बाबांनी एक दोघा ग्रामस्थांना जवळ बसवून इतरांना जेवायला जाण्यास सांगितले. अशा वेळी लोक जाण्यास तयार नव्हते, परंतु त्यांना बाबांचे मनही सोडवत नव्हते. त्यामुळे लोक जेवायला गेले, पण त्यांचे जेवणात लक्ष नव्हते. त्याच वेळी बाबांच्या निर्वाणाची बातमी आली आणि लोक जेवण अर्धवट टाकून धावत आले. बाबांनी बसल्या जागेवरच बयाजीच्या खांद्यावर डोके टेकवून निर्वाणवेळा साधली होती. बाबा लोककार्यासाठी अवतरले होते. हे कार्य पूर्ण होताच त्यांनी निर्वाणवेळा साधली. परब्रह्म हेच बाबांचे वैभव असल्याने ते जन्म-मरणाच्या अधीन नव्हते. त्यांचे निर्वाण हे सर्वसामान्यांसारखे निधन नव्हते. शिरडीच्या लोकांस मात्र दिवसा अंधार झाल्यासारखे वाटले.
🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 

उपकथा:

बाबांचा आणि लक्ष्मीचा भावबंध
बाबांचा आणि लक्ष्मीचा घनिष्ठ भावबंध होता. बाबांना दिवसभर भेटायला येणारे लोक संध्याकाळी परत जात. दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक भेटायला येत. परंतु काही ठराविक लोकांना कधीही बाबांकडे येण्याची परवानगी होती. यांमध्ये लक्ष्मीचा समावेश होता.

लक्ष्मीने दिलेली भाजी भाकर बाबा कुत्र्यास खाऊ घालतात
लक्ष्मी बाबांसाठी दररोज जेवणासाठी भाजी भाकर पाठवीत असे. एकदा संध्याकाळी बाबा तात्या पाटील यांच्याशी बोलत बसले होते. त्याच वेळी लक्ष्मी तेथे आली. त्या वेळी बाबांनी तिला खूप भूक लागल्याचे सांगितले. लक्ष्मी तत्परतेने बाबांसाठी भाजी भाकर घेऊन आली. परंतु बाबांनी ते पान सरळ उचलून कुत्र्यासमोर ठेवले. लक्ष्मी त्यामुळे खूप हळहळली आणि बाबांना म्हणाली की ,' मी तुमच्यासाठी भाजी भाकर बनवून आणली आणि ती तुम्ही कुत्र्याचे धन का केले?'

या वेळी बाबांनी तिला समजावून सांगितले की, 'या कुत्र्याची भूक आणि माझी भूक एकच आहे आणि त्याचे उदरभरण हे माझेच उदरभरण आहे. भुकेने व्याकुळ झालेल्या कुणाच्याही तोंडी घास घालणे म्हणजे मलाच अन्नदान करण्यासारखे आहे.'

लक्ष्मीने पाठवलेल्या भाकरीशिवाय बाबांचे जेवण होत नसे
येथून पुढे लक्ष्मी बाबांसाठी दररोज भाकर पाठवू लागली. ती बाबांसाठी भाकर दुधात कुस्करून ठेवी. बाबा सुद्धा प्रेमाने ही भाकर खात. नंतर तर बाबा या भाकरीची वाट पाहू लागले आणि भाकर पाठवण्यास उशीर झालेला त्यांना खपत नसे. बऱ्याचदा असे होई की इतर पात्रांतील जेवण निवडून जात असे, परंतु लक्ष्मीकडून भाकर आल्याशिवाय बाबांचे जेवण होत नसे.

लक्ष्मी बाबांसाठी शेवया पाठवू लागली
नंतर बाबा लक्ष्मीकडून तिसऱ्या प्रहरी शेवया मागवू लागले. यातील थोड्या शेवया बाबा राधाकृष्णाबाईंसाठी पाठवत.
© Dr. Hemant Junnarkar | Content protected under copyright. Reproduction without permission is prohibited.



Wednesday, October 1, 2025

गणपत वाणी

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना

चावायाचा नुसतीच काडी,

म्हणायचा अन मनाशीच की

या जागेवर बांधिन माडी

मिचकावुनि मग उजवा डोळा

आणि उडवुनी डावी भिवयी,

भिरकावुनि ती तशीच द्यायचा

लकेर बेचव जैसा गवयी

गि~हाईकाची कदर राखणे

जिरे, धणे अन धान्यें गळित,

खोबरेल अन तेल तिळीचे

विकून बसणे हिशेब कोळित

स्वप्नांवरती धूर सांडणे

क्वचित बिडीचा वा पणतीचा,

मिणमिण जळत्या आणि लेटणे

वाचित गाथा श्रीतुकयाचा

गोणपटावर विटकररंगी

सतरंजी अन उशास पोते,

आडोशाला वास तुपाचा

असे झोपणे माहित होते

काडे गणपत वाण्याने ज्या

हाडांची ही ऐशी केली,

दुकानातल्या जमीनीत ती

सदैव रुतली आणिक रुतली

काड्या गणपत वाण्याने ज्या

चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,

दुकानांतल्या जमीनीस त्या

सदैव रुतल्या आणिक रुतल्या

गणपत वाणी बिडी बापडा

पितांपितांना मरून गेला,

एक मागता डोळे दोन

देव देतसे जन्मांधाला!

केशवसुत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. कारण त्या़ंनी इंग्रजी कवितेच्या संपर्कातून मराठी कविता भक्तिकाव्यातून बाहेर काढली. या मराठी कवितेमध्ये पुढे प्रतीकांचा तोच  तो पणा येऊ लागले. मग आले बाळ सीताराम मर्ढेकर. त्यांनी निराळीच प्रतीके वापरून मराठी कवितेला नवी दिशा दिली.

