अमावस्या हा दिवस आपण सामान्यतः अशुभ मानत आलो आहो. आज आपण दैनंदिन जीवनात एवढे व्यस्त असतो की अमावस्या वगैरे पाहण्यासाठी आपल्याला वेळ नसतो.
माझे वडील नित्य पंचांग पाहत. ते आज अमावस्या आहे. आज कुठे जाऊ नका, असे सांगत. मी लहानपणी भुतांच्या गोष्टी वाचत असे. पूर्वी सकाळ दैनिकाचे स्वराज्य म्हणून एक साप्ताहिक असे. त्यामध्ये 'भूतसृष्टीचे अनुभव' म्हणून एक सदर असे. त्यातील बऱ्याच अनुभवांची सुरुवात अशी असे-
मला तातडीच्या कामासाठी बाहेर जावयाचे होते. आजी सांगत होती, आज जाऊ नकोस. आज अमावस्या आहे. पण मी काम तातडीचे असल्याने निघालो. मग पुढे जो काही अनुभव आला तो---.
अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही. आता याचे वैज्ञानिक कारण आपल्याला माहीत आहे की या दिवशी चंद्राची अंधारातील बाजू आपणासमोर असते.
परंतु आपल्या पुराणांमध्ये अमावस्येच्या दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही अशा आहेत:-
१. भगवान विष्णूचा बलीवर विजय:
भगवान विष्णूंनी या दिवशी वामन अवतार घेऊन असुरराज बलीला पाताळात पाठवले. हा दिवस दिवाळी म्हणून हिंदूंचा सर्वांत मोठा सण मानला जातो.
२. राजा हरिश्चंद्राने केलेला श्राद्ध विधी:-
मार्कंडेय पुराणातील कथेप्रमाणे अमावस्येच्या दिवशी राजा हरिश्चंद्राने अमावस्येला श्राद्धविधी केला. त्यामुळे हरिश्चंद्र राजाचे पितर संतुष्ट होऊन राजाला मोक्ष मिळाला.
आषाढ महिन्यातील अमावस्या दिव्यांची अमावस्या म्हणून तर भाद्रपद महिन्यातील अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यांच्यापाठी अशाच कथा आहेत
हिंदू ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्राचा संबंध मन आणि भावना यांच्याशी जोडला आहे. यादिवशी मानसिक ऊर्जा कमी पातळीवर असल्याने हा दिवस नवीन कार्यासाठी अशुभ मानला आहे.
परंतु याचीच दुसरी बाजू म्हणून बाह्य जगापासून दूर होऊन आध्यात्मिक प्रगती करण्यास हा दिवस योग्य आहे. म्हणून या दिवशी हिंदू धर्मशास्त्रात बहुत करून श्राद्ध , पितरांचे स्मरण, तीर्थ स्नान, दानधर्म असे विधी सांगितले आहेत.
अमावस्या आणि पौर्णिमेचा संबंध जीवनमृत्यूच्या चक्रासारखा आहे. अमावस्येनंतर नवीन महिना सुरू होतो. त्यामुळे अमावस्या गतजीवनाचा अंत आहे तर नवीन जीवनाची सुरुवात आहे. ज्या गोष्टीस आरंभ आहे तिचा अंत निश्चित आहे आणि ज्या गोष्टीचा अंत झाला आहे, तिला आरंभ निश्चित आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत म्हणतात,
'जातस्य हि ध्रुवो मृत्यु:
ध्रुवो जन्म मृतस्य च' (अ.२, श्लोक.२७)
अमावस्या हा नव्या जीवनाचा आरंभ आहे.
No comments:
Post a Comment