IIश्रीसाईसच्चरित II
अध्याय २८
दृष्टांतकथनं
या अध्यायात काय आहे
अध्यायारंभ (१- १०)
लाला लक्ष्मीचंद या मुंबईच्या गृहस्थांस स्वप्नामध्ये एका वृद्ध व्यक्तीचे दर्शन होते. पुढे लाला लक्ष्मीचंद दासगणूंच्या कीर्तनास जातात व तेथे साईबाबांची प्रतिमा पाहतात. ही प्रतिमा स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीशी मिळती जुळती असते. यावरून लक्ष्मीचंदांस कळते की ते स्वप्नातील गृहस्थ साईबाबा होते. (११-९८)
बऱ्हाणपूरच्या एका बाईस बाबा स्वप्नात खिचडी मागतात आणि ती बाबांना खिचडीचा नैवेद्य दाखवण्यासाठी शिरडीत येते. बाबा सर्व पदार्थांतून त्या बाईंनी आणलेली खिचडी निवडतात (९९-११५)
शिवभक्त मेघाच्या कथा आणि अध्यायाचा समारोप (११६-२१७)
१. मेघा बाबांस मुसलमान समजत असतो. त्यामुळे मेघा मशिदीत येताच बाबा त्याला दगड मारून जाण्यास सांगतात. (११७-१५०)
२. खंडोबाच्या मंदिराचे दार बंद असल्याने मेघा खंडोबाची पूजा न करताच परत येतो. बाबा त्याला दार उघडे असल्याचे सांगतात. (१५१-१६३)
३. मेघा बाबांस गंगास्नान घालतो. बाबांचे फक्त डोके ओले होते, बाकी शरीर कोरडे राहते. (१६४- १८६)
४. बाबा स्वप्नात येऊन मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगतात. नंतर एका रामदास भक्तांकडून आलेलं शिवलिंग मेघास देतात (१८७-२१४)
लाला लक्ष्मीचंद या मुंबईच्या
गृहस्थांस स्वप्नामध्ये एका वृद्ध व्यक्तीचे दर्शन होते. पुढे लाला लक्ष्मीचंद दासगणूंच्या कीर्तनास जातात व तेथे साईबाबांची प्रतिमा पाहतात. ही प्रतिमा स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीशी मिळती जुळती असते. यावरून लक्ष्मीचंदांस कळते की ते स्वप्नातील गृहस्थ साईबाबा होते.
१
मेघा बाबांस मुसलमान समजत असतो. त्यामुळे मेघा मशिदीत
येताच बाबा त्याला दगड मारून जाण्यास सांगतात:- मेघा हा गुजराती ब्राह्मण रावसाहेब साठयांच्या पदरी होता. मेघा शिवभक्त होता. साठे साईभक्त होते
आणि त्यांना साईबाबांना गंगास्नान घालावयाचे होते. तसे त्यांनी मेघास सांगिंतले. मेघाच्या माहितीप्रमाणे
साईबाबा मुसलमान होते आणि तो मुसलमान व्यक्तीची सेवा करू इच्छित नव्हता. परंतु आपली नोकरी
सांभाळावयाची असल्याने तो काही बोलला नाही आणि तो शिरडीस आला. परंतु तो मशिदीची
पायरी चढू लागताच बाबांनी उग्र अवतार धारण केला आणि त्याला दगड मारू लागले. ते बोलत होते,' मी मुसलमान आहे नाही
का? तू उच्च जातीचा ब्राह्मण
आहेस. तुला माझा विटाळ
होईल. तेव्हा तू येथून
निघून जा.' आपल्या मनातील विचार
बाबांना कळलेले पाहून मेघा थक्क झाला. तरी त्याचा विश्वास बसत नव्हता. पुढे तो घरी गेल्यानंतर
अंथरुणाला खिळला आणि या आजारपणातच त्याला बाबांचा ध्यास लागला. पुढे तो शिरडीतच
राहून जमेल तशी बाबांची सेवा करीत राहिला. (११७-१५०)
२
खंडोबाच्या मंदिराचे दार बंद असल्याने मेघा खंडोबाची पूजा
न करताच परत येतो. बाबा त्याला दार उघडे असल्याचे सांगतात:- मेघा शिवभक्त होता. आता तो बाबांचाही
भक्त झाला आणि बाबांनाच शिवाचे रूप मानू लागला. तो मुखाने ‘साईशंकर’ असा घोष करू लागला. शिवास बेलपत्र प्रिय. परंतु शिरडीत बेलाचे
झाड नव्हते. त्यामुळे तो कोस दीड कोस दूर जाऊन बेलाची पाने घेऊन येत असे आणि सर्व देवतांचे यथासांग पूजन करून बाबांच्या वंदनास
येत असे. एकदा मेघा याचप्रमाणे