बाळ सीताराम मर्ढेकरांची एक अतिशय लोकप्रिय कविता आहे - गणपत वाणी. या कवितेमध्ये उल्लेख आहे की गणपत वाणी माडी बांधण्याची स्वप्ने पाहता पाहता, माडी न बांधताच निवर्ततो. पुढे  कवी नारायण सुर्वे यांनी याच कवितेचा संदर्भ घेऊन त्यांच्या एका कवितेत मर्ढेकरांना उद्देशून म्हटले आहे की, ' तुम्ही आज असता तर तुमच्या गणपत वाण्याने माडी बांधलेली तुम्ही पाहिली असती.' 

गणपत वाण्यावरील ही कविता दहावी एस. एस.सी. ला अभ्यासासाठी होती. गणपत  वाण्याचे वर्णन करताना मर्ढेकरांनी   डोळे मिचकावणे, भुवया उडवणे, अशा गणपत वाण्याच्या शारीरिक व्यंगांना लक्ष केले आहे. कवितेचा शेवट करताना 

गणपत वाणी बिडी बापडा

पितांपितांना मरून गेला,

एक मागता डोळे दोन

देव देतसे जन्मांधाला

अशी कोटी करून हेटाळणीची पराकोटी केली आहे. रसग्रहणात याचा अर्थ काढला जातो की गणपत वाण्याकडे स्वप्नपूर्तीची क्षमताच नव्हती, म्हणजे तो जन्मांध होता. माडी बांधण्याचे स्वप्न पाहून तो देवाकडे एक डोळा मागत होता. पण त्याचा मृत्यू झाल्यामुळे तो माडी बांधण्याच्या त्रासातून सुटला किंवा वर गेला म्हणजे माडी बांधण्याच्या स्वप्नाच्याही वर गेला.

या कवितेचे सर्वसंमत रसग्रहण असे आहे की कवीने गणपत वाण्याच्या रूपात एक कर्तृत्वशून्य आणि निष्क्रिय व्यक्तिरेखेचा उपहास केला आहे.

वाणी हा तसा निरुपद्रवी प्राणी. या समाजाच्या भावना दुखावल्या आणि ही कविता अभ्याक्रमातून काढून टाकली, असे होत नाही. नाही म्हणायला मला एक प्रसंग आठवतो. एका अंदाजपत्रकाची नानी पालखीवाला यांनी 'वाण्याचे अंदाजपत्रक' अशी संभावना केली होती. त्यावेळी पुण्यातील प्रसिद्ध घाऊक व्यापारी नारायणदास गोविंददास यांनी सकाळ वृत्तपत्रात वाचकपत्र पाठवून नानी पालखीवालांवर टीका केली होती. 

गणपत वाणी कविता गणपत वाण्याच्या मृत्यूने संपते. मर्ढेकरांनी ही कविता गणपत वाण्याला दाखवली असती, तर त्याला ती कितपत कळली असती, शंका आहे. कदाचित तो म्हणाला असता,' काय साहेब, मी कुणी मोठा माणूस नाही, तरी पण तुम्ही माझ्यावर कविता लिहिली. बाळू, साहेबांना एक चहा घेऊन ये. बोला साहेब, काय पाहिजे आज? आंबेमोहोर तांदूळ चांगला आला आहे.' 'गि-हाइकाची कदर करणे', हेच त्याला माहीत.

आजच्या झगमगत्या मॉल्सच्या युगात गणपत वाणी बापडा कधीच भरून गेला आहे. 

स्टीफन लीकॉक या इंग्रजी लेखकाची My Taylor नावाची आपलल्या शिंप्यावर लिहिलेली सुंदर कथा आहे. लेखक आपल्या शिंप्याकडे ठराविक कपडे शिवण्यासाठी जातो. शिंप्याकडे कपडे शिवायला गेल्यावर ठराविक संभाषण होते. 

एक दिवस लेखक या शिंप्याकडे कपडे शिवायला गेला असताना त्याला कळते की हा शिंपी निवर्तला आहे. कुणीतरी त्याला सांगते की ध़ंद्यातील काळजीने तो खचत चालला होता. लेखकाला आश्चर्य वाटते की या शिंप्याला कसली काळजी होती? त्याला तर तो कधी काळजीमध्ये दिसला नाही.  मग लेखकाला जाणवते की त्याने त्याच्या शिंप्याकडे केवळ शिंपी म्हणून पाहिले, कधी माणूस म्हणून पाहिलेच नाही.

'जे न देखे रवी, ते देखे कवी' , अशी कवींची ख्याती असूनसुद्धा बाळ सीताराम मर्ढेकर किंवा नारायण सुर्वेंना गणपत वाण्यामधील माणूस का बरे दिसला नाही?


वाचकांना माझे मत कितपत पटते माहीत नाही, पण त्यांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्या.

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved


बाळ सीताराम मर्ढेकर

(जन्म १९०९, मृत्यू १९५६)



Tuesday, September 30, 2025

फालुन गॉंग (Falun Gong)

फालुन गॉंग (Falun Gong):
फालुन गॉंग (Falun Gong) किंवा फालुन डाफा (Falun Dada) ही एक विचारसरणी आहे.

ली हॉंग झी (Li Hongzhi):
ली हॉंग झी  (Li Hongzhi):- ली हॉंग झी हे या विचारसरणीचे संस्थापक आहेत.


Impressive English

Hit a roadblock:
Meaning:
Encounter an obstacle or problem that stops or delays progress.
Example:
We were making progress in the assignment, but we hit a roadblock when our guide fell sick

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...