Wednesday, July 23, 2025

श्रीमद्भगवद्गीता -अध्याय ६ -ध्यानयोग

श्रीभगवान म्हणाले

योगी आणि संन्यासी म्हणावे त्यास | जो त्यागून कर्मफळास || करतो कर्तव्य कर्मास | म्हणू नये अग्निहोत्रहीनास आणि निष्क्रियास II अ.६, ओ.१ II

म्हणती ज्यास संन्यास | पांडवा, जाण योग त्यास || सोडल्यावीण संकल्पास | योगी न होई कोणीही || अ.६, ओ.२||

योगारोहणास ज्या मुनीने आरंभ केला | कारण असे कर्म त्याला || मात्र योगारूढाला | शम हे कारण असे || अ।६, ओ.३||

जो होत नाही आसक्त | इंद्रियविषयांत किंवा कर्मांत || संकल्पांतून होतो मुक्त | म्हणती त्यास योगारूढ || अ.६, ओ.४||

आपण करावा उद्धार आपला | करू नये नाश आपला || आपण बंधू आपला | आपणच आपला शत्रू || अ.६, ओ.५||

जो स्वत:स जिंकतो | तो स्वत:चा मित्र होतो || जो स्वत:स न जिंकतो | तो होई शत्रू स्वत:चा || अ.६, ओ.६||

स्वत:स जिंकलेल्या प्रशांत | परमात्म्यास समत्व होई प्राप्त || शीतोष्ण वा सुखदु:खात | वा मानापमानात || अ.६, ओ.७||

तो आत्मा तृप्त ज्ञान-विज्ञानाने | असे निर्विकार, इंद्रियांस जिंकले ज्याने || समान ज्यास मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने | त्यास योगी म्हणतात || अ.६, ओ.८||

सुहृद, मित्र, शत्रूंशी | तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यायोग्य, बंधूंशी || सज्जनांशी आणि पाप्यांशी | समबुद्धी असे त्या विशेष पुरुषाची  || अ.६, ओ.९||

राहून एकांतात | चित्त आणि आत्मा करून नियंत्रित || इच्छा आणि परिग्रहापासून मुक्त | योग्याने स्वत:स सतत योजावे || अ.६, ओ.१०||

स्वच्छ भूमीवर | स्थापन करावे आसन स्थिर || न फार उंचावर, न खाली फार | मृदू वस्त्राचे, कातड्याचे किंवा गवताचे || अ.६, ओ.११||

त्या आसनावर बसून | करून एकाग्र मन || चित्त आणि इंद्रिये नियंत्रित करून | आत्मविशुद्धीसाठी  योग योजावा || अ.६, ओ.१२||

शरीर, मस्तक आणि मान | एका रेषेत स्थिर ठेवून || नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून | न पाहता सभोवती ||अ.६, ओ.१३||

मन शांत व निर्भय ठेवून | ब्रह्मचर्यव्रतात राहून || मनावर संयम ठेवून | चित्त माझ्या ठिकाणी ठेवावे, माझ्यात परायण असावे || अ.६, ओ.१४||

याप्रमाणे स्वत:स योजून सदोदित | मनास करून संयमित || योगी पावतो माझ्यात | निर्वाणकारक परम शांतीस ||अ.६, ओ.१५||

अति खाणाऱ्यास | किंवा अगदीच न खाणाऱ्यास || फार झोपणाऱ्यास किंवा फार जागणाऱ्यास | हा योग जमत नाही अर्जुना || अ.६, ओ.१६||

आहार-विहार ज्याचा नियंत्रित | जो कर्मे करी उचित || निद्रा-जागरण ज्याचे मर्यादेत | त्यालाच दु:खनाशक ठरतो हा योग || अ.६, ओ.१७|||

जेव्हा चित्त नियंत्रित | स्थिर होते आत्म्यात || सर्व इच्छांतून होतो विरक्त | तेव्हा तो योगी म्हणवतो || अ.६, ओ.१८||

निवांत जागी ठेवता दिव्यास | स्थैर्य राहते ज्योतीस || ती उपमा त्या योग्यास | ज्याचे चित्त नियंत्रित || अ.६, ओ.१९||

योगसेवेने नियंत्रित | चित्त होता शांत || आत्म्याने आत्म्यास पाहत | आत्म्यात संतुष्ट राहतो || अ.६, ओ.२०||

जी अनुभवता न ये इंद्रियांस | परी बुद्धी समर्थ जाणावयास || पावता अशा स्थितीस | योगी न ढळतो तत्त्वत: || अ.६, ओ.२१||

जी स्थिती होता प्राप्त | दुसरा लाभ नाही मोठा वाटत || स्थिर होता त्या स्थितीत | विचलित न करी दु:ख कुठले  || अ.६, ओ.२२||

दु:खाच्या उत्पत्तीचा अंत करणाऱ्या  | जाणावे समाधिस्थितीला त्या || निश्चयाने योगास योजावे त्या | न होता विचलित || अ.६, ओ.२३||

इच्छा जन्मती संकल्पांतून | त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करून || मनानेच सर्व बाजूंनी नियमन करून | इंद्रियांच्या गावाचे || अ.६, ओ.२४||

बुद्धीने धैर्ययुक्त | हळूहळू करून नियंत्रित || मन स्थिर करून आत्म्यात | विचार दुसरा करू नये || अ.६, ओ.२५||

अस्थिर आणि चंचल मन | करील जेथे जेथे भ्रमण || तेथून त्याला आवरून | आत्म्यात वश करावे || अ.६, ओ.२६||

मन प्रशांत झालेल्या | रजोगुण निमालेल्या ||ब्रह्मरूप, पापरहित झालेल्या | अशा योग्यास उत्तम सुख लाभते || अ.६, ओ.२७||

योगी पापरहित | सदा स्वत:स योजीत ||ब्रह्मसंस्पर्शाचे अत्यंत | सुख मिळवतो || अ.६, ओ.२८||

योगयुक्त आत्मा तो | सर्वत्र समदृष्टी ठेवतो || सर्व भूतांत स्वत:स पाहतो | आणि स्वत:त सर्व भूतांस ||अ.६, ओ.२९||

जो सर्वत्र मला पाहतो | आणि माझ्यात सर्व पाहतो || त्याच्यासाठी मी न नाश पावतो | न तो पावतो नाश माझ्यासाठी || अ.६, ओ.३०||

सर्व भूतांत मी वास करतो | अशा मला जो एकत्वभावाने भजतो || तो योगी सर्व प्रकारे वर्ततो | माझ्याच ठायी || अ.१६, ओ.३१||

ठेवून समदृष्टीस | इतरांत पाहून स्वत:स || जाणतो त्यांच्या सुखदु:खांस | तो परम योगी मानावा || अ.६, ओ.३२||

अर्जुन म्हणाला

हे मधुसूदना, या योगास | कथन तू केलेस || परंतु वाटे साधारणपणे  त्यास | स्थिरता न येईल चंचलत्वामुळे || अ.६, ओ.३३||

कृष्णा, हे चंचल मन | विचलित करणारे, दृढ, बलवान || त्याचा निग्रह वायूसमान | कठीण मी मानतो || अ.६, ओ.३४||

श्रीभगवान म्हणाले

महाबाहो, निस्संशय हे मन | आहे चंचल आणि निग्रह करण्यास कठीण || परंतु कौंतेया, अभ्यास आणि वैराग्यातून | त्याचा निग्रह शक्य आहे || अ.६, ओ.३५||

ज्याचे मन नाही नियंत्रित | हा योग त्यास दुस्साध्य आहे, असे माझे मत || प्रयत्न आणि इतर उपायांनी योग होईल प्राप्त | मनास वश करणाऱ्यास || अ. ६, ओ.३६||