सर्व देवांची पूजा करीत असता खंडोबाच्या देवळाचे दार बंद असल्याने तो खंडोबाची पूजा
न करता तसाच बाबांकडे आला. तेव्हा बाबा त्यास म्हणाले. 'अरे, एका देवाची पूजा राहिली.' मेघाने खंडोबाची
पूजा राहिल्याचे सांगताच बाबा म्हणाले,' जा आता, दार उघडे आहे,' मेघा पुन्हा गेला
असता खरोखरच दार उघडे होते. मेघा मग खंडोबाची पूजा करून बाबांकडे आला. (१५१-१६३)
३
मेघा बाबांस गंगास्नान घालतो. बाबांचे फक्त डोके
ओले होते, बाकी शरीर कोरडे
राहते:- एकदा मकर संक्रान्तीच्या
दिवशी मेघाला शिवास गंगास्नान घालण्याची इच्छा झाली. त्याच्या दृष्टीने
बाबा शिवस्वरूप असल्याने त्याने आपली इच्छा बाबांस सांगितली. बाबांनी त्यास मान्यता दिली. मेघाने जाऊन-येऊन आठ कोस पायपीट करून गोदावरीचे
पाणी गंगाजल म्हणून घागरीतून आणले. बाबांना पाटावर बसविले. बाबांनी डोके पुढे
करून फक्त डोक्यावरच थोडे पाणी ओतण्यास सांगितले. मेघाने ते न ऐकता सर्व अंगावर
पाण्याची घागर पालथी केली. परंतु पाहतो तो बाबांचे फक्त डोकेच ओले झाले होते. बाकी अंग कोरडे होते. (१६४- १८६)
४
बाबा स्वप्नात येऊन मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगतात. नंतर एका रामदास
भक्तांकडून आलेलं शिवलिंग मेघास देतात:- मेघा बाबांची दोन
स्वरूपात पूजा करीत असे. एक- बाबांची प्रतिमा. ही प्रतिमा त्याला नानासाहेब
चांदोरकरांनी दिली होती. दोन - प्रत्यक्ष बाबा. बाबांची अशा प्रकारे उपासना करता
करता बारा महिने लोटले. एक दिवशी पहाटेच्या वेळेला मेघाला दृष्टांत झाला. त्याच्या समोर बाबा
उभे होते. बाबांनी त्याच्या
बिछान्यावर अक्षता टाकल्या आणि मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगितले. बिछान्यावर अक्षता पडलेल्या दिसत होत्या. वाड्याची सर्व कवाडे
बंद असताना बाबा आत कसे येतील, असे वाटून मेघाला दृष्टांताबद्दल शंका आली. शंकेचे समाधान करून
घेण्यासाठी तो ताबडतोब मशिदीत गेला आणि बाबांचे दर्शन घेऊन या दृष्टांताच्या सत्यतेविषयी
प्रश्न केला. त्यावर बाबा म्हणाले,' माझिया प्रवेशा नलगे
दार I नाही मज आकार ना
विस्तार II वसे निरंतर सर्वत्र II १९९II टाकूनीया मजवरी भार I मीनला जो मज साचार II तयाचे सर्व शरीर
व्यापार I मी सूत्रधार चालवी II २०० II' मेघा या उत्तराने
समाधान पावून वाड्यात परतला आणि बाबांची छबी जिथे दिसली होती तेथे त्याने तांबड्या
रंगात त्रिशूळाची आकृती काढली. दुसऱ्या दिवशी मशिदीत समर्थ रामदासांचा एक भक्त आला आणि त्याने बाबांना शिवलिंग
अर्पण केले. त्याच वेळी मेघाही
तेथे आला. मेघाला पाहून बाबा
म्हणाले,' हा शंकर आला I सांभाळी याजला तू
आता' II २०४II मेघा सद्गदित होऊन
शिवलिंग घेऊन निघाला. त्याच वेळी काकासाहेब
दीक्षित वाड्यात स्नान करून बाबांचे नामस्मरण करीत होते. त्या वेळी ध्यानात त्यांना शिवलिंग
दिसले. त्याच वेळी मेघा
त्यांच्याकडे आला आणि त्याने बाबांनी दिलेले शिवलिंग दाखविले. दीक्षितांना आश्चर्य
वाटले. कारण त्यांना ध्यानात
दिसलेले शिवलिंग या शिवलिंगासारखेच होते. मेघाने पुढे त्रिशूळाच्या आकृतीशेजारीच बाबांच्या हातून
शिवलिंगाची स्थापना केली. श्री. दाभोळकर म्हणतात,' मेघास आवडे शंकरपूजन I करून शंकर लिंगप्रदान II केले तद्भक्तीचे
दृढीकरण I नवल विंदान साईंचे II २१४ II (अ. २८- ओवी १८७-२१४)