Thursday, March 12, 2026

श्रीसाईसच्चरित -अध्याय २१ आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २१         

अनुग्रहकरणं

(ओवीसंख्या १३०)

या अध्यायात काय आहे

एक प्रांताधिकारी सुलक्षण I दुसरे पाटणकर विचक्षण II तिसरे एक वकील विलक्षण I अनुग्रहण तिघांचे एकविंशती’ II ७० II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ - ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (-१७)

*      मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य- हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (१८-७२)

*      सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (७३-१०४)

*      'साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (१०५-१३०)

संतसंगमासाठी ईश्वरी कृपा आवश्यक   

 (अध्यायारंभ- ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (1-17)

वांद्रे गावी इनूस नावाचा मुजावर असताही श्री. दाभोळकर त्याच्या दर्शनाला गेले नाहीत, हा लेखकाचा स्वतःचा अनुभव

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम: ॥

गताध्यायांतीं कथानुसंधान । ठाकूरादिकां महापुरुषदर्शन । कैसें झालें तें करावें श्रवण । एकाग्र मन करोनि ॥१॥

काया तया वक्त्याच्या बोलें । श्रवणीं जें पडतां श्रोता न डोले । अंगींचा रोमांचही न हाले । व्यर्थ गेले ते बोल ॥२॥

जया श्रवणीं न श्रोते रिझले । बाष्पगद्नद कंठ न दाटले । नयनीं प्रेमानंदाश्रु न वाहिले । व्यर्थ गेलें तें कथन ॥३॥

वाणी बाबांची मनोहारिणी । उपदेशाची अलौकिक सरणी । जयांची प्रतिपदीं अभिनव करणी । मस्तक चरणीं तयांचे ॥४॥

येता दैव उदयासी I

गांठी न पडे  साधुसंतांशी II

तो जवळ असता उशापाशी I

पापराशीस दिसेना IIII 

या प्रमेयाच्या सिद्धतेसी । नलगे जावें देशीं विदेशीं । मीच माझिया अनुभवासी । श्रोतियांसी कथितों कीं ॥६॥

पीर मौलाना नामें प्रसिद्ध । होते वांद्रें शहरीं सिद्ध । हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध । घेती शुद्ध दर्शन तें ॥७॥

मी ते शहरचा न्यायाधीश । मुजावर (= मुस्लिम साधू, दर्ग्यामध्ये देखभाल करणारा) तयांचा नाम इनूस । पाठ पुरविली रात्रंदिवस । यावया दर्शनास तयानें ॥८॥

हजारों लोक तेथें यावे । किमर्थ आपण तेथें जावें । भीडेभाडेच्या भरीं भरावें । आंचवावें निज लौकिका ॥९॥

ऐसें कांहीं मनीं भावावें । दर्शनास कधींही न जावें । आपणचि आपल्या छायेस भ्यावें । दुर्दैव यावें आडवें ॥१०॥

ऐसीं कित्येक वर्षें गेलीं । तेथूनि पुढें बदली झाली । पुढें जेव्हां ती वेळ आली । शिरडी जोडिली अखंड ॥११॥

तात्पर्य हा संतसमागम । अभाग्यास ना तेथें रिगम । होतां ईश्वरी कृपा हा सुगम । अन्यथा दुर्गम हा योग ॥१२॥

येविषयींची गोड कथा । श्रोतां सादर परिसिजे आतां । या संतांच्या अनादि संस्था । गुह्य व्यवस्था कैशा त्या ॥१३॥

यथाकाल - वर्तमान । जया जें जें आवडे स्थान । अवतार घेती कार्याकारण । परी ते अभिन्न परस्पर ॥१४॥

देश - काल - वस्तु भिन्न । परी एकाची जी ऊणखूण । दुजा संत जाणे संपूर्ण । अंतरीं एकपण सकळिकां ॥१५॥

जैसीं सार्वभौम राजाचीं ठाणीं । वसविलीं असती ठिकठिकाणीं । तेथ तेथ अधिकारी नेमुनी । अबादानी संपादिती ॥१६॥