अर्जुन म्हणाला

योगी जो असूनही श्रद्धायुक्त | होतो योगापासून विचलित || न होता योग प्राप्त | जातो कुठल्या गतीस कृष्णा || अ.६, ओ.३७||

ब्रह्मपथापासून भ्रष्ट होऊन | प्रतिष्ठा घालवून, दोन्ही गमावून || फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश पावून | जातो का महाबाहो ? || अ.६, ओ.३८||

कृष्णा, माझ्या या संशयास | पूर्णपणे दूर करण्यास || तूच समर्थ आहेस || नसे दुसरा कुणीही || अ.६, ओ.३९||

श्रीभगवान म्हणाले

पार्था, या लोकात वा परलोकात | विनाशास तो नाही जात || बाबा रे, कल्याणकारी कार्यात | जातो न कुणी दुर्गतीला || अ.६, ओ.४०||

योगापासून जो भ्रष्ट होतो | तो पुण्यवंतांच्या लोकांत वर्षानुवर्षे राहतो || आणि नंतर जन्म घेतो | शुद्धाचरणी श्रीमंतांच्या घरी || अ.६, ओ.४१||

अथवा बुद्धिमान योग्यांच्याच कुळास | येतो तो जन्मास || असा जन्म मिळावयास | कठीण असे या लोकी || अ.६, ओ.४२||

पूर्वजन्मातील संस्कार | घेऊन येतो बरोबर ||संसिद्धीसाठी कठोर | पुन्हा झटतो कुरुनंदना || अ.६, ओ.४३||

पूर्वीचा अभ्यास | आपोआप आकर्षून घेई त्यास || इच्छुक तो  योग  जाणण्यास | शब्दब्रह्माच्या पैल जातो || अ.६, ओ.४४||

सतत प्रयत्नशील राहून | तो योगी शुद्ध होतो पापांतून || कैक जन्मांतून सिद्धी पावून | जातो परम गतीस || अ.६, ओ.४५||

योगी श्रेष्ठ तपस्व्यांहून | योगी श्रेष्ठ ज्ञानी लोकांहून || योगी श्रेष्ठ कर्म करणाऱ्याहून | म्हणून योगी हो अर्जुना || अ.६, ओ.४६||

सर्व योग्यांत | जो अंतरात्मा स्थिर करून माझ्यात || श्रद्धेने मला भजतो सतत | मला वाटतो तो योगी सर्वश्रेष्ठ || अ.६, ओ. ४७||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘ध्यानयोग’ नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Tuesday, July 22, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ५ संन्यासयोग

अर्जुन म्हणाला

सांगून कर्मांपासून संन्यास | पुन्हा योगाची प्रशंसा करतोस || दोन्हींत   एक कुठले कारक हितास | ते निश्चित सांग कृष्णा || अ.५, ओ.१||

श्रीभगवान म्हणाले

कर्मयोग आणि संन्यास | दोन्ही कारक हितास || तरी कर्मयोगास | विशेष महत्त्व आहे || अ.५, ओ.२||

जो न द्वेष करतो, न इच्छा धरतो | जाणावा नित्य संन्यासी तो || सहज बंधनातून मुक्त होतो | द्वंद्वमुक्त तो महाबाहो || अ.५, ओ.३||

सांख्य आणि योग वेगळे दोन्ही | म्हणती अज्ञानी, न ज्ञानी || एकाचे पालन करूनी | फळे मिळती दोन्हींची || अ.५, ओ.४||

जे स्थान सांख्यांस मिळते | योगांनीही तेथे जाता येते || ज्यास दोन्ही एकच दिसते | त्यालाच खरे दिसते   ||अ.५, ओ.५||

योगावाचून संन्यास | महाबाहो, कठीण मिळवावयास || योगयुक्त मुनीस | ब्रह्म मिळते लवकर || अ.५, ओ.६||

जो योगयुक्त, ज्याने शुद्ध केले आत्म्याला | जिंकले इंद्रियांना आणि आत्म्याला || सर्व भूतांच्या आत्म्यांत पाही स्वतःच्या आत्म्याला | तो कर्मे करूनही लिप्त न होतो || अ.५, ओ.७||

तत्त्व जाणणाऱ्याने मानणे युक्त | की,' मी काही नाही करीत’ || असताना पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत | खात, जात, झोपत, श्वास घेत- || अ. ५, ओ. ८||

-बोलत, त्याग करीत, घेत | पापण्यांची उघडझाप करीत, || इंद्रिये विषयांच्या ठायी वर्ततात | असे जो मानतो, ||अ.५, ओ.९||

आसक्ती सोडून | करतो कर्मे ब्रह्मात अर्पण || तो अलिप्त राहतो पापापासून | जसे कमलपत्र पाण्यात ||अ.५, ओ.१०||

आसक्तीचा त्याग करुनी | काया, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी || आत्मशुद्धीचे ध्येय ठेवुनी | योगी कर्म करतात || अ.५, ओ.११||

योगी कर्मफळ त्यागतो | आणि दृढ शांती पावतो || योगविहीन कर्मफळात आसक्त होतो | आणि बद्ध होतो ||अ.५, ओ.१२||

वश करतो जो इंद्रियांस | तो मनाने सोडून सर्व कर्मांस || नऊ द्वारांच्या देहरूपी नगरात, सुखात करतो वास | कर्मे न करता न करविता ||अ.५, ओ.१३||

लोकांच्या कर्तृत्वाची किंवा कर्माची | तसेच कर्मफळसंयोगाची || स्वभावातून उत्पत्ती होते त्यांची | प्रभू न त्यांस निर्मितो ||अ.५, ओ.१४||

कुणाच्या पाप-पुण्यास | न घ्यावयाचे प्रभूस || अज्ञानाने झाकल्याने ज्ञानास | मोह पावतात जीव || अ.५, ओ.१५||

ज्यांचे ते अज्ञान | आत्मज्ञानाने गेले नाश पावून || 

त्यांचे ते ज्ञान सूर्यासमान | प्रकाशित करते परास ||अ.५, ओ.१६||

त्या ज्ञानात ज्यांची बुद्धी आणि आत्मे स्थिर झाले I जे त्या ज्ञानाशी निष्ठ आणि परायण झाले II त्या ज्ञानाने त्यांचे दोष जाती धुतले I पुनर्जन्मास न जाती ते II अ.१५,ओ.१७II

विद्याविनयसंपन्न ब्राह्मणास | गायीस आणि हत्तीस || कुत्र्यास आणि चांडाळास | समदृष्टीने पाहती पंडित || अ.५, ओ.१८||

ज्यांच्या मनात समभाव स्थिर झाला असे | त्यांनी येथेच जन्म-मृत्यू जिंकला असे || ब्रह्म निर्दोष आणि सम असे | त्यामुळे ब्रह्मात स्थिर ते झाले || अ.५, ओ.१९||

प्रिय वस्तू मिळता होई न आनंदित | अप्रिय घडता होई न दु:खित || ब्रह्मज्ञानी स्थिर ब्रह्मात | विवेकी आणि स्थिर बुद्धीचा || अ.१५, ओ.२०||

तो बाह्यस्पर्शांत न आसक्त | स्वत:मध्ये होते त्याला सुख प्राप्त || तो ब्रह्मयोगाने युक्त | अक्षय सुख मिळवतो || अ.५, ओ.२१||

स्पर्शातून भोग उत्पन्न होती | तेच दु:खास कारण होती || कौंतेया, ते आरंभती तसेच अंतास जाती | जाणता न रमतो त्यांत ||अ.५, ओ.२२||

