वटवृक्षाची आधुनिक कहाणी
आटपाट नगर नव्हतं, आजचं एक स्मार्ट सिटी होतं. अंकिता सकाळी जागी झाली. अंकिता उच्चविद्याविभूषित असली तरी पारंपरिक हिंदू रीतिरिवांजावर श्रद्धा ठेवत होती. आज वटपौर्णिमा होती. पती कामावर गेला होता. अंकिता स्नान करून तयार झाली, पारंपरिक साडी नेसून, पूजेचे साहित्यघेऊन तिच्या नेहमीच्या मैत्रिणी हसतील म्हणून त्यांना न सांगताच वडाच्या पूजेस निघाली. स्मार्ट सिटीच्या खूप बाहेर वडाचं एकच झाड शिल्लक राहिलं होता, तेथे आली. वडाला फेऱ्या घातल्या, वडाची पूजा केला आणि मनोभावे प्रार्थना करू लागली, '' 'मुली' अचानक गंभीर आवाज आला. अंकिता इकडे तिकडे पाहू लागली. 'कोण बोलत आहे?' तिने विचारलं. ' मी. वटवृक्ष,' वटवृक्षाने उत्तर दिलं.' अय्या, म्हणजे मी आजवर गोष्टी वाचल्या, तसे तुम्ही माझ्या उपासनेवर प्रसन्न झाला आहात?' 'होय मुली, काय प्रार्थना आहे तुझी ?' 'हे वटवृक्षा, मला जन्मोजन्मी हाच पती लाभू दे' अंकिता म्हणाली. 'तर माझा वसा ऐक. उतू नकोस, मातु नकोस. घेतला वसा टाकू नकोस.' 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.' अंकिता निश्चयाने म्हणाली. 'तर मग ऐक, पतीशी प्रेमाने वाग, पतीला दुसऱ्या पतीची उदाहरणं देऊ नकोस, पतीला मिष्टान्न नको आहे, दोन गोड शब्द हवे आहेत, याने त्याचे आयुष्य वाढेल, तुझे आयुष्यही वाढेल. तुमचा हा जन्म तरी सुखाचा जाईल. सात जन्मांचं कुणी पाहिलं आहे?' 'खरं आहे वटदेवा,' अंकिता मनापासून म्हणाली. 'आणखी,'वटवृक्ष म्हणाला. 'आणखी काय वटदेवा,'अंकितानं विचारलं. ' सध्या मलाच माझ्या जन्माची शाश्वती राहिली नाही. आज वडाची झाडं कुणी लावत नाहीत. वटपौर्णिमा आली की लोकं क्रूरपणे माझ्या फांद्या तोडतात. हे सर्व थाबलं पाहिजे. तू शहाणी आहेस. माझी पूजा करण्यास वनात आलीस. बाजारातून फांदी आणली नाहीस. मला वाचवशील, तर सारी पृथ्वी वाचेल. तरच तुम्हाला सात जन्मांची अपेक्षा ठेवता येईल.' 'खरं आहे, वटदेवा. तू माझे डोळे उघडलेस. निघते मी आता,' अंकिता वटवृक्षास नमस्कार करून म्हणाली आणि घरी आली. वटवृक्षाचा वसा आयुष्यभर मनोभावे पाळला. वटवृक्ष अंकिताला पावला. तिचा संसार सुखाचा झाला. तसा तुमचा आमचा संसार सुखाचा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरांत सुफळ संपूर्ण.
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment