Tuesday, April 23, 2024

सुलभ श्रीमद्भगवद्गीता

                                 


सुलभ श्रीमद्भगवद्गीता 









सुलभ श्रीमद्भगवद्गीता
मनोगत


भगवद्गीतेची ओळख मला कधी झाली? माझ्या मोठ्या भावाला शाळेत एका स्पर्धेमध्ये सार्थ भगवद्गीता बक्षीस मिळाली. तेव्हापासून मी भगवद्गीता वाचतो आहे. शाळेमध्ये भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठांतरासाठी असे. 

माझ्या बहिणीला शालेय अभ्यासक्रमात पूज्य विनोबा भावे यांची 'गीताई' होती.  भगवद्गीता ज्या अनुष्टुभ छंदामध्ये आहे, त्याच छंदामध्ये विनोबाजींनी गीताई लिहिली आहे. गीताई इतक्या सोप्या मराठीत लिहिली आहे की जणू काही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन मराठी होते, असे वाटावे.

माझे पदवी शिक्षण के. जे. सोमैया कॉलेज , मुंबई येथे झाले. कॉलेजचे संस्थापक के.जे.सोमैया संस्कृतप्रेमी होते. त्यामुळे आम्हाला भगवद्गीतेवर पेपर असे. या परीक्षेत सर्वांत जास्त गुण मिळाल्याबद्दल मला एकदा बक्षीस मिळाले होते. या पेपर्सच्या निमित्ताने मी स्वामी विवेकानंदांचे 'कर्मयोग' हे पुस्तक वाचले. कॉलेजमध्ये एकदा स्वामी चिन्मयानंद यांचे भगवद्गीतेवरील प्रवचन ऐकले.

आम्ही मिरा रोड, मुंबई येथे राहत असताना तेथे इस्कॉनचे मंदिर होते. माझी सौभाग्यवती वर्षा मंदिराच्या कार्यात खूपच भाग घेत असे. त्यामुळे मी मंदिराचे कीर्तन, प्रवचन असे बरेच कार्यक्रम अटेंड केले. श्रील प्रभुपादांचे 'भगवद्गीता - जशी आहे तशी' हे पुस्तक वाचले.

नंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केले. तेथेही नॉर्थ सिडनी येथे इस्कॉनचे चांगले मंदिर आहे. वर्षाने येथेही मंदिराच्या कार्यात सहभाग ठेवला. त्यामुळे पुन्हा कीर्तन, प्रवचन अटेंड करणे चालू राहिले.

माझ्या कामावरील साहेब श्री. नंदू मेहता यांच्यामुळे मी रामकृष्ण मिशनच्या लिव्हरपूल रोडवरील वेदांत हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ लागलो. तेथे माताजी भगवद्गीतेतील निरनिराळ्या अध्यायांवर पूर्ण दिवस रिसॉर्ट्स घेत असतात. असे बरेच रिसॉर्ट्स मी अटेंड केले.

एवढे सारे करून मला सतत असे वाटत होते की भगवद्गीता मला समजत नाही. उलट अधिकाधिक गोंधळ होतो आहे.

मी विचार केला, असं का बरं होतं आहे? तेव्हा माझ्या लक्षात आले की भगवद्गीतेवरील पुस्तके लिहिताना किंवा प्रवचने सांगताना लेखक किंवा प्रवचनकार त्यामध्ये आपल्या पदरचे काहीतरी ॲड करतात. ते समजण्यासाठी उपयोगी असले तरी मूळ भगवद्गीतेत काय सांगितले आहे, याविषयी गोंधळ उडतो. आजकाल तर असे दिसते की कोणीही येतो आणि 'भगवद्गीतासुद्धा असे सांगते' म्हणून प्रतिपादन करतो. 'गीता का सार', 'गीता संदेश' म्हणून मेसेजेस समाज माध्यमांवर फिरत असतात. हे खरोखर भगवद्गीतेत सांगितले आहे का, असा प्रश्न मला पडत असे.

तेव्हा मी ठरवले की आपणच आपल्याला समजेल असे भगवद्गीतेचे व्हर्शन बनवायचे. हे व्हर्शन बनवताना माझी मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे होती:-

१. आपल्या दैनंदिन संभाषणातील सोपी मराठी भाषा वापरायची. आलंकारिक भाषेचा किंवा कठीण भाषेचा सोस मुळीच ठेवायचा नाही.

२. रचनेसाठी ओवी छंदाचा वापर, जो छंद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी वापरला आहे. ओवीमध्ये साडेतीन चरण असतात, तीन चरण दीर्घ तर चौथा चरण आखूड असतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणांत यमक असते. शब्दसंख्या शिथिल असते. माझ्या ओव्यांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणांत यमक आहे, पण ते नावापुरते, यमक जुळवण्याच्या अट्टाहासात भाषेला अवघडपणा येऊ नये म्हणून. बऱ्याच ठिकाणी पहिले, दुसरे किंवा तिसरे चरण आखूड झाले आहेत आणि चौथा चरण दीर्घ झाला आहे.

३. मराठी भाषेत बहुतांश संस्कृत शब्द असल्याने भाषांतर करताना जर भगवद्गीतेतील संस्कृत शब्द मराठीत असेल, तर तो अवघड असला तरी तसाच ठेवला आहे. परंतु जेथे संस्कृत शब्द मराठीत नाही, तेथे सोपा मराठी शब्द वापरला आहे. म्हणजे वाचताना भगवद्गीता समजली तर पाहिजे, पण मूळ भगवद्गीतेचा फील कुठेही जाता कामा नये, असा प्रयत्न केला आहे.

