Monday, November 4, 2024

श्रीमद्भगवद्गीता-अध्याय २


श्रीमद्भगवद्गीता 

अध्याय २ - सांख्ययोग

संजय म्हणाला

करुणापूर्ण तशा अर्जुनाला | व्याकूळ, अश्रुपूर्ण दिसणाऱ्याला || 

विषाद करणाऱ्याला | मधुसूदन हे वाक्य बोलले || अ.२, ओ.१|

श्रीभगवान म्हणाले

कोठून हे तर्कट अर्जुना | 

अशा अवेळी आले तुझ्या मना || 

जे नेते दूर स्वर्गापासून, न शोभते आर्यांना | 

आहे अपकीर्तीचे कारण ||अ.२, श्लो.२||

नकोस पडू कमकुवतपणास बळी | तुला न हा शोभतो मुळी || 

मन:स्थिती क्षुद्र दुबळी | सोडून ऊठ परंतपा || अ.२, श्लो.३||

अर्जुन म्हणाला

कसा मी या युद्धात पण | पूज्य आम्हाला जे भीष्म-द्रोण || 

त्यांच्यावर उलट सोडू बाण | सांग मधुसूदना ||अ.१, ओ.४||

महान गुरूंस मारणे | यापेक्षा बरे, भीक मागून जगणे || 

जरी हे गुरू पैशासाठी ओशाळवाणे | हत्येचे भोग असतात रक्तरंजित ||अ. २, ओ. ५ ||

नकळे मला दोन्हींत बरे काय | मिळवावा की न मिळवावा जय || 

ज्यांना मारून जगण्यात न स्वारस्य | ते धार्तराष्ट्र युद्धास सिद्ध ||अ. २, ओ.६||

गोंधळली वृत्ती, झाले कुंठित मन |   धर्माविषयी मला न ज्ञान || 

भले काय ते सांग समजावून | शिष्य मी तुझा, सांग मला शरणागताला || अ.१, ओ.७||

कसे दूर करू, मला न कळते | दु:ख जे इंद्रियांचे शोषण करते || 

जरी निष्कंटक राज्य पृथ्वीचे मिळते | आणि देवांचे आधिपत्य ||अ. २, ओ.८||

संजय म्हणाला

बोलून असे हृषीकेशास | गुडाकेश, जो ताप देई शत्रूंस || 

'नाही करणार युद्धास'| असे बोलून शांत झाला ||अ.२, ओ.९||

हृषीकेश बोलला त्यास | भारता, करून जणू हास्यास || 

विषाद करणाऱ्या अर्जुनास | दोन्ही सैन्यांच्यामध्ये || अ.२, ओ.१०||

श्रीभगवान म्हणाले

ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोस | पोकळ पांडित्य सांगतोस |I 