तैसाच हा स्वानंदसम्राट । जागोजागीं होऊनि प्रकट । चालवी हा निजराज्यशकट । सूत्रे अप्रकट हालवी ॥१७॥

कानडी सत्पुरुषांचे मार्गदर्शन

(मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य - हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (18-72)

वाचिलें ते नाही संपले I पाहिजे ते कृतीत उतरले II

या उपड्या घड्यावर तोय ओतले I तैसे जाहले ते सकळ II ७२ II

एकदा एक बीए झालेले गृहस्थ मामलेदारी मिळाल्यानंतर बेळगावातील वडगाव येथे एका कानडी सत्पुरुषांस भेटतात. त्यांच्याकडे निश्चळदासकृतविचारसागरनावाचा ग्रंथ असतो. ते सत्पुरुष सांगतात की या ग्रंथामुळे तुमचे मनोरथ पूर्ण होईल. पुढे तुम्हाला एक महापुरुष भेटतील. हे गृहस्थ पुढे शिर्डीस जातात आणि बाबा त्यांना म्हणतात, ‘ कानडी अप्पाने सांगितले तेवढे येथे सोपे नाही. येथे अनिवार्य अंग झिजवावे लागते.त्या गृहस्थांस खूण पटते की ते महापुरुष म्हणजे बाबाच.

एकदां एक आंग्लविद्याविभूषित । बी. ए. या उपपदानें युक्त । जे हळू हळू मागे क्रमत । झाले नामांकित अधिकारी ॥१८॥

मिळाली पुढें मामलत । वाढतां वाढतां झाले प्रांत । तयांसी साईबाबांचा सांगात । सुदैवें प्राप्त जाहला ॥१९॥

 मामलेदाराच्या नोकरीची वाईट परिस्थिती:

दिसाया ही मामलत बरी । डोंगरी जैसी दुरुनि साजरी । निकट जातां वेढिली काजरीं । मानें परी ती मोठीच ॥२०॥

गेले ते पूर्वील गोड दिवस । जैं होती या अधिकाराची हौस । प्रजाही मानी अधिकारियास । परस्परांस आनंद ॥२१॥

पुसूं नये आतांचे हाल । सुखाची नोकरी गेला तो काळ । आतां जबाबदारीचा सुकाळ । ओला दुकाळ पैशाचा ॥२२॥

पूर्वील मामलतीचा मान । तैसेंच पूर्वील प्रांतासमान । वैभव आतां ये ना दिसून । नोकरी कसून करतांही ॥२३॥

असो तेंही अधिकारसंपादन । अलोट पैका वेंचल्यावांचून । न करितां सतत अभ्यासशीण । इतर कोण करूं शके ॥२४॥

आधीं होऊं लागे बी. ए. । मग तो नगदी कारकून होये । महिना पगार तीस रुपये । मार्गें ऐसिये ती गति ॥२५॥

यथाकाळ घांटावर जावें । जमीनपाणी काम शिकावें । मोजणीदारांमध्यें रहावें । पास व्हावें परीक्षे ॥२६॥

पुढें जेव्हां एकादी असामी । स्वयें जाईल वैकुंठधामीं । करील आपुली जागा रिकामी । पडेल कामीं ती याच्या ॥२७॥

आतां असो हें चर्‍हाट । कशास पाहिजे नुसती वटवट । ऐशा एकास साईंची भेट । झाली ती गोष्ट परिसावी ॥२८॥

***

बेळगांवानिकट देख । ग्राम आहे वडगांव नामक । आलें मोजणीदारांचें पथक  । मुक्काम एक तैं केला ॥२९॥

गांवीं होते एक सत्पुरुष । गेले तयांचे दर्शनास । चरणांवरी ठेविलें शीस । प्रसाद - आशीष पावले ॥३०॥

त्या सत्पुरुषांचे हातांत । होता निश्चळदासकृत । विचारसागरनामक ग्रंथ । जो ते वाचीत तैं होते ॥३१॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

निश्चल दास:

निश्चल दास हे एक प्रसिद्ध भारतीय तत्त्ववेत्ता, संत आणि योगी होते. ते निर्गुण ब्रह्म संकल्पनेचे समर्थक होते आणि त्यांनी वेदांत व योगदर्शनाचा गहन अभ्यास केला होता. त्यांचा जन्म १७व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा १८व्या शतकाच्या प्रारंभी झाला असावा, आणि ते निर्गुण भक्ती परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. ते प्रामुख्याने हिंदी भाषेत लिहीत असत, आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान सामान्य जनांसाठी समजण्याजोग्या भाषेत मांडले.

विचार सागर ग्रंथ:

"विचार सागर" हा निश्चल दास यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो हिंदीतील एक महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानपर ग्रंथ मानला जातो. यामध्ये त्यांनी अद्वैत वेदांत आणि योगदर्शन यांचे तत्त्वज्ञान अत्यंत सुलभ आणि समन्वयी शैलीत मांडले आहे.

ग्रंथाचा विषय:

1. अद्वैत वेदांत आत्मा, ब्रह्म, मायेला दिलेले स्थान, मोक्षाचे स्वरूप.

2. विवेक-विचार आत्मा व शरीरातील फरक, वास्तव व अवास्तवाची ओळख.

3. योगसाधना मनाच्या स्थैर्यासाठी साधनेचे मार्ग.

4. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय निर्गुण उपासना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यांचा समतोल दृष्टिकोन.

5. साधकासाठी मार्गदर्शन वैराग्य, शम, दम, तितिक्षा इत्यादी साधन चातुष्टयाचा अभ्यास.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढें कांहीं वेळ जातां । येतों म्हणूनि निघूं लागतां । ते साधू जें वदले उल्हासता । तया गृहस्था तें परिसा ॥३२॥

बरे आता आपण यावे I

या ग्रंथाचे अवलोकन करावे II

तेणे तुमचे मनोरथ पुरावे I

असावे हे लक्षात  II . २१, . ३३ II

तुम्ही पुढें निजकार्योद्देशें । जातां जातां उत्तर दिशे । मार्गांत महाभाग्यवशें । महापुरुषासीं दर्शन ॥३४॥

पुढील मार्ग ते दावितील । मनासी निश्चलता ते देतील । तेच मग उपदेशितील । ठसवितील निजबोध ॥३५॥

तेथील मग तें कार्य सरलें । जुन्नरास तेथूनि बदलले । नाणेंघाट चढणें आलें । ओढवलें तें संकट ॥३६॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

नाणेंघाट:

नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. 

 

नाणेघाटाची पायथ्यापासूनची उंची दोन हजार फूट आहे. चढही बेताबेताने आहे. धाप लागत नाही. अधेमधे पायऱ्याही आहेत. नाणेघाट ही इतर घाटांप्रमाणे डोंगराच्या कडेनी किंवा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने जाणारी नैसर्गिक वाट नाही. तो डोंगर फोडून तयार केलेला रस्ता आहे. घाटाच्या चढणीची सुरुवात वैशाखरे गावापासून होते. या गावाच्या नावाची व्युत्पत्ती वैश्यगृह म्हणजे व्यापाऱ्यांचा थांबा अशी सांगितली जाते. या वाटेशी संबंधित एक दंतकथा आहे. सातवाहन राजाने, कोणता ते नाव माहीत नाही; हा रस्ता बांधण्याचे आवाहन केले ते नाणा किंवा नाना आणि गुणा ह्या दोन भावांनी स्वीकारले. दोघांनी दोन वाटांनी रस्ता बांधायला घेतला. नाणाचा आधी बांधून झाला म्हणून रस्त्याचे नाव नाणेघाट. घाट चढून गेल्यावर दिसणाऱ्या जकातीच्या रांजणामुळे नाणेघाट हे नाव पडले अशीही समजूत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

मार्ग तेथील अति बिकट । रेडयावरूनि चढती घाट । रेडा हाच तदर्थ शकट । आणिला निकट आरूढाया ॥३७॥