वेग कामक्रोधातून उत्पन्न | येथेच जो करू शकतो सहन || करण्याआधी शरीरविमोचन | तो योग्य, तो सुखी नर || अ.५, ओ.२३||

जो असे अंतरी सुखात I आनंदात आणि प्रकाशात II तो योगी ब्रह्मभूत | ब्रह्मनिर्वाण मिळवतो || अ.५, ओ.२४||

पाप ज्यांचे क्षीण झाले | द्वंद्वमुक्त होऊन स्वतःस ज्यांनी नियंत्रित केले ||  सर्व भूतांच्या हितात जे रमले | असे हे ऋषी ब्रह्मनिर्वाण पावती ||अ.५, ओ.२५||

काम-क्रोध ज्यांचे सुटले | चित्त ज्यांनी नियंत्रित केले | स्वत:स ज्यांनी जाणले | ब्रह्मनिर्वाण अशा  यतींच्या सन्निध  असते || अ.५, ओ.२६||

बाह्यविषयांस ठेवून बाहेर | भुवयांच्या मध्यभागी दृष्टी करून स्थिर || नाकाच्या अंतर्भागात करणाऱ्या  संचार | प्राण-अपानांची सारखी ठेवून गती || अ.५, ओ.२७||

-मन, बुद्धी आणि इंद्रिये नियंत्रित करून | इच्छा, भय आणि क्रोध सोडून || राहतो जो मुनी मोक्षपरायण | तो मुक्तच सदैव || अ.५, ओ.२८||

भोक्ता सर्व यज्ञांचा आणि तपांचा | महान ईश्वर सर्व जगाचा || सुहृद सर्व भूतांचा | अशा मला जाणून, शांती पावतो ||अ.५, ओ.२९||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘संन्यासयोग’ नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

© Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Monday, July 21, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ४ – कर्मसंन्यासयोग


श्रीभगवान म्हणाले

हा योग सांगितला | पूर्वी मी विवस्वानाला || विवस्वानाने मनूला | इक्ष्वाकूला मनूने || अ. ४, ओ.१||

असा परंपरेने प्राप्त झालेला | राजर्षींनी जाणून घेतला || कालांतराने नष्ट झाला | हा योग परंतपा ||अ.४, ओ.२||

तू माझा भक्त आणि सखा म्हणून | आज तुला केला कथन || हा योग पुरातन | आणि रहस्य उत्तम || अ.४, ओ.३||

अर्जुन म्हणाला

विवस्वानाचा जन्म पूर्वीचा | तुमचा जन्म अलिकडचा || कसा मी विश्वास ठेवायचा | की योग तू पूर्वी सांगितला ||अ.४, ओ.४||

श्रीभगवान म्हणाले

यापूर्वीही आपणास | यावे लागले आहे अनेक जन्मांस || मी जाणतो त्या सर्वांस | तू न जाणसी परंतपा || अ.४, ओ.५||

स्वत:च्या प्रकृतीत राहून | स्वत:च्या मायेने होतो उत्पन्न || मी अव्यय जन्मविहीन | भूतांचा ईश्वर || अ.४, ओ.६||

भारता, ज्या ज्या वेळेस | ग्लानी येते धर्मास ||अधर्म जातो पराकोटीस | तेव्हा मी स्वत: प्रगटतो || अ.४, ओ. ७||

सज्जनांच्या उद्धारास | दुर्जनांच्या विनाशास || धर्माच्या पुनर्स्थापनेस | युगायुगांत मी प्रगट होतो || अ.४, ओ.८||

माझे जन्म आणि कर्म दिव्य | यांचा जो करून घेई परिचय || पुनर्जन्म त्याचा न होय | तो माझ्याकडे येई अर्जुना ||अ.४, ओ. ९||

आसक्ती, भय आणि क्रोध सोडून | माझा आश्रय घेऊन || ज्ञानतपाने पावन होऊन | भावास  माझ्या आले बहुत || अ.४, ओ.१०||

जे जसे शरण येती मला | पावतो मी तसा त्यांजला || मनुष्य अनुसरती माझ्या मार्गाला | सर्व प्रकारे पार्था ||अ।४, ओ.११||

जे कर्मांची सिद्धी इच्छितात | ते देवतांना पूजितात || कारण लवकर होते मनुष्यलोकात | कर्मोत्पन्न सिद्धी ||अ.४, ओ.१२||

मी केले चातुर्वर्ण्य निर्माण | विभागून कर्म आणि गुण || अशा मला तू जाण | अकर्त्यास, अव्ययास || अ.४, ओ.१३||

मी न इच्छितो कर्माची फळे | लेपती मला न कर्मे त्यामुळे || असे माझे रूप ज्याला कळे | त्यालाही कर्मे न बांधती || अ. ४, ओ. १४ ||

पूर्वीसुद्धा असे जाणुनी | कर्मे केली मुमुक्षूंनी || पूर्वी केलेली पूर्वजांनी | कर्मे तू कर || अ.४, ओ.१५||

म्हणावे कर्म कशास, अकर्म कशास | याचा नसे निश्चय कवींस || पार करशील अशुभास | असे कर्म सांगतो तुला || अ.४, ओ. १६||

जाणावे काय कर्म | जाणावे काय विकर्म ||जाणावे काय अकर्म | कर्माची गती गहन ||अ.४ ओ.१७||

जो पाहतो अकर्म कर्मात | आणि कर्म अकर्मात || तो बुद्धिमान मनुष्यांत | जरी मग्न सर्व कर्मांत || अ.४, ओ. १८||

ज्याच्या साऱ्या क्रिया | कामसंकल्पातून मुक्त झाल्या || ज्ञानाग्नीत जळून गेल्या | त्यास म्हणती पंडित || अ. ४, ओ. १९||

कर्मफलाची आसक्ती सोडून | नित्य तृप्त, निराश्रय होऊन || जरी असे तो कर्मात मग्न | करीत नाही काहीच तो || अ. ४, ओ.२०||

इच्छा सोडून, बुद्धी आणि मन नियंत्रित करतो | परिग्रहांपासून मुक्त राहतो || कर्मे केवळ शरीरासाठी करतो | तो पापात न गुंततो || अ.४, ओ.२१||

सहज मिळेल त्यात त्यास समाधान | तो द्वंद्वांपासून मुक्त आणि मत्सरविहीन || सिद्धी आणि असिद्धी त्यास समान | तो कर्मात न बद्ध होतो || अ.४, ओ.२२||

आसक्ती त्याची सुटली | बुद्धी ज्ञानात स्थिर झाली || यज्ञास्तव सारी कर्मे केलेली | पूर्ण विरून जाती || अ. ४, ओ.२३||

ब्रह्माने ब्रह्माग्नीत | ब्रह्म हे हविर्द्रव्य ब्रह्मार्पण करीत || तो जातो ब्रह्माप्रत | ब्रह्मसमाधीने || अ.४, ओ.२४||

काही योगी करून यज्ञास | उपासिती दैवतांस || काही यज्ञ करून यज्ञास | ब्रह्माग्नीत अर्पिती ||अ.४, ओ.२५||

श्रवणादी इंद्रियांची आहुती | काही संयमाग्नीत देती || शब्दादी विषय अर्पिती | इंद्रियाग्नीत काही || अ.४, ओ.२६||

काही जण कर्मांस इंद्रियांच्या | काही जण कर्मांस प्राणाच्या || ज्ञानदीपित योगाग्नीत आत्मसंयमाच्या | करिती अर्पण || अ.४, ओ.२७||

द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ | तसेच योगयज्ञ   || आणि स्वाध्यायज्ञानाचा यज्ञ | करिती दृढ-व्रतस्थ यती || अ.४, ओ.२८||

रोखून प्राण आणि अपानाची गती | प्राण अपानात अर्पिती || अपान प्राणात अर्पिती | प्राणायमपरायण || अ.४, ओ.२९||

काही आहार 🍚 नियंत्रित करती | प्राण प्राणांत अर्पिती || हे सारे जन यज्ञ जाणती | यज्ञाने हरती पापास || अ.४, ओ.३०||

यज्ञातून उरलेल्या अमृतास  | भोगून जाती सनातन ब्रह्मलोकास || हा लोकही मिळे यज्ञ न करणाऱ्यास | दुसरा तरी कसा मिळेल कुरुसत्तमा || अ.४, ओ.३१||

असे हे यज्ञ विभिन्न | विस्तारले ब्रह्म्याच्या मुखातून || उत्पन्न कर्मापासून | जाणून मोक्ष पावशील || अ.४, ओ.३२||

तुलना करिता द्रव्ययज्ञाची | परंतपा, श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची || कारण परिसमाप्ती सर्व कर्मांची | पार्था, ज्ञानात होतसे || अ.४, ओ.३३||

प्रणिपात, परिप्रश्न | आणि सेवा करून || उपदेशती ज्ञान | ज्ञानी आणि तत्त्वदर्शी || अ.४, ओ.३४||

हे ज्ञान करून प्राप्त | पांडवा, पुन्हा न पडशील मोहात || पाहशील स्वत:त आणि माझ्यात |  सर्व भूतांस || अ.४, ओ.३५||

जरी सर्व पाप्यांमधील | सर्वांत अधिक पापी असशील || पापसमुद्र 🌊 तरून जाशील | ज्ञानाच्या नौकेने ⛵|| अ. ४ ओ.३६||

जसा अग्नी 🔥 प्रदीप्त झाल्यावरी | अर्जुना, समिधांस भस्म करी || तशीच कर्मे सारी | ज्ञानाग्नीत भस्म होती ||अ.४, ओ. ३७||

जगात कशाची बरोबरी | नसे ज्ञानाशी खरोखरी || योगसंसिद्ध प्राप्त करी | कालांतराने ते ज्ञान || अ.४, ओ.३८||

जो असे श्रद्धावान | ज्याने केले इंद्रियांचे नियमन | तो मिळवून ज्ञान | पूर्ण शांती प्राप्त करतो || अ. ४, ओ. ३९||

जो अज्ञानी, अश्रद्ध, संशयाने भरलेला | नाश त्याचा असे ठरलेला || मिळे न इहलोक, न परलोक त्याला | संशयात्म्यास मिळे न सुख || अ. ४, ओ. ४०||

योगाने ज्याने कर्मांचा त्याग केला | ज्ञानाने ज्याचा संशय नष्ट झाला || अशा आत्मवंताला | कर्मे न बांधती धनंजया || अ.४, ओ.४१||

हृदयात ❤️ उत्पन्न झालेले अज्ञान | ज्ञानाच्या खड्गाने 🗡️ छेदून || योगाचा अवलंब करून | ऊठ भारता || अ.४, ओ.४२||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मसंन्यासयोग’ नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

Friday, July 18, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय ३ - कर्मयोग

अर्जुन म्हणाला

बुद्धी श्रेष्ठ कर्माहून | जनार्दना, असे सांगून || या घोर कर्मात माझे नियोजन | कशास करिसी केशवा || अ.३, ओ.१||

सांगून वाक्ये मिश्रित | करसी बुद्धीस मोहित || एकच सांग निश्चित | ज्यात हित माझे || अ. ३, ओ. २||

श्रीभगवान म्हणाले

हे अनघा, मोडती या जगात | निष्ठा दोन प्रकारांत || सांख्यांची ज्ञानयोगात | कर्मयोगात योग्यांची || अ. ३, ओ.३||

न केल्याने कर्माच्या आरंभास | पुरुष न पावे नैष्कर्म्यास || किंवा सोडून कर्मास | लाभ न होई सिद्धीचा ||अ. ३, ओ.४||

क्षणभरही कोणीही न | राहू शके कर्मावाचून | सर्व कर्मे घेती करवून | गुण प्रकृतीचे ||अ. ३, ओ.५||

जो संयमित करून कर्मेंद्रियांस | मनाने करी इंद्रियांच्या स्मरणास || अशा विमूढ आत्म्यास | ढोंगी म्हणतात || अ. ३, ओ.६||

जो मनाने इंद्रियांचे नियमन करतो | आणि कर्मेंद्रियांनी कर्मयोग आरंभतो || असक्त असा तो | विशेष असे अर्जुना || अ.३, श्लो.७||

कर्म कर नेमून दिलेले | कर्म न करण्याहून ते चांगले || शरीरव्यापारही आपले | कर्मावाचून न होती ||अ.३, ओ.८||

कर्म करिता यज्ञाव्यतिरिक्त | टाकते कर्मबंधनात | आणि तरी कर्म यज्ञात | अनासक्तपणे कर, कौंतेया ||अ.३, ओ.९||

यज्ञासह करून प्रजेची निर्मिती | म्हणाले प्रजापती, || ‘यज्ञाने करून घ्या इच्छापूर्ती | यज्ञ तुमची कामधेनू || अ.३, ओ.१०||

यज्ञाने प्रसन्न करा देवांस | देव प्रसन्न करोत तुम्हास || प्रसन्न करून एकमेकांस | घ्या साधून कल्याण || अ. ३, ओ.११||

देव यज्ञाने संतुष्ट होतील | तुम्हास इच्छित वस्तू देतील || परंतु त्या देवांस न अर्पिता भोगेल | तो चोर केवळ || अ.३, ओ.१२||

अन्न उरलेले यज्ञातून | सेवन करणारे मुक्त होती पापांतून | स्वत:साठी जे शिजवती अन्न | ते भोगतात पाप ||अ.३, ओ.१३||

भूतांस  🐈 पोसते अन्न 🍚| अन्नाची  उत्पत्ती पर्जन्यातून 🌧️ || पर्जन्य उद्भवतो यज्ञातून | यज्ञ कर्माचा परिपाक || अ.३, ओ.१४||

कर्म ब्रह्मापासून उत्पन्न होते | ब्रह्म अक्षरापासून उद्भवते || म्हणजे ब्रह्म जे सर्व व्यापते | नित्य अधिष्ठित यज्ञात || अ.३, ओ.१५||

असे चक्र 🛞 प्रवर्तित | नाही पुढे चालवीत || तो पापी, इंद्रियासक्त | व्यर्थ त्याचे जीवन || अ.३, ओ.१६||

परंतु जो मनुष्य आत्म्यात रमतो | आत्म्यात तृप्त राहतो || आत्म्यातच संतोष मानतो | त्यास उरते न कार्य काही ||अ.३, ओ.१७||

काही करण्यात वा न करण्यात | लाभ न त्याच्या दृष्टीत || नसे त्याचा सर्व भूतांत | हितसंबंध काही || अ.३, ओ. १८||

म्हणून होऊन अनासक्त | कर्म करीत राहा सतत || अनासक्त कर्म करीत | पुरुष परास पावतो ||अ.३, ओ.१९||

मिळवली जनकादिकांनी | संसिद्धी कर्म करूनी ||लोकसंग्रहही पाहुनी | कर्म करणे उचित || अ.३, ओ.२०||

श्रेष्ठ जसे आचरण करीती | इतर जन तसे वागती || श्रेष्ठ जे प्रमाण ठरवती | अनुकरण करती लोक त्याचे ||अ.३, ओ.२१||