नसे दु:ख खऱ्या ज्ञानी लोकांस | आल्यागेल्यांचे  ||अ.२, ओ.११||

तुला, मला, या राजांस | वा आपणां सर्वांस || 

नव्हता जन्म पूर्वी, न यावयाचे जन्मास | असे काही नाही || अ. २, ओ. १२||

आत्म्यास या देहात जशा लाभती | 

बालपण, तारुण्य, म्हातारपण या स्थिती |I 

तशीच होते त्याला नव्या देहाची प्राप्ती | 

त्यामुळे ज्ञानी मोह न पावतो || अ. १, ओ. १३ ||

कौंतेया, स्पर्शसंवेदना उत्पन्न होती | 

शीत वा उष्ण, सुख वा दु:ख देती || 

त्या येती तशा जाती | 

कर सहन त्यांना || अ.१, ओ.१४||

या संवेदना व्यथा न देती ज्या ज्ञानी पुरुषाला | पुरुषश्रेष्ठा, सांगतो तुला || 

सुख आणि दु:ख सारखे ज्याला | तो अमृतत्वाला पात्र होतो ||अ.२, ओ. १५||

असत् होई न भाव | सत् होई न अभाव || 

असा या दोन्हींचा पाहिला ठाव | तत्त्वदर्शी लोकांनी ||अ.२, ओ.१६||

जाण अविनाशी अव्ययास | ज्याने व्यापिले या सर्वास || 

त्याच्या विनाशास | कोणीही समर्थ नाही || अ. २, ओ.१७||

नित्य, अविनाशी, अप्रमेय आत्म्याने या | धारण केलेल्या काया | 

अंती जाती विलया | त्याकरिता युद्ध कर || अ. २, ओ.१८||

जो मानतो मारणारा आत्म्यास | किंवा जो मानतो  मेलेला त्यास || 

कळत नाही त्या दोघांस | हा न मारतो न मारला जातो || अ. २, श्लो. १९||

आत्मा नाही जन्मत, नाही मरत | नाही तो झाला, नाही होत ||     

तो पुरातन, नित्य, शाश्वत, जन्मरहित | शरीर नष्ट करिता, नाही मारला जात || अ.२, श्लो. २० ||

ज्या पुरुषास ज्ञात | की आत्मा नित्य, अव्यय, जन्मरहित || 

तो पुरुष कसा करवील कुणाचा घात | किंवा मारील कुणास? || अ.२, श्लो. २१||

जसा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून | 

नवी वस्त्रे करतो परिधान || 

तसा आत्मा जुनी शरीरे सोडून | 

नव्या शरीरात जातो || अ.२, श्लो. २२||

तुटे न हा शस्त्राने | जळे न हा अग्नीने || 

भिजे न हा पाण्याने | न सुकवी वारा यास || अ.२, ओ.२३||

न हा तोडला वा जाळला जातो | न भिजवला वा सुकवला जातो || 

नित्य, स्थिर, सर्वत्र राहतो | अचल हा सनातन || अ. २, ओ. २४||

हा अचिंत्य, अव्यक्त | अविकार्य यास बोलतात || 

हे झाल्यावर ज्ञात | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.२५||

हा जन्मतो आणि मरतो नियमित | असे जरी असेल तुझे मत |I 

तरी शोक करणे न उचित | महाबाहो तुला ||अ. २, ओ. २६ ||

मृत्यू हा जन्माचा संपात | 

तसा जन्म हा मृत्यूचा संपात || 

याचे भान ठेवीत | 

योग्य नाही शोक करणे ||अ.२, श्लो. २७||

आरंभी ही भूते अव्यक्त असती | मध्ये व्यक्त दिसती || 

अखेर अव्यक्तातच विलीन होती | तिथे शोक कशासाठी || अ. २, श्लो. २८||

कुणी आत्म्यास आश्चर्यकारक म्हणून पाहती | कुणी आश्चर्यकारक बोलती || 

कुणी आश्चर्यकारक म्हणून ऐकती | आणि ऐकूनसुद्धा त्यास, जाणे न कुणीही || अ. २, ओ. २९ ||