होतील पुढें मोठे अधिकारी । मिळतील घोडे गाडया मोटारी । आज तों घ्या रेड्याची हाजिरी । वेळ साजिरी करा कीं ॥३८॥

घाट चढणें अशक्य पायीं । रेडियावीण नाहीं सोई । ऐसी ती नाणेंघाटाची नवलाई । अपूर्वाई वाहनाची ॥३९॥

मग तयांनीं केला विचार । पालणिला रेडा केला तयार । तयावरी चढविलें खोगीर । कष्टें स्वार जाहले ॥४०॥

स्वार खरे पण होती चढण । रेडियासारिखें अपूर्व वाहन । झोंके हिसके खातां जाण । भरली कणकण पाठींत ॥४१॥

असो पुढें हा प्रवास सरला । जुन्नराचा कार्यक्रम पुरला । मग बदलीचा हुकूम झाला । मुक्काम हालला तेथूनि ॥४२॥


कल्याणास झाली बदली । चांदोरकरांची गांठ पडली । साईनाथांची कीर्ति ऐकिली । बुद्धि उदेली दर्शनाची ॥४३॥

दुसरे दिवशीं आली बारी । झाली चांदोरकरांची तयारी । म्हणती चला हो बरोबरी । करूं वारी शिरडीची ॥४४॥

घेऊं बाबांचें दर्शन । करूं उभयतां तयांसी नमन । राहूं तेथें एक दो दिन । येऊं परतोन कल्याणा ॥४५॥

परी तेच दिनीं ठाणें शहरांत । दिवाणीचे अदालतींत । मुकदमा - सुनावणी निर्णीत । त्यागिली सोबत तदर्थ ॥४६॥

नानासाहेब आग्रह करीत । चला हो आहेत बाबा समर्थ । पुरवितील तुमचा दर्शनार्थ  । किंपदार्थ  मुकदमा ॥४७॥

परी हें कैंचें तयांस पटे । तारीख चुकवितां भय वाटे । चुकतील केवीं हेलपट्टे । भालपट्टीं लिहिलेले ॥४८॥

नानासाहेब चांदोरकरें । कथिलीं पूर्वील प्रत्यंतरें । दर्शनकाम धरितां अंतरें । विघ्न तें सरे बाजूला ॥४९॥

परी येईना विश्वास जीवा । करितील काय निजस्वभावा । म्हणती आधीं घोर चुकवावा । निकाल लावावा दाव्याचा ॥५०॥

असो मग ते ठाण्यास गेले । चांदोरकर शिरडीस निघाले । दर्शन घेऊनि परत फिरले । नवल वर्तलें इकडे पैं ॥५१॥

वेळीं जरी हे हजर राहिले । दाव्याचें काम पुढें नेमिलें । चांदोरकरही हातचे गेले । खजील अंतरीं ॥५२॥

विश्वास ठेवितों बरें होतें । चांदोरकर सवें नेते । दर्शनाचें कार्य उरकतें । स्वस्थचित्तें शिरडींत ॥५३॥

दाव्यापरी दावा राहिला । साधुसमागमही अंतरला । उठाउठी निश्चय केला । जावयाला शिरडीस ॥५४॥

न जाणों मी शिरडीस जातां । समयीं नानांची भेट होतां । स्वयें निरवितील साईनाथा । आनंद चित्ता होईल ॥५५॥

शिरडीस नाहीं कोणी परिचित । तेथ मी सर्वथैव अपरिचित । नाना भेटतां होईल उचित । जरी क्वचित योग तो ॥५६॥

ऐसे विचार करीत करीत । बैसले ते अग्निरथांत । दुसरे दिवशीं पावले शिरडींत । नाना तैं अर्थात्‌ नाहींत ॥५७॥

हे जे दिनीं यावया निघाले । नाना ते दिनीं जावया गेले । तेणें हे बहु हताश झाले । अति हिरमुसले मनांत ॥५८॥

असो मग तयांस तेथें भेटले । तयांचे दुसरे स्नेही भले । तयांनीं साईंचें दर्शन करविलें । हेतु पुरविले मनाचे ॥५९॥

दर्शनें पायीं जडलें चित्त । घातला साष्टांग दंडवत । शरीर झालें पुलकांकित । नयनीं स्रवत प्रेमाश्रु ॥६०॥

मग ते होतां क्षणैक स्थित । काय तयांसी बाबा वदत । त्रिकालज्ञ मुख करोनि सस्मित । सावचित्त तें परिसा ॥६१॥

कानडी आप्पाचें तें सांगणें । जैसें रेडिया संगें घाट चढणें । ऐसें न येथील सोपें चालणें । अंग झिजविणें अनिवार्य॥६२॥

कर्णीं पडतां खुणेचीं अक्षरें । अंतरंग अधिकचि गहिंवरे । पूर्वील सत्पुरुषवचन खरें । प्रत्यंतरें ठरलें कीं ॥६३॥

मग जोडूनियां उभय हस्तां । साईपदीं ठेविला माथा । म्हणती कृपा करा साईनाथा । मज अनाथा पदरीं घ्या ॥६४॥

आपणचि माझे महापुरुष । निश्चळदासग्रंथोपदेश । आज मज कळला अशेष । निर्विशेष सुखबोध ॥६५॥

कुठें वडगांव कुठें शिरडी । काय ही सत्पुरुष - महापुरुषजोडी । किती ती स्वल्पाक्षरभाषा उघडी । उपदेश - निरवडी कैसी हे ॥६६॥

एक म्हणती ग्रंथ वाचा । पुढें संगम महापुरुषाचा । मग ते पुढील कर्तव्याचा । उपदेश साचा करतील ॥६७॥

देवयोगें तेही भेटले । तेच ते हे खुणांहीं पटविलें । परी तें एकाचें वाचिलें । दुजिया आचरिलें पाहिजे ॥६८॥

तयांसी म्हणती साईनाथ । अप्पांनीं सांगितलें तें यथार्थ । परी जेव्हां तें येईल कृतींत । पूर्ण मनोरथ तैं होती॥६९॥

निश्चलदास - विचारसागर । वडगांवीं भक्तार्थ झाला उच्चार । काळें ग्रंथपारायणानंतर । शिरडींत आचार कथियेला ॥७०॥

ग्रंथ करावा आधीं श्रवण । त्याचेंच मग करावें मनन । होतां पारायणावर्तन । निदिध्यासन होतसे ॥७१॥



वाचिलें तें नाहीं संपलें ।

पाहिजे तें कृतींत उतरलें ।

या उपड्या घडयावर तोय ओतलें ।

तैसें जाहलें तें सकळ ॥७२॥


सौदागर आणि  घोडा

(‘सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (73-104)

नको वेदशास्त्र व्युत्पत्ती नको ज्ञानी हे दिगंतकीर्ती II

नको शुष्क भजनप्रीती I प्रेमळ भक्ती पाहिजे II९८II

एकदा अनंतराव पाटणकर नावाचे गृहस्थ बाबांचे भेटीस येतात. यांनी वेदांचे वाचन केलेले असते परंतु यांच्या मनाला स्थैर्य नसते. ते बाबांना याबद्दल विचारतात. बाबा त्यांना एक गोष्ट सांगतात.एका सौदागरासमोर एक घोडा नऊ लेंड्या टाकतो. सौदागर त्या घट्ट बांधून जवळ ठेवतो.पाटणकर केळकरांना या गोष्टीचा अर्थ विचारतात. केळकर या गोष्टीचा अर्थ सांगतात की घोडा ही ईंश्वरी कृपा. नऊ लेंड्या म्हणजे नवविधा भक्ती (१. श्रवण २. कीर्तन ३. विष्णुस्मरण ४. चरणसेवन ५. अर्चन ६. वंदन ७. दास्य ८. सख्य ९. आत्मनिवेदन). यांतील एक जरी भक्ती सफल झाली तरी मनाला स्थैर्य येईल. दुस-या दिवशी जाताना बाबा त्यांना विचारतात, ‘पदरी लेंड्या बांधल्यास काय?’ पाटणकर उत्तर देतात, ‘तुमची कृपा असू द्या, म्हणजे त्या सहज बांधल्या जातील.

व्यर्थ व्यर्थ ग्रंथवाचन । हातीं न ये जों अनुभवज्ञान । ब्रह्मसंपन्न गुरुकृपेवीण । पुस्तकी ज्ञान निष्फळ ॥७३॥

ये अर्थींची अल्प कथा । दावील भक्तीची यथार्थता । पुरुषार्थाची अत्यावश्यकता । श्रोतां निजस्वार्था परिसिजे ॥७४॥

एकदां एक पुण्यपट्टणकर । नामें अनंतराव पाटणकर । साईदर्शनीं उपजला आदर । आले सत्वर शिर्डीस ॥७५॥

वेदान्त श्रवण जाहला सकळ । सटीक उपनिषदें वाचिलीं समूळ । परी तन्मानस अक्षयीं चंचळ । राहीना तळमळ तयांची ॥७६॥

घेतां साईसमर्थांचें दर्शन । निवाले पाटणकरांचे नयन । करुनि पायांचें अभिवंदन । यथोक्त पूजन संपादिलें ॥७७॥

मग होऊनि बद्धांजुळी । बैसूनि सन्मुख बाबांचे जवळी । अनंतराव प्रेमसमेळीं । करुणाबहाळीं पुसत कीं ॥७८॥

केलें विविध ग्रंथावलोकन । वेदवेदांग - उपनिषदध्ययन ॥ केलें सच्छास्त्र - पुराणश्रवण । परी हें निर्विण्ण मन कैसें ॥७९॥

वाचिलें तें व्यर्थ गेलें । ऐसेंच आतां वाटूं लागलें । अक्षरहीन भावार्थी भले । वाटती चांगले मजहून ॥८०॥

वायां गेलें ग्रंथावलोकन । वायां शास्त्रपरिसीलन । व्यर्थ हें सकळ पुस्तकी ज्ञान । अस्वस्थ मन हें जोंवरी ॥८१॥

काय ती फोल शास्त्रव्युत्पत्ती । किमर्थ महा - वाक्यानुवृत्ती । जेणें न लाधे चित्तास शांति । ब्रह्मसंवित्ति कशाची ॥८२॥

कर्णोपकर्णीं परिसिली वार्ता । साईदर्शनें निवारे चिंता । विनोद गोष्टी वार्ता करितां । सहज सत्पथा लाविती ते ॥८३॥

म्हणवून महाराज तपोराशी । पातलों आपुल्या पायांपासीं । येईल स्थैर्य माझिया मनासी । आशीर्वचनासी द्या ऐशा ॥८४॥

तंव महाराज झाले कथिते । एका विनोदपर आख्यायिकेतें । जेणें अनंतराव समाधानातें । पावले साफल्यते ज्ञानाच्या ॥८५॥

ती अल्पाक्षर परमसार । कथा कथितों व्हा श्रवणतत्पर । विनोद परी तो बोधपर । कोण अनादर करील ॥८६॥

बाबा देत प्रत्युत्तर | 'एकदा एक आला सौदागर || तेव्हा एक घोडें समोर | घाली लेंडार नवांचे || .२३, .८७|| सौदागर निजकार्यतत्पर | लेंडिया पडतां पसरिला पदर || बांधून घेता घट्ट त्या समग्र | चित्तैकाग्र्य लाधला'|| .२३, .८८ ||

हें काय वदले साईसमर्थ । काय असावा कीं मथितार्थ । लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ । कांहींही अर्थ कळेना ॥८९॥

ऐसा विचार करीत करीत । अनंतराव माघारा येत । कथिलें संभाषण इत्थंभूत । केळकरांप्रत तयानें ॥९०॥

म्हणती सौदागर तो कोण । लेंडियांचें काय प्रयोजन । नवांचेंच काय कारण । सांगा उलगडून हें मजला ॥९१॥

दादा हें काय आहे कोडें । मी अल्पबुद्धी मज तें नुलगडे । होईल बाबांचे हृदय उघडें । ऐसें रोकडें मज कथा ॥९२॥

दादा वदती मजही न कळे । ऐसेंच बाबांचें भाषण सगळें । परी तयांच्याच स्फूर्तीच्या बळें । कथितों आकळे जें मज ॥९३॥

कृपा ईश्वरी तें हें घोडें । हें तों नवविधा भक्तीचें कोडें । विनाभक्ति न परमेश्वर जोडे । ज्ञाना न आतुडे एकल्या ॥९४॥

श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण । चरणसेवन-अर्चन - वंदन । दास्य - सख्य - आत्मनिवेदन । भक्ति हे जाण नवविधा ॥९५॥

पूर्ण भाव ठेवूनि अंतरीं । यांतून एकही घडली जरी । भावाचा भुकेला श्रीहरी । प्रकटेल घरींच भक्ताच्या ॥९६॥

जपतपव्रत योगसाधन । वेदोपनिषद - परिशीलन । उदंड अध्यात्मज्ञान - निरूपण । भक्तिविहीन तें फोल ॥९७॥

नको वेदशास्त्रव्युत्पत्ती । नको ज्ञानी हे दिगंतकीर्ति । नको शुष्कभजनप्रीती । प्रेमळ भक्ति पाहिजे ॥९८॥

स्वयें आपणा सौदागर समजा । सौद्याच्या या भावार्था उमजा । फडकतां श्रवणादि भक्तीची ध्वजा । ज्ञानराजा उल्हासे ॥९९॥

घोडयानें घातल्या लेंडया नऊ । सौदागर आतुरते धांवत घेऊं । तैसाच नवविधा भक्तिभावु । धरितां विसांवु मनातें ॥१००॥

तेणेंच मनास येईल स्थैर्य । सर्वांठायीं सद्भाव गांभीर्य । त्यावीण चांचल्य हें अनिवार्य । कथिती गुरुवर्य सप्रेम ॥१०१॥

दुसरे दिवशीं अनंतराय । वंदूं जातां साईंचे पाय । पदरीं बांधिल्यास लेंडया कायपृच्छा ही होय तयांस ॥१०२॥

अनंतराव तेव्हां प्रार्थिती । कृपा असावी दीनावरती । सहज मग त्या बांधिल्या जाती । काय ती महती तयांची ॥१०३॥

तंव बाबा आशीर्वाद देती । कल्याण होईलआश्वासिती । अनंतराव आनंदले चित्तीं । सुखसंवित्ति लाधले ॥१०४॥

बाबांच्या निंदापर चर्चेमध्ये वकिलाचा सहभाग

('साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (105-130) 

आतां आणीक अल्प कथा । श्रोतां परिसिजे सादरचित्ता । कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता । सन्मार्गप्रवर्तकता तैसीच ॥१०५॥

एकदां एक वकील आले । येतांक्षणींच मशिदी गेले । साईनाथांचें दर्शन घेतलें । पाय वंदिले तयांचे ॥१०६॥

सवेंच मग देऊन दक्षिणा । बैसले बाजूस वकील तत्क्षणा । तेथें चालल्या साई - संभाषणा । आदर श्रवणा उपजला ॥१०७॥

बाबा तंव तिकडे मुख फिरविती । वकीलांस अनुलक्षून वदती । बोल ते वर्मीं जाऊन खोंचती । वकील पावती अनुताप ॥१०८॥

लोक तरी हो लबाड किती । पायां पडती दक्षिणाही अर्पिती । आणीक आंतून शिव्याही देती । काय चमत्कृती सांगावी॥१०९॥

ऐकून हें वकील स्वस्थ राहिले । कीं ते निजांतरीं पूर्ण उमजले । उद्नार अन्वर्थ हें तयां पटलें । तात्पर्य ठसलें मनासी ॥११०॥