पार्था, लोकात तिन्ही | मला कर्तव्य नाही || मिळवावयाचे, न मिळवावयाचे, नसे काही | तरी कर्म करतो मी || अ.३, ओ. २२||

कारण ठेवून अवधान | जर मी कार्य न करीन ||अनुसरतील मला जन | सर्व परीने || अ.३, ओ.२३||

होईल लोकांचा ऱ्हास | जर मी न केले कर्मास ||कारण होईन संकरास | आणि घातास प्रजेच्या || अ.३, ओ. २४||

होऊन आसक्त | अज्ञानी लोक कर्म करतात ||विद्वानांनी कर्म करावे होऊन अनासक्त |लोकसंग्रहाच्या इच्छेने || अ.३, ओ.२५||

जनांचा अज्ञानी | करू नये बुद्धिभेद विद्वानांनी ||कर्मे स्वतः करूनी | इतरांकडून करवावी || अ.३, ओ.२६||

प्रकृतीचे गुण तीन | कर्मे घेती करवून || कर्मे करण्याचा अभिमान | बाळगतो अहंकारी विमूढात्मा || अ.३, ओ.२७||

हे महाबाहो, जाणून गुण आणि कर्मांची भिन्नता |  गुण गुणांच्या ठायी वर्तता || खरा तत्त्ववेत्ता | आसक्त त्यांत होत नाही || अ.३, ओ.२८||

जे आहेत प्रकृतीच्या गुणांनी मोहित | गुण आणि कर्मांत आसक्त || अशा अज्ञानी, मंदबुद्धींस करू नये विचलित | सर्वज्ञाने || अ.३, श्लो. २९||

सर्व कर्मे मला अर्पून | आध्यात्मात बुद्धी ठेवून ||युद्ध 🏹 कर निरपेक्ष, निर्मम होऊन | वैर न बाळगता || अ.३, ओ.३०||

हे माझे मत | प्रमाण मानून जे  वागतात || ते मानव श्रद्धावान, असूयारहित | होतात मुक्त कर्मातून   || अ.३, ओ. ३१||

परंतु माझे हे मत | जे अविवेकी, मूर्ख नाही अनुसरत || त्यांचा नाश निश्चित | असे जाण || अ.३, ओ.३२||

स्वतःच्या प्रकृतीस अनुसरून | वागतो ज्ञानवान ||सर्व भूतांचेही तसेच वर्तन | तेथे निग्रह काय करील || अ.३, ओ. ३३||

इंद्रिये आणि विषयांत | प्रीति-द्वेषसंबंध निश्चित ||त्यांना वश होणे न उचित | ते मार्गातील विघ्ने जणू  || अ.३, ओ.३४||

गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||बरे स्वधर्मात निधन |   परधर्म भयावह || अ.३, ओः३५ ||

अर्जुन म्हणाला

मग प्रयोजनाने कुठल्या | पाप होई हातून पुरुषाच्या || मनाविरुद्ध त्याच्या | इच्छा नसताना वार्ष्णेया || अ.३, ओ. ३६ ||

श्रीभगवान म्हणाले

काम किंवा क्रोध जाण | जो होतो रजोगुणातून निर्माण || तो महाखादाड, पापाची खाण | येथील वैरी आहे जणू || अ.३, ओ.३७ ||

जसा धूर  झाकतो अग्नीस 🔥 | जशी धूळ माखते आरशास 🪞|| वार वेढते गर्भास | तसा काम झाकतो ज्ञानास || अ.३, ओ.३८||

झाकतो ज्ञानी मनुष्याचे ज्ञान | काम हा नित्य वैऱ्यासमान || अग्नीप्रमाणे त्याला न समाधान | जाण कौंतेया || अ.३, ओ. ३९ ||

इंद्रिये, बुद्धी आणि मन | यांत करून अधिष्ठान ||ज्ञानास झाकून | काम आत्म्यास मोहवितो || अ.३, ओ.४०||

भरतषर्षभा, म्हणून सुरुवातीस | करून इंद्रियनियमनास || सोड पापप्रतीक कामास | ज्ञानविज्ञाननाशकास || अ.३, ओ.४१||

इंद्रिये श्रेष्ठ जाण | मन श्रेष्ठ इंद्रियांहून || बुद्धी श्रेष्ठ मनाहून | बुद्धीहून श्रेष्ठ परमात्मा || अ.३, ओ. ४२||

अशा त्या परमात्म्यास जाणून | स्वत:स स्वत: स्थिर करून || महाबाहो, घे जिंकून | दुष्कर कामरूपी शत्रूला || अ.३, ओ.४३ ||

असा हा श्रीमद्भगवद्गीता या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रामधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ‘कर्मयोग’ नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

साप

जीभ लवलवती 
चट्टे पट्टे अंगावरी 
साप सारे 
नाही विषारी 
पाय नाही बापड्याला 
म्हणून सरपटतो 
अध्यात मध्यात नाही कुणाच्या 
सर्वांना टाळतो 
येत नाही बोलायला 
म्हणून फुत्कार टाकतो 
घाबरतो तुम्हाला 
म्हणून फणा काढतो 
उंदीर घुशी खातो 
धान्य वाचवतो 
नका उगारू लाठ्या-काठ्या | 
मित्र माना त्याला |
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved

Thursday, July 17, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ - सांख्ययोग


संजय म्हणाला

करुणापूर्ण तशा अर्जुनाला | व्याकूळ, अश्रुपूर्ण दिसणाऱ्याला || विषाद करणाऱ्याला | मधुसूदन हे वाक्य बोलले || अ.२, ओ.१|

श्रीभगवान म्हणाले

कोठून हे तर्कट अर्जुना | अशा अवेळी आले तुझ्या मना || जे नेते दूर स्वर्गापासून, न शोभते आर्यांना | आहे अपकीर्तीचे कारण ||अ.२, श्लो.२||

नकोस पडू कमकुवतपणास बळी | तुला न हा शोभतो मुळी || मन:स्थिती क्षुद्र दुबळी | सोडून ऊठ परंतपा || अ.२, श्लो.३||

अर्जुन म्हणाला

कसा मी या युद्धात पण | पूज्य आम्हाला जे भीष्म-द्रोण || त्यांच्यावर उलट सोडू बाण | सांग मधुसूदना ||अ.१, ओ.४||

महान गुरूंस मारणे | यापेक्षा बरे, भीक मागून जगणे || जरी हे गुरू पैशासाठी ओशाळवाणे | हत्येचे भोग असतात रक्तरंजित ||अ. २, ओ. ५ ||

नकळे मला दोन्हींत बरे काय | मिळवावा की न मिळवावा जय || ज्यांना मारून जगण्यात न स्वारस्य | ते धार्तराष्ट्र युद्धास सिद्ध ||अ. २, ओ.६||

गोंधळली वृत्ती, झाले कुंठित मन |   धर्माविषयी मला न ज्ञान || भले काय ते सांग समजावून | शिष्य मी तुझा, सांग मला शरणागताला || अ.१, ओ.७||

कसे दूर करू, मला न कळते | दु:ख जे इंद्रियांचे शोषण करते || जरी निष्कंटक राज्य पृथ्वीचे मिळते | आणि देवांचे आधिपत्य ||अ. २, ओ.८||

संजय म्हणाला

बोलून असे हृषीकेशास | गुडाकेश, जो ताप देई शत्रूंस || 'नाही करणार युद्धास'| असे बोलून शांत झाला ||अ.२, ओ.९||

हृषीकेश बोलला त्यास | भारता, करून जणू हास्यास || विषाद करणाऱ्या अर्जुनास | दोन्ही सैन्यांच्यामध्ये || अ.२, ओ.१०||