भारता, आत्मा राहतो देहात | आत्मा आहे अवध्य, शाश्वत ||

तेव्हा सर्व भूतांप्रत | शोक करणे योग्य नाही || अ. २, ओ.३०||

आणि पाहताही स्वधर्मास | वाव नसे विचलित होण्यास |I 

कारण यु्द्धाहून क्षत्रियास | हितकारक काही नसे || अ. २,ओ. ३१||

काही सायासांवाचून | स्वर्गाचे दार ठेविले उघडून |I 

क्षत्रियांस भाग्यवान | युद्ध असे लाभते || अ.२, ओ.३२||

जाणूनही धर्मास | न करशील या युद्धास || 

पात्र होशील पापास | स्वधर्म आणि कीर्ती गमावून || अ. २, ओ. ३३ ||

अपकीर्ती तुझी करतील | जन हे सकल || 

संभावितास अपकीर्तीचा सल | मरणाहून असह्य || अ. २, ओ.३४||

महारथी म्हणतील, 'अर्जुन | पळाला  रणातून घाबरून ' |I 

करतील तुझे अवमूल्यन | जे तुला मानतात || अ.२, ओ.३५||

बोलू नये ते बोलतील | पुष्कळ तुझ्याबद्दल || 

तुझे सामर्थ्य कमी लेखतील | त्याहून काय दु:खदायक || अ.२, ओ.३६||

मारला गेल्यास मिळवशील स्वर्गास | जिंकल्यास भोगशील पृथ्वीस || 

म्हणून कौंतेया, ऊठ युद्धास  | दृढनिश्चय करूनी || अ.२ ओ. ३७||

समान मानून सुख-दु:खास | लाभ-हानी, जय-पराजयास || 

करशील जर युद्धास | लागणार नाही पाप तुला || अ.२, ओ.३८||

हे ज्ञान  सांगितले सांख्यातील | ऐक ज्ञान आता योगातील || 

जे जाणून मुक्त होशील | कर्मबंधातून || अ.२, ओ.३९||

योगात  आरंभिले कार्य नाश न पावते | न आरंभिल्या कार्यात विघ्न  येते || 

मोठ्या भयापासून रक्षण करते | या धर्माचे अल्प आचरण || अ.२, ओ.४०||

जी  व्यस्त  असे योगात  | एकत्व  राहे त्या बुद्धीत || 

जी नसे योगात  व्यस्त  | त्या बुद्धीला अनंत शाखा फुटती  || अ.२, ओ.४१||

अज्ञानी लोक भाषा फुलवती | आणि बोलती || 

वेदांच्या वादात रंगून म्हणती, | ‘नसे दुसरे काही’ || अ.२, ओ.४२||

‘विविध विशेष क्रियांचे  फळ म्हणून | भोग आणि ऐश्वर्य देणारा  जन्म येतो चालून’, || 

म्हणती हे जन | इच्छा आणि स्वर्गाच्या पाठी जे असती ||अ.२, ओ.४३||

भोग आणि ऐश्वर्य ध्येय एक | मानून गमावती विवेक || 

त्यांची बुद्धी व्यवसायात्मिक | होते न स्थिर || अ.२, ओ. ४४||

वेद आहेत त्रिगुणांनी युक्त | अर्जुना, तू हो त्रिगुणरहित || 

नेहमी सत्त्वगुणी, द्वंद्वापासून मुक्त | योगक्षेमापासून दूर, आत्मनिष्ठ || अ. २, ओ.४५||