उदा. 
'श्रेयान्स्वधर्मो विगुणो परधर्मात्सुनिष्ठात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:'

हा भगवद्गीतेतील सुप्रसिद्ध श्लोक घेतला तर यातील बहुतेक सारे शब्द मराठीत आहेत. विगुण हा शब्द समजण्यासारखा असला तरी मराठीत नित्य वापरात नाही. 

त्यामुळे माझे भाषांतर असे झाले-
गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||
बरे स्वधर्मात निधन | परधर्म भयावह || अ.३, श्लो.३५ ||

४. संकल्पना भाषांतरित करण्याऐवजी तशाच वापरल्या आहेत. उदा. भूत ही संकल्पना भगवद्गीतेत सतत येते. तिचे भाषांतर करून प्राणी, सजीव, जीवमात्र असे केले तर या प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. प्रत्येक शब्दाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. निराळ्या व्यक्तिमत्त्वाचे शब्द आले की ते मूळ संहितेचे व्यक्तिमत्त्व बदलून टाकतात. त्यामुळेच मूळ भगवद्गीता कुठेतरी हरवल्या सारखी वाटते. शिवाय हे प्राणी , सजीव, जीवमात्र हे शब्द ज्याअर्थी संस्कृत भाषेत आहेत आणि भगवद्गीतेतही निरनिराळ्या संदर्भात येत असेल, तर भूत शब्दामागे काही एक संकल्पना अभिप्रेत आहे आणि ती तशीच ठेवली पाहिजे. 

आणखी एक उदाहरण म्हणजे 'नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:' या श्लोकाचे. येथे भाव, अभाव, सत्, असत् या शब्दांसाठी निराळे शब्द योजले तर या शब्दांमागील संकल्पनेपासून दूर गेल्यासारखे होईल.

५. भगवद्गीता वाचताना मला असे वाटते की भगवद्गीता हा एक सलग संवाद आहे. भगवद्गीता सांगताना भगवान श्रीकृष्ण काही अध्याय सांगत नव्हते. हे अध्याय पुढील रचनाकारांनी आपल्या सोयीसाठी केले आहेत. त्यामुळे अध्यायाचे नाव एक असेल तर वेगळ्याच विषयावर चर्चा केलेली आढळते. त्यामुळे मी असे शक्य तितके विषय आयडेंटिफाय करून त्यांना नावे दिली आहेत.

६. भगवद्गीता हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे. त्यामुळे त्यांच्या इंटरप्रिटेशनसाठी भगवद्गीता पुरेशी आहे. त्यामुळे कुठल्याही बाह्य ग्रंथाचा आधार न घेता, भगवद्गीतेत दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारेच भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ लावायचा.

६. कुठलाही विषय आपल्याला चित्रांतूनच चांगला समजतो. त्यामुळे ठिकठिकाणी चित्रे वापरली आहेत. जिथे समर्पक चित्रे मिळाली नाहीत तिथे मी चित्रे काढली आहेत. अवघड कल्पनांची उकल व्हावी, म्हणून डायग्रॅम्सही काढले आहेत.

भगवद्गीता लिहीत असताना एकेक अध्याय झाला की माझे परम मित्र श्री. मिलिंद बर्वे यांना पाठवीत असे. श्री. मिलिंद बर्वे संस्कृत भाषेचे प्रेमी असून आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करीत असतात. माझे भाषांतर चांगले समजते, असे मत त्यांनी दिले.

यासाठी ग.का. रायकर आणि दि.अ.घैसास यांचे जयहिंद प्रकाशनाकडून प्रकाशित 'सान्वय व सार्थ श्रीमद्भगवद्गीता' या पुस्तकाचा वापर केला आहे. या लैखकांचे मन:पूर्वक आभार. (यांचेच पुस्तक माझ्या मोठ्या भावाला बक्षीस मिळाले होते. पुस्तक तेच आहे‌ . फक्त त्यात अन्वय ॲड केला आहे).

श्रील प्रभुपादांच्या 'भगवद्गीता-जशी आहे तशी' या पुस्तकाचा खूप उपयोग झाला आहे. सर्व श्रीकृष्णभक्तांस श्रील प्रभुपाद गुरूसमान आहेत. त्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार.

आता मला भगवद्गीता वाचावीशी वाटली की ही भगवद्गीता मी वाचतो. मला ती समजायला सोपी वाटते आणि मुख्यत: मूळ भगवद्गीतेपासून दूर गेल्यासारखे वाटत नाही. मी ही भगवद्गीता लिहिली नसती, तर इतक्या वेळा कधीच वाचली नसती. भगवद्गीता कळली आहे असे म्हणण्याचे धाडस कुणीच करणार नाही. मीही ते करीत नाही. भगवद्गीतेत काय आहे आणि काय नाही, त्याची बऱ्यापैकी कल्पना आली आहे, एवढेच मी म्हणू शकतो. माझा हा प्रयत्न कसा झाला आहे, त्यावर वाचकांनी जरूर प्रतिक्रिया लिहाव्यात आणि काही सुधारणा हव्या असतील तरी सांगावे.

माझा हा प्रयत्न भगवान श्रीकृष्णास अर्पण करून हे मनोगत पूर्ण करतो.

-डॉ.हेमंत जुन्नरकर

No comments:

Post a Comment