श्रीभगवान म्हणाले

ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस | पोकळ पांडित्य सांगतोस |I नसे दु:ख खऱ्या ज्ञानी लोकांस | आल्यागेल्यांचे  ||अ.२, ओ.११||

तुला, मला, या राजांस | वा आपणां सर्वांस ||नव्हता जन्म पूर्वी, न यावयाचे जन्मास | असे काही नाही || अ. २, ओ. १२||

आत्म्यास या देहात जशा लाभती | बालपण, तारुण्य, म्हातारपण या स्थिती |I तशीच होते त्याला नव्या देहाची प्राप्ती | त्यामुळे ज्ञानी मोह न पावतो || अ. १, ओ. १३ ||

कौंतेया, स्पर्शसंवेदना उत्पन्न होती | शीत वा उष्ण, सुख वा दु:ख देती || त्या येती तशा जाती | कर सहन त्यांना || अ.१, ओ.१४||

या संवेदना व्यथा न देती ज्या ज्ञानी पुरुषाला | पुरुषश्रेष्ठा, सांगतो तुला || सुख आणि दु:ख सारखे ज्याला | तो अमृतत्वाला पात्र होतो ||अ.२, ओ. १५||

असत् होई न भाव | सत् होई न अभाव || असा या दोन्हींचा पाहिला ठाव | तत्त्वदर्शी लोकांनी ||अ.२, ओ.१६||

जाण अविनाशी अव्ययास | ज्याने व्यापिले या सर्वास || त्याच्या विनाशास | कोणीही समर्थ नाही || अ. २, ओ.१७||

नित्य, अविनाशी, अप्रमेय आत्म्याने या | धारण केलेल्या काया | अंती जाती विलया | त्याकरिता युद्ध कर || अ. २, ओ.१८||

जो मानतो मारणारा आत्म्यास | किंवा जो मानतो  मेलेला त्यास || कळत नाही त्या दोघांस | हा न मारतो न मारला जातो || अ. २, श्लो. १९||

आत्मा नाही जन्मत, नाही मरत | नाही तो झाला, नाही होत ||  तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित | शरीर नष्ट करिता, नाही मारला जात || अ.२, श्लो. २० ||

ज्या पुरुषास ज्ञात | की आत्मा नित्य, अव्यय, जन्मरहित || तो पुरुष कसा करवील कुणाचा घात | किंवा मारील कुणास? || अ.२, श्लो. २१||

जसा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून | नवी वस्त्रे करतो परिधान || तसा आत्मा जुनी शरीरे सोडून | नव्या शरीरात जातो || अ.२, श्लो. २२||

तुटे न हा शस्त्राने | जळे न हा अग्नीने || भिजे न हा पाण्याने | न सुकवी वारा यास || अ.२, ओ.२३||

न हा तोडला वा जाळला जातो | न भिजवला वा सुकवला जातो || नित्य, स्थिर, सर्वत्र राहतो | अचल हा सनातन || अ. २, ओ. २४||

हा अचिंत्य, अव्यक्त | अविकार्य यास बोलतात || हे झाल्यावर ज्ञात | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.२५||

हा जन्मतो आणि मरतो नियमित | असे जरी असेल तुझे मत |I तरी शोक करणे न उचित | महाबाहो तुला ||अ. २, ओ. २६ ||

मृत्यू हा जन्माचा संपात | तसा जन्म हा मृत्यूचा संपात || याचे भान ठेवीत | योग्य नाही शोक करणे ||अ.२, श्लो. २७||

आरंभी ही भूते अव्यक्त असती | मध्ये व्यक्त दिसती || अखेर अव्यक्तातच विलीन होती | तिथे शोक कशासाठी || अ. २, श्लो. २८||

कुणी आत्म्यास आश्चर्यकारक म्हणून पाहती | कुणी आश्चर्यकारक बोलती || कुणी आश्चर्यकारक म्हणून ऐकती | आणि ऐकूनसुद्धा त्यास, जाणे न कुणीही || अ. २, ओ. २९ ||

भारता, आत्मा राहतो देहात | आत्मा आहे अवध्य, शाश्वत || तेव्हा सर्व भूतांप्रत | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.३०||

आणि पाहताही स्वधर्मास | वाव नसे विचलित होण्यास |I कारण यु्द्धाहून क्षत्रियास | हितकारक काही नसे || अ. २,ओ. ३१||

काही सायासांवाचून | स्वर्गाचे दार ठेविले उघडून |I क्षत्रियांस भाग्यवान | युद्ध असे लाभते || अ.२, ओ.३२||

जाणूनही धर्मास | न करशील या युद्धास || पात्र होशील पापास | स्वधर्म आणि कीर्ती गमावून || अ. २, ओ. ३३ ||

अपकीर्ती तुझी करतील | जन हे सकल ||संभावितास अपकीर्तीचा सल | मरणाहून असह्य || अ. २, ओ.३४||

महारथी म्हणतील, 'अर्जुन | पळाला  रणातून घाबरून ' |I करतील तुझे अवमूल्यन | जे तुला मानतात || अ.२, ओ.३५||

बोलू नये ते बोलतील | पुष्कळ तुझ्याबद्दल || तुझे सामर्थ्य कमी लेखतील | त्याहून काय दु:खदायक || अ.२, ओ.३६||

मारला गेल्यास मिळवशील स्वर्गास | जिंकल्यास भोगशील पृथ्वीस || म्हणून कौंतेया, ऊठ युद्धास  | दृढनिश्चय करूनी || अ.२ ओ. ३७||

समान मानून सुख-दु:खास | लाभ-हानी, जय-पराजयास || करशील जर युद्धास | लागणार नाही पाप तुला || अ.२, ओ.३८||

हे ज्ञान  सांगितले सांख्यातील | ऐक ज्ञान आता योगातील || जे जाणून मुक्त होशील | कर्मबंधातून || अ.२, ओ.३९||

योगात  आरंभिले कार्य नाश न पावते | न आरंभिल्या कार्यात विघ्न  येते || मोठ्या भयापासून रक्षण करते | या धर्माचे अल्प आचरण || अ.२, ओ.४०||

जी  व्यस्त  असे योगात  | एकत्व  राहे त्या बुद्धीत || जी नसे योगात  व्यस्त  | त्या बुद्धीला अनंत शाखा फुटती  || अ.२, ओ.४१||

अज्ञानी लोक भाषा फुलवती | आणि बोलती ||वेदांच्या वादात रंगून म्हणती, | ‘नसे दुसरे काही’ || अ.२, ओ.४२||

‘विविध विशेष क्रियांचे  फळ म्हणून | भोग आणि ऐश्वर्य देणारा  जन्म येतो चालून’, || म्हणती हे जन | इच्छा आणि स्वर्गाच्या पाठी जे असती ||अ.२, ओ.४३||

भोग आणि ऐश्वर्य ध्येय एक | मानून गमावती विवेक || त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक | होते न स्थिर || अ.२, ओ. ४४||

वेद आहेत त्रिगुणांनी युक्त | अर्जुना, तू हो त्रिगुणरहित || नेहमी सत्त्वगुणी, द्वंद्वापासून मुक्त | योगक्षेमापासून दूर, आत्मनिष्ठ || अ. २, ओ.४५||

जळाने 🌊 व्यापता सर्व बाजूंस | कोण विचारी विहीरीस  || तेवढीच किंमत वेदांस | देई ज्ञानी ब्राह्मण || अ.२, ओ. ४६ ||

अधिकार तुझा केवळ कर्मावर | नाही कधीही कर्मफलावर || कर्मफलहेतूस ठेव दूर | कर्म मात्र टाळू नको || अ.२, ओ.४७||