जळाने व्यापता सर्व बाजूंस | 

कोण विचारी विहीरीस || 

तेवढीच किंमत वेदांस | 

देई ज्ञानी ब्राह्मण || अ.२, ओ. ४६ ||

अधिकार तुझा केवळ कर्मावर | नाही कधीही कर्मफलावर || 

कर्मफलहेतूस ठेव दूर | कर्म मात्र टाळू नको || अ.२, ओ.४७||

कर कर्मे योगात राहुनी | धनंजया, आसक्ती सोडुनी || 

सिद्धी-असिद्धी समान मानुनी | या समानतेस योग म्हणती || अ.२, श्लो. ४८||

कर्म फार न्यून | धनंजया, बुद्धियोगाहून || 

फळाचा हेतू असणारे जन असती कृपण I म्हणून तू बुद्धीचा आधार घे || अ.२, ओ.४९||

बुद्धियुक्त त्यागतो उभय | पाप आणि पुण्य || 

तेव्हा योगाचा घे आश्रय | कर्मातील कौशल्य म्हणजेच योग || अ. २, ओ. ५०||

कर्मातून झालेले उत्पन्न | फळ, बुद्धियुक्त जन टाकून || 

मुक्त होती जन्मबंधनातून | जाती निरामय पदाला || अ. २, ओ. ५१||

जेव्हा मोहाचे जंगल | बुद्धी पार करील || 

तुला  निरुपयोगी वाटेल | ऐकलेले आणि ऐकावे असे || अ. २, ओ.५२||

श्रुतींमुळे झालेली चंचल | होईल जेव्हा निश्चल || 

बुद्धी समाधीत अचल | तेव्हा साधशील योग || अ.२, ओ.५३||

अर्जुन म्हणाला

‘स्थितप्रज्ञ, जो समाधीत स्थिर झाला | केशवा सांग मला | 

बोलेल काय शब्दांला | असेल कसा, वागेल कसा’ || अ.२, ओ.५४||

श्रीभगवान म्हणाले

‘हे पार्था, स्थितप्रज्ञ म्हणती त्यास | जो सोडून सर्व इच्छांस || 

मानतो संतोषास | स्वत:च्याच ठायी || अ.२, ओ.५५||

जो न उद्विग्न दु:खात | ज्याची इच्छा न सुखात || 

जो प्रेम, राग, भीतीपासून मुक्त | स्थितप्रज्ञ म्हणती त्यास ||अ.२, ओ.५६||

सर्वत्र जो अनासक्त | शुभ आणि अशुभापासून अलिप्त || 

हर्ष आणि द्वेषापासून मुक्त | स्थिर त्याची बुद्धी || अ.२, श्लो.५७||

जो घेतो आवरूनी | 

इंद्रिये इंद्रियविषयांपासुनी | 

कासव जसे अवयव सर्व बाजूंनी | 

स्थिर त्याची बुद्धी ||अ.२, ओ.५८||

जीवात्म्याची निराहारातुनी | निवृत्ती होई विषयांतुनी, न त्यांच्या आसक्तीतुनी || 

निवृत्ती आसक्तीतुनी | होई पराच्या दर्शनाने ||अ.२, ओ.५९||

पुरुषाने ज्ञानी | प्रयत्नही करूनी || 

मन दुसरीकडे नेती ओढुनी | त्रासदायक इंद्रिये || अ. २, ओ.६०||

तेव्हा इंद्रियांस करून संयमित | युक्त हो माझ्यात || 

इंद्रिये ज्याची ताब्यात | स्थिर त्याची बुद्धी || अ. २, ओ. ६१||

विषयांचे जो करी चिंतन I 

विषयासक्त होई त्याचे मन II

काम जन्मतो विषयांतून I 

कामातून जन्म क्रोधाचा || अ. २, ओ. ६२||

जन्म क्रोधातून संमोहाचा I 

संमोहातून स्मृतिनाशाचा II

स्मृतिनाशातून बुद्धिनाशाचा I 

बुद्धिनाशातून होई सर्वनाश || अ. २, ओ. ६३||

जो मुक्त आसक्ती आणि द्वेषापासून | इंद्रियांना ठेवून स्वाधीन || 

वावरतो विषयांतून || तो विधेयात्मा प्रसन्नता पावतो || अ.२, ओ.६४||

पावता प्रसन्नतेस | दु:खे जाती लयास || 

स्थिरता येई बुद्धीस | लगेच || अ.२, ओ.६५||

बुद्धीचा लाभ न अयुक्तास | न जाणी तो भावनेस || 

भावनेअभावी न शांती त्यास | नसता शांती नसे सुख त्यास || अ।२, ओ.६६||

भटकता इंद्रियांनी | 

त्यांच्या पाठी जाऊनी || 

मन बुद्धीस नेते ओढुनी | 

जसा वारा ओढतो पाण्यातील नावेस ||अ.२, श्लो. ६७||

महाबाहो म्हणूनी | इंद्रियांस विषयांपासूनी || 

घेतो जो आवरूनी | स्थिर त्याची बुद्धी ||अ. २, श्लो.६८||

सर्व भूतांसाठी रात्र होता | संयमी राखतो जागृतता || 

सर्व भूते जागी राहता | मुनी पाही रात्र  ती || अ.२, ओ६९||

सर्व बाजूंनी भरताही जल | 

समुद्र जसा राहतो आपल्या मर्यादेत अचल || 

तसा जो राहतो स्थिर, इच्छांत सकल | 

तो पावतो शांती, न भोगेच्छू || अ.२, ओ.७०||

जो सर्व इच्छांचा त्याग करतो | आणि नि:स्पृहपणे राहतो || 

निर्मम निरहंकारी पुरुष तो | पावतो शांती || अ.२, ओ.७१||

पार्था, हीच ती ब्राह्मी स्थिती | प्राप्त होता न मोह पावती || 

अंतकाळीही स्थिर राहती | पावती ब्रह्मनिर्वाणास || अ.२, ओ.७२||


अशा प्रकारे भगवद्गीता या चांगल्या उपनिषदातील, ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील 'सांख्ययोग' नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.


No comments:

Post a Comment