पुढें जेव्हां ते वाडयांत गेले । दीक्षितांलागीं कथिते झाले । कीं जें बाबा लावूनि बोलले । सार्थचि वहिलें तें सर्व ॥१११॥

येतांच मजवर झाडिला ताशेरा । तो मज केवळ दिधला इशारा । कुणाची थट्टानिंदादि प्रकारा । देईं न थारा अंतरीं ॥११२॥

शरीरप्रकृति होऊनि अस्वस्थ । मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त । राहिले रजेवर येथें स्वस्थ । आपुली प्रकृती सुधरावया ॥११३॥

वकीलांच्या खोलींत असतां । मुन्सफांसंबंधें निघाल्या वार्ता । अर्थोअर्थीं संबंध नसतां । ऊहापोहता चालली ॥११४॥

औषधावीण या शरीरापदा । टळतील का लागतां साईंच्या नादा । पावले जे मुन्सफीचे पदा । तयां हा धंदा साजे कां ॥११५॥

ऐसी तयांची निंदा चालतां । चालली साईंची उपहासता । मीही तयांतचि होतों अंशता । तिची अनुचितता दर्शविली ॥११६॥

ताशेरा नव्हे हा अनुग्रह । व्यर्थ कुणाचा ऊहापोह । उपहास - निंदादि कुत्सित संग्रह । असत्परिग्रह वर्जावा ॥११७॥

आणीक एक हें प्रत्यंतर । असतां शंभर कोसाचें अंतर । साई जाणें सर्वाभ्यंतर । खरे अंतर्ज्ञानी ते ॥११८॥

आणिक एक झाला निवाड । असोत मध्यें पर्वत पहाड । कांहीं न साईंच्या दृष्टीआड । गुप्तही उघड त्यां सर्व ॥११९॥

असो पुढें तेव्हांपासुनी । केला निश्चय वकीलांनीं । अत:पर निंदा - दुरुक्तिवचनीं । खडा कानीं लाविला ॥१२०॥

आपण कांहींही कुठेंही करितां । येई न साईंची दृष्टी चुकवितां । येविषयीं जाहली निश्चितता । असत्कार्यार्थता विराली ॥१२१॥

उदेली सत्कार्य - जागरूकता । मागें पुढें साईसन्निधता । समर्थ कोण तया वंचिता । निर्धार चित्ता हा ठसला ॥१२२॥

पाहूं जातां या कथेसी । संबंध जरी त्या वकीलासी । तरी ती सर्वार्थी आणि सर्वांसीं । बोधक सर्वांसी सारिखी ॥१२३॥

वकील वक्ते श्रोते समग्र । आणिक साईंचे भक्त इतर । तयांचाही ऐसाच निर्धार । व्हावा मी साचार प्रार्थितों ॥१२४॥

साईकृपामेघ वर्षता I

होईल आपणा सर्वांची तृप्तता II

ये अर्थी काही नाही नवलता I

सकळा तृषार्ता निववील II १२५ II

अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा । अगाध साईचरित्राची सीमा । मूर्त परब्रम्हावतार ॥१२६॥

समारोप

 आतां पुढील अध्यायीं कथा । परिसावी सादर श्रद्धाळू श्रोतां । पुरवील तुमच्या मनोरथा । देईल चित्ता स्थैर्यता ॥१२७॥

भक्तांची भावी संकटावस्था । ठाऊक आधींच साईसमर्था । थट्टामस्करी विनोद वार्ता । हंसतां खेळतां टाळिती ॥१२८॥

भक्तहेमाड साईंस शरण । जाहलें हें कथानक संपूर्ण । पुढील कथेचें अनुसंधान । संकटनिवारण भक्तांचें ॥१२९॥

कैसे साई कृपासागर । भक्तांचीं भावी संकटें दुर्धर । आधीं जाणूनि करिती परिहार । इशारा वेळेवर देउनी ॥१३०॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अनुग्रहकरणंनाम एकविंशोऽध्याय: संपूर्ण" ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...