कर कर्मे योगात राहुनी | धनंजया, आसक्ती सोडुनी || सिद्धी-असिद्धी समान मानुनी | या समानतेस योग म्हणती || अ.२, श्लो. ४८||

कर्म फार न्यून | धनंजया, बुद्धियोगाहून || फळाचा 🍑 हेतू असणारे जन असती कृपण I म्हणून तू बुद्धीचा आधार घे || अ.२, ओ.४९||

बुद्धियुक्त त्यागतो उभय | पाप आणि पुण्य || तेव्हा योगाचा घे आश्रय | कर्मातील कौशल्य म्हणजेच योग || अ. २, ओ. ५०||

कर्मातून झालेले उत्पन्न | फळ, बुद्धियुक्त जन टाकून || मुक्त होती जन्मबंधनातून | जाती निरामय पदाला || अ. २, ओ. ५१||

जेव्हा मोहाचे जंगल 🌴 🌴🌴| बुद्धी पार करील || तुला  निरुपयोगी वाटेल | ऐकलेले आणि ऐकावे असे || अ. २, ओ.५२||

श्रुतींमुळे झालेली चंचल | होईल जेव्हा निश्चल ||बुद्धी समाधीत अचल | तेव्हा साधशील योग || अ.२, ओ.५३||

अर्जुन म्हणाला

‘स्थितप्रज्ञ, जो समाधीत स्थिर झाला | केशवा सांग मला | बोलेल काय शब्दांला | असेल कसा, वागेल कसा’ || अ.२, ओ.५४||

श्रीभगवान म्हणाले

‘हे पार्था, स्थितप्रज्ञ म्हणती त्यास | जो सोडून सर्व इच्छांस || मानतो संतोषास | स्वत:च्याच ठायी || अ.२, ओ.५५||

जो न उद्विग्न दु:खात | ज्याची इच्छा न सुखात || जो प्रेम, राग, भीतीपासून मुक्त | स्थितप्रज्ञ म्हणती त्यास ||अ.२, ओ.५६||

सर्वत्र जो अनासक्त | शुभ आणि अशुभापासून अलिप्त || हर्ष आणि द्वेषापासून मुक्त | स्थिर त्याची बुद्धी || अ.२, श्लो.५७||

जो घेतो आवरूनी | इंद्रिये इंद्रियविषयांपासुनी | कासव 🐢 जसे अवयव सर्व बाजूंनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ.२, ओ.५८||

जीवात्म्याची निराहारातुनी | निवृत्ती होई विषयांतुनी, न त्यांच्या आसक्तीतुनी || निवृत्ती आसक्तीतुनी | होई पराच्या दर्शनाने ||अ.२, ओ.५९||

पुरुषाने ज्ञानी | प्रयत्नही करूनी || मन दुसरीकडे नेती ओढुनी | त्रासदायक इंद्रिये || अ. २, ओ.६०||

तेव्हा इंद्रियांस करून संयमित | युक्त हो माझ्यात || इंद्रिये ज्याची ताब्यात | स्थिर त्याची बुद्धी || अ. २, ओ. ६१||

विषयांचे जो करी चिंतन I विषयासक्त होई त्याचे मन II काम जन्मतो विषयांतून I कामातून जन्म क्रोधाचा || अ. २, ओ. ६२||

जन्म क्रोधातून संमोहाचा I संमोहातून स्मृतिनाशाचा II स्मृतिनाशातून बुद्धिनाशाचा I बुद्धिनाशातून होई सर्वनाश || अ. २, ओ. ६३||

जो मुक्त आसक्ती आणि द्वेषापासून | इंद्रियांना ठेवून स्वाधीन || वावरतो विषयांतून || तो विधेयात्मा प्रसन्नता पावतो || अ.२, ओ.६४||

पावता प्रसन्नतेस | दु:खे जाती लयास || स्थिरता येई बुद्धीस | लगेच || अ.२, ओ.६५||

बुद्धीचा लाभ न अयुक्तास | न जाणी तो भावनेस || भावनेअभावी न शांती त्यास | नसता शांती नसे सुख त्यास || अ।२, ओ.६६||

भटकता इंद्रियांनी | त्यांच्या पाठी जाऊनी || मन बुद्धीस नेते ओढुनी | जसा वारा 🌬️ ओढतो पाण्यातील 🌊 नावेस 🚢||अ.२, श्लो. ६७||

महाबाहो म्हणूनी | इंद्रियांस विषयांपासूनी || घेतो जो आवरूनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ. २, श्लो.६८||

सर्व भूतांसाठी रात्र 🌃 होता | संयमी राखतो जागृतता || सर्व भूते जागी राहता | मुनी पाही रात्र  ती || अ.२, ओ६९||

सर्व बाजूंनी भरताही जल | समुद्र 🌊 जसा राहतो आपल्या मर्यादेत अचल || तसा जो राहतो स्थिर, इच्छांत सकल | तो पावतो शांती, न भोगेच्छू || अ.२, ओ.७०||

जो सर्व इच्छांचा त्याग करतो | आणि नि:स्पृहपणे राहतो || निर्मम निरहंकारी पुरुष तो | पावतो शांती || अ.२, ओ.७१||

पार्था, हीच ती ब्राह्मी स्थिती | प्राप्त होता न मोह पावती || अंतकाळीही स्थिर राहती | पावती ब्रह्मनिर्वाणास || अ.२, ओ.७२||

अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'सांख्ययोग' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 © Dr Hemant Junnarkar 

All rights reserved

Wednesday, July 16, 2025

श्रीमद्भगवदगीता-अध्याय १- अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र म्हणाला 

कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र I तेथे युद्धासाठी जमलेले एकत्र II पांडव आणि माझे पुत्र I करतात काय, सांग संजया II अ.१ ओ.१ II

संजय म्हणाला

पांडवांचे विशाल सैन्य पाहून I राजा दुर्योधन II आचार्यांजवळ  जाऊन I असे म्हणाला, II अ.१ ओ.२ II

‘पांडुपुत्रांचे हे मोठे सैन्य I बघून घ्या आचार्य II  द्रुपदपुत्र, तुमचा बुद्धिमान शिष्य, I त्याने रचलेले   II अ.१ ओ.३ II 

युद्धात येथे महाधनुर्धर I भीम आणि अर्जुन शूर II तसेच महारथी थोर I युयुधान, विराट, द्रुपद II अ.१ ओ. ४II

धृष्टकेतु आणि चेकितान I काशिराज वीर्यवान II पुरुजित्, कुंतिभोज वीर महान I तसाच शैब्य नरश्रेष्ठ II अ.१ ओ. ५II

युधामन्यू आणि विक्रांत | उत्तमौजा वीर्यवंत ||सौभद्र आणि द्रौपदीचे सुत | सारेच महारथी ||अ.१ ओ.६ ||

आता जे विशेष आमचे | नायक माझ्या सैन्याचे || ज्ञान करून देतो त्यांचे | तुम्हास हे द्विजोत्तम || अ. १ ओ.७ ||

भीष्म आणि स्वत: आपण | नेहमी जिंकणारे कृप आणि कर्ण || अश्वत्थामा, विकर्ण | तसाच सौमदत्ती || अ. १, ओ. ८ ||

आणखी आहेत पुष्कळ शूर | माझ्यासाठी जिवावर उदार || जाणती विविध शस्त्रांचा वापर | सारे निपुण युद्धात || अ. १, ओ. ९ ||

असे अमर्याद सैन्य आमचे | भीष्म करती रक्षण ज्याचे || मर्यादित परी हे सैन्य त्यांचे | रक्षिलेले भीमाने || अ.१, ओ.१०||

सर्व व्यूहद्वारस्थानी | नेमून दिलेल्या ठिकाणी राहूनी || करावे आपण सर्वांनी | भीष्मांचेच रक्षण’ || अ.१, ओ. ११||

मग कुरुवृद्ध प्रतापवान पितामहांनी | सिंहगर्जना करूनी || शंख फुंकूनी | आनंदित केले दुर्योधना || अ.१, ओ.१२ ||

तेव्हा शंख आणि भेरी | पणव, आनक, गोमुख अशी वाद्ये सारी || नाद करती भारी | एकदम वाजू लागता || अ.१ ओ.१३ ||

तेव्हा युक्त शुभ्र घोड्यांनी | रथात मोठ्या बैसुनी || करीती दिव्य शंखांचा ध्वनी | माधव आणि पांडव  || अ.१, ओ.१४||

पांचजन्य हृषीकेशाने | देवदत्त धनंजयाने || पौंड्र भीमकर्मा वृकोदराने | शंख असे वाजविले || अ. १, ओ. १५II

अनंतविजय, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने | सुघोष नकुलाने || मणिपुष्पक सहदेवाने | शंख असे वाजविले || अ. १, ओ.१६II

काशिराज धनुर्धर-शिरोमणी | शिखंडी महारथी अग्रणी ||  ध्रुष्टद्युम्न आणि विराट नृमणी | अपराजित सात्यकी || अ.१, ओ. १७||

द्रुपदराजा आणि पुत्र द्रौपदीचे | सौभद्र, बाहू मोठे ज्याचे || सर्वांनी विविध शंखांचे | नाद केले महाराज || अ.१, ओ. १८||

तो घोष पडता कानी | धार्तराष्ट्रांची हृदये गेली विदीर्ण होऊनी || त्या नादाने गेले दुमदुमुनी| पृथ्वी आणि आकाश ||अ. १, ओ. १९||

धार्तराष्ट्रांस सिद्ध पाहून | रथावरी ज्याच्या शोभे हनुमान || तो पांडव धनुष्य उचलून | शस्त्रप्रहार करण्याआधी || अ. १, ओ.२०||

वाक्य असे हृषीकेशाला | हे राजा बोलला || 

अर्जुन म्हणाला

'हे अच्युता, आण रथ आपला || दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी || अ.१, ओ.२१II

मला आहे निरीक्षण करायचे | युद्धासाठी इच्छुकांचे || कुणाविरुद्ध मला लढायचे | या रणसंग्रामात || अ.१ ओ. २२||

मला आहे अवलोकन करायचे | युद्धास एकत्र आलेल्यांचे || धार्तराष्ट्राच्या दुर्बुद्धीचे I प्रिय इच्छिणाऱ्यांचे || अ. १, ओ. २३ ||

असे सांगता त्या क्षणास | गुडाकेशाने हृषीकेशास || हृषीकेशाने आणून त्या उत्तम रथास || हे भारता, दोन्ही सैन्यांमध्ये- || अ. १ ओ २४ ||

-सर्व राजांच्या, | समोर भीष्मद्रोणांच्या ||  

श्रीभगवान म्हणाले

'समोर जमलेल्या या | कुरूंना पहा पार्था’ || अ. १, ओ. २५ ||

तेथे पार्थाने पाहिले | काका आणि आजोबा आपले || आचार्य, मामा, भाऊ उभे ठाकले | मुलां-नातवंडां-मित्रांसह || अ. १ ओ. २६ ||

सुहृद आणि श्वशुर | दोन्ही सैन्यांत समोर || बंधू सारे युद्धास तयार | पाहून तो कौंतेय || अ. १, ओ. २७II

होऊन फार करुणा-ग्रस्त | बोलला होऊन दु:खित || 

अर्जुन म्हणाला, 

‘पाहून हे उपस्थित | युद्धासाठी स्वजन || अ.१, ओ. २८||

अवयव जातात गळून | तोंडास कोरड पडून || कापरे भरून | काटा येतो अंगावर || अ. १, ओ. २९||

गांडीव धनुष्य हातातून गळते | त्वचा सारी जळते || उभे न मला राहवते | भटकते माझे मन ||अ. १, ओ. ३० ||

लक्षणे सारी निश्चित | केशवा, विपरीत दिसतात || न दिसे काही हित | स्वजनांस युद्धात मारूनीया || अ.१, श्लो. ३१||

नको मला विजय | नकोत सुखे, नको राज्य || गोविंदा, कामाचे ते काय | राज्य किंवा जीवन || अ.१, ओ.३२||

ज्यांच्यासाठी इच्छा करायची | राज्य, भोग आणि सुखांची || त्यांची तयारी युद्धाची | प्राण आणि धन सोडून || अ.१, ओ.३३||

आचार्य, पुत्र, पितर | पितामह बरोबर || मामा, नातवंडे, श्वशुर | मेहुणे आणि इतर नातलग || अ. १, ओ. ३४ ||

मी न इच्छितो यांस मारण्याला | मधुसूदना, जरी गेलो मारला || किंवा दिले जरी त्रैलोक्याचे राज्य मला | काय कथा पृथ्वीची || अ.१, ओ. ३५ ||

मारून धार्तराष्ट्रांस | जनार्दना, सुख काय आम्हास || पापच येईल आश्रयास | या आततायांस मारिता || अ.१, ओ.३६ ||

न योग्य मारणे आम्ही त्यांना | स्वबांधवांना - धार्तराष्ट्रांना || कसे मारून स्वजनांना | व्हावे सुखी माधवा || अ. १, ओ. ३७ ||

लोभामुळे झाला यांचा | नाश बुद्धीचा || दिसे न दोष कुळक्षयाचा | आणि पाप मित्रद्रोहाचे || अ.१, ओ.३८||

मला न येई उमगून | कसे निवृत्त व्हावे या पापातून || स्पष्ट दिसत असून | कुलक्षयाचा दोष जनार्दना || अ.१, ओ. ३९||

नाश होता कुळाचा | -हास होतो सनातन कुळधर्माचा || बसे पगडा अधर्माचा | कुळावरी साऱ्या || अ.१, ओ. ४०||

कृष्णा, अधर्म माजता | कुलस्त्रिया जाती अध:पाता || वार्ष्णेया, स्त्रिया दूषित होता | वर्णसंकर होतसे ||अ.१, ओ.४१||

कुलनाशकांच्या कुळात संकर घडतो | तो नरकास कारण होतो ||पितरांचेही पतन घडवतो I पिंडोदकक्रियांचा लोप होता ||अ.१, ओ.४२||

वर्णसंकरकारक या | दोषांनी कुलनाशकांच्या  || जाती लया | शाश्वत जातिधर्म, कुलधर्म || अ.१, ओ. ४३||

कुलधर्म लयास गेलेल्या | जनार्दना, अशा मनुष्यां || नरकात लागे राहावया | असे आम्ही ऐकतो || अ.१, ओ. ४४ ||

अरेरे, केवढ्या पापास | तयार झालो करावयास || मिळवण्या राज्यसुखास | उठलो स्वजन मारण्या || अ.१, ओ.४५||

मी न करताही प्रतीकार | हाती न धरताही हत्यार  || धार्तराष्ट्र करतील माझा संहार | परवडेल ते मला’ ||अ.१, ओ. ४६||

अर्जुन असे रणात बोलून | गेला रथात बसून || धनुष्यबाण टाकून | शोकाकुल मनाने ||अ.१, ओ.४७||

अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'अर्जुनविषादयोग' नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.

🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 

©Dr Hemant Junnarkar

All rights reserved